श्रीधर व्यंकटेश केतकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीधर व्यंकटेश केतकर
जन्म नाव श्रीधर व्यंकटेश केतकर

डॅा श्रीधर व्यंकटेश केतकर (२ फेब्रुवारी, इ.स. १८८४; रायपूर, ब्रिटिश भारत - १० एप्रिल, इ.स. १९३७; पुणे, ब्रिटिश भारत) हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

केतकरांचा जन्म २ फेब्रुवारी, इ.स. १८८४ रोजी ब्रिटिश भारतात रायपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण अमरावती व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. इ.स. १९०६ साली ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. भारतात परतल्यावर ते कलकत्ता विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

इ.स. १९२० साली त्यांचा विवाह इंडिथ व्हिक्टोरिया कोहन या जर्मन ज्यू तरुणीशी पुण्यात झाला. विवाहानंतर तिला शीलवती हे नाव मिळाले.[१]

महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे कार्य[संपादन]

इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ या काळात केवळ स्वतःच्या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. इ.स. १९१५ सालापासून पुढील १४ वर्षे त्यांनी या प्रचंड कामाच्या संशोधन व लिखाणाला वाहिली. एन्सायक्लोपीडिया या इंग्लिश शब्दासाठी केतकरांनी ज्ञानकोश असा मराठी प्रतिशब्द बनवला [२]. समीक्षक श्री.के. क्षीरसागर यांच्या मते, युरोपीय विद्वानांच्या मताला सरसकट प्रमाण न धरता राष्ट्रवादी भूमिकेतून केतकरांनी ज्ञानकोशाचे कार्य केले [२].

असे म्हणतात की कमीतकमी काळात ज्ञानकोश लिहून व्हावा, म्हणून केतकर यांनी दोन्ही हातांनी लिहायची सवय ठेवली होती.

ग्रंथसंपदा[संपादन]

  • ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ (या त्यांच्या पुस्तकातील समाजशास्त्रीय विवेचन हे पाश्चात्त्य जगातही मान्यता पावलेले आहे.)
  • कादंबऱ्या
    • आशावादी (१९३७)
    • गांवसासू (१९४२)
    • गोंडवनातील प्रियंवदा
    • परागंदा (१९२६)
    • ब्राह्मणकन्या (१९३०)
    • भटक्या (१९३८)
    • विचक्षणा (१९३७)
  • साहित्यविषयक
    • महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण

संकीर्ण[संपादन]

स्वभाषा, स्वदेश आणि स्वराज्य यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या केतकरांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी अनेक मार्ग सुचवले.

ते दुसऱ्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष होते.

ते इ.स. १९३१ सालातल्या हैदराबाद येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

‘जागतिक’, ‘संप्रदाय’, ‘सदाशिवपेठी’ यांसारखे शब्द त्यांनी निर्माण केले.

ज्ञानकोशकार केतकर यांच्यावर परदेशी ज्ञानाचा प्रभाव होता. त्यांची दृष्टी आधुनिक होती. त्यांनी कादंबरी लेखनाच्या माध्यमातून वेश्यासंतती, विवाहबाह्य संबंध, अमेरिकेतील स्थलांतर असे काळाच्या पुढचे विचार मांडले होते. त्यांच्या काळात हे विचार फार बंडखोर समजले गेले.

श्री.व्यं. केतकरांची पत्नी जर्मन होती.

चरित्रे[संपादन]

  • डाॅ. मीना वैशंपायन यांनी श्री.व्यं. केतकरांचे 'ज्ञानकोशकार डॉ. केतकर' या नावाचे चरित्र लिहिले आहे.
  • डॉ. केतकर (द.न. गोखले)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ डॉ. नीलिमा गुंडी (जुलै २०१२). "गतकाळाची गाज : सांस्कृतिक अंतर ओलांडताना". मिळून सार्याजणी. Archived from the original on 2016-03-05. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ a b श्री.के. क्षीरसागर. "'ज्ञानकोशा'चा वारसा विसरू नका...[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १६ जानेवारी, इ.स.२०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]