द्रौपदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेपाळमधील द्रौपदीची मूर्ती
द्रौपदी
जन्म द्रौपदी
पांचाळ
धर्म हिंदू
जोडीदार पांडव
अपत्ये
  • युधिष्ठिराकडून प्रतिविंध्य
  • भीमाकडून सुतसोमा
  • अर्जुनाकडून श्रुतकर्म
  • नकुलाकडून शतानिका
  • सहदेवाकडून श्रुतसेन
वडील द्रूपद
नातेवाईक
  • धृस्तद्युम्न (जुळा भाऊ)
  • सत्यजित (भाऊ)
  • शिखंडी (बहीण, नंतर भावामध्ये रूपांतर)


द्रौपदी ही हिंदू महाकाव्य महाभारताची नायिका आहे. तिला कृष्णा, पांचाली आणि यज्ञसेनी असेही संबोधले जाते. ती पाच पांडव भावांची - युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांची समान पत्नी होती.[१] तिला तिच्या काळातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून वर्णन केले जाते आणि ती अनेक युद्धांचा अंत आणेल, अशी भविष्यवाणी केली गेली होती.

द्रौपदी आणि तिचा भाऊ धृष्टद्युम्न यांचा जन्म पांचाळ राजा द्रुपदाने आयोजित केलेल्या यज्ञातून झाला. अर्जुनाने लग्नात तिला मिळवले, पण सासूच्या गैरसमजामुळे तिने पाच भावांशी लग्न केले. नंतर युधिष्ठिराने राजसूय विधी करून सम्राटाचा दर्जा प्राप्त केला आणि ती इंद्रप्रस्थची सम्राज्ञी झाली. तिला प्रत्येक पांडवापासून एक असे पाच मुलगे होते, ज्यांना एकत्रितपणे उपपांडव म्हणून संबोधले जात असे.

एकदा, पांडवांचा चुलत भाऊ आणि कौरव बंधूंचा प्रमुख दुर्योधन याने ईर्षेपोटी पांडवांना हस्तिनापूरमध्ये जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले. युधिष्ठिराने द्रौपदीला खेळात हरवल्यानंतर, कौरवांनी तिचा अपमान केला आणि कर्णाने तिला अपशब्द वापरले. कौरव राजपुत्र दुःशासनाने तिचा वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला परंतु कृष्णाच्या दैवी हस्तक्षेपामुळे तिचा सन्मान वाचला.

नंतर, तिला आणि तिच्या पतींना 13 वर्षे निर्वासित करण्यात आले, ज्यामध्ये शेवटचे वर्ष गुप्त राहावे लागले. यावेळी जयद्रथसह अनेकांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. गुप्ततेसाठी, द्रौपदीने दासीचा वेष घातला आणि मत्स्याची राणी सुदेष्णाची सेवा केली. किचक, राज्याचा सेनापती, जो सुदेष्णाचा भाऊ देखील होता, त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु भीमाने त्याचा वध केला. कुरुक्षेत्र युद्धानंतर तिच्या अपमानाचा बदला घेण्यात आला, परंतु तिने तिचे वडील, भाऊ आणि तिची पाच मुले गमावली. महाकाव्याच्या शेवटी, पांडव आणि द्रौपदी हिमालयात निवृत्त झाले आणि स्वर्गात गेले. अर्जुनाप्रती तिच्या पक्षपातीपणामुळे, द्रौपदी ही वाटेत पहिल्यांदा पडली.

द्रौपदीची कथा विविध प्रकारच्या कला आणि सादरीकरणांत प्राचीन काळापासून प्रेरणादायी आहे. तिच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके आहेत. हिंदू धर्मात, तिला पंचकन्या ("पाच कुमारिका") म्हणून गौरवले जाते. पंचकन्या म्हणजे स्त्री शुद्धतेचा एक पुरातन प्रकार आहे, ज्यामध्ये या पंचकन्यांचे नावांचे पठण केल्यावर पाप नाहीसे होते असे मानले जाते. काही ठिकाणी, द्रौपदीचा एक संप्रदाय अस्तित्वात आहे, जिथे तिची देवी म्हणून पूजा केली जाते.[२]

जन्म[संपादन]

द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवून अर्धे राज्य घेतल्यामुळे द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टद्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती.. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे.

द्रौपदीची नावे[संपादन]

द्रौपदी, पांचाली, याज्ञसेनी, सैरंध्री

कृष्ण हा दौपदीचा मानलेला भाऊ आणि सखा होता.

पण व पांडवांशी विवाह[संपादन]

द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या फिरत्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी नेम धरून माशाचा डोळा फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला. द्रौपदीला घरी आणल्यावर अर्जुनाने आपल्या (कुंती) आईला घराबाहेर उभे राहून भिक्षा आणल्याचे सांगितले. कुंतीने नेहमीच्या सवयीप्रमाणे भिक्षा 'सर्व भावंडांनी वाटून घ्या' असे म्हटले. त्याचा फायदा घेऊन धृतराष्ट्राने ही सर्वांची पत्नी होईल असे ठरवले. त्याप्रमाणेच झाले आणि द्रौपदी पाचही पांडवांची सामाईक पत्नी झाली. [३]

पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्‍नी सत्यभामा हिने गृहिणीपद व पतीची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच द्रौपदी-सत्यभामा-संवाद असे म्हणतात.

द्यूतप्रसंग आणि वस्त्रहरण[संपादन]

महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या द्यूतप्रसंगी धृतराष्ट्र पुत्र दुःशासनाकरवी झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जीवनातील सर्वात मोठा मानहानीचा प्रसंग होता. त्या प्रसंगातदेखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बुद्धिमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती. "माझ्या पतीने आधी स्वतःला पणाला लावले असल्याने व ते हरले असल्याने, नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का?" या तिच्या प्रश्नाने भीष्म पितामहांनादेखील निरुत्तर केले होते. वस्त्रहरणासारख्या प्रसंगामधे पतींनी सर्व अधिकार गमावल्यानंतर द्रौपदीने आपला सखा कृष्ण याचा धावा केला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देत कृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण केले.

विराट राजाच्या दरबारात कीचकाकरवी अपमानित झालेली द्रौपदी (चित्रकार : राजा रविवर्मा)

वस्त्रहरणाच्या वेळी दुर्योधनाने द्रौपदीला आपली मांडी उघडी करून दाखवली. ही मांडी मी युद्धात फोडीन अशी गर्जना भीमाने केली. दुर्योधनाच्या व दुःशासनाच्या हीन कृतींकडे दुर्लक्ष करणाऱ्या धृतराष्ट्रालादेखील द्रौपदीच्या वक्तव्याची दखल घेणे भाग पडले होते. आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचविण्यासाठी धृतराष्ट्राने तिला अनेक वरदाने देऊ केली होती, मात्र क्षत्रिय स्त्रीच्या धर्मानुसार आपल्याला केवळ दोनच वर मागण्याचा अधिकार आहे, असे उत्तर देऊन द्रौपदीने स्वतःवर ओढवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगातदेखील आपल्या इच्छांवर असलेला संयम व ताळ्यावर असलेले चित्त दाखवून दिले होते. द्रौपदीच्या चतुराईमुळेच पांडव व त्यांचे पुत्र, त्यांच्या रथ व अस्त्र-शस्त्रांसकट दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते व त्यांना त्यांचे राज्यदेखील परत मिळाले होते. पण युधिष्ठिराच्या द्यूतलालसेमुळे त्यांना पुढच्याच क्षणी राज्य गमवावे लागले व बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास त्यांच्या नशिबी आला.

द्रौपदीने अशी प्रतिज्ञा केली होती की तिच्या केसांना धरून ओढणाऱ्या दुःशासनाच्या छातीचे रक्त जोपर्यंत ती आपल्या केसांना लावणार नाही, तोपर्यंत ती केस मोकळेच ठेवेल. भीमाने महाभारतातील युद्धामधे दुःशासनाचा वध करून, त्याची छाती फोडली आणि त्याचे रक्त द्रौपदीच्या केसांना लावून तिची वेणी घातली व द्रौपदीची प्रतिज्ञा पूर्ण केली. युद्ध संपल्यावर एका विहिरीत लपून बसलेल्या दुर्योधानाला बाहेर काढून भीमाने त्याची मांडी फोडली आणि त्याचे रक्त पिऊन शेवटी त्याचा प्राण घेतला.

वनवासात आणि महाभारतीय युद्धात[संपादन]

वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्‍न कौरवांचा मेव्हणा व दुःशलेचा पती जयद्रथ याने केला होता. मात्र युधिष्ठिरामुळे त्याला जीवदान मिळाले. अज्ञातवासाच्या काळात द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी. विराट राजाची पत्‍नी सुदेष्णा हिच्या महालात सैरंध्रीच्या रूपात काम करतानादेखील सुदेष्णेचा भाऊ व विराट राजाचा सेनापती कीचक याने द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्‍न केला.

द्रौपदीने विवाहापूर्वी अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा पति म्हणजे भीम. द्यूतप्रसंगी दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिशोध म्हणून त्याने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती, ती त्याने महाभारताच्या युद्धानंतर पूर्ण केली. वनवासामध्ये तिला सुवर्णकमळे हवी असतानादेखील आपले कौशल्य पणास लावणारा भीमच होता. ती सैरंध्रीच्या रूपात असताना तिच्यावर अतिप्रसंग करू पहाणाऱ्या कीचकाचा वध करण्याचे काम भीमानेच केले होते.

द्रौपदीला युधिष्ठिरापासून प्रतिविंध्य, भीमापासून श्रुतसोम, अर्जुनापासून श्रुतकर्मा, नकुलापासून शतानीक व सहदेवापासून श्रुतसेन असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने द्रोणाचार्य-पुत्र अश्वत्थामा याने महाभारत युद्धसमाप्तीनंतर एके रात्री एकाच राहुटीमधे झोपलेल्या या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात पाच पांडवांसह निवृत्तीसाठी द्रौपदीनेदेखील नगेंद्र हिमालयाचा मार्ग धरला होता. मात्र पर्वताच्या पायथ्याशीच ती कोसळून पडली.

व्यक्तिरेखेवर निवडक पुस्तके[संपादन]

  • कीचकवध (मराठी नाटक, लेखक - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर)
  • द्रौपदी (मधुवंती सप्रे)
  • द्रौपदी (हिंदी, लेखिका - प्रतिभा राय)
  • द्रौपदी की आत्मकथा (हिंदी, लेखिका - मनु शर्मा)
  • पांचाली (लेखिका - डॉ. सुमती क्षेत्रमाडे)
  • पांचालीचे महाभारत - मयसभा (मूळ : द्रौपदी की महाभारत, हिंदी लेखिका - चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी, मराठी अनुवाद - डॉ. प्रतिमा काटीकर)
  • महाभारतावरील व्याख्याने - भाग ११ वा - महाराणी द्रौपदी (वक्ते/लेखक - बाळशास्त्री हरदास)
  • मी याज्ञसेनी द्रौपदी (सुधाकर शुक्ल)
  • सती द्रौपदी (हिंदी, लेखक - स्वामी अखण्डानन्द सरस्वती)
  • सैरंध्री (हिंदी - नरेंद्र कोहली)

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. ^ "The Mahabharata, Book 1: Adi Parva: Vaivahika Parva: Section CLXLIX". www.sacred-texts.com. 2022-01-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Alf Hiltebeitel". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-01-15.
  3. ^ devdattdhakane. "Reality Dropadi Swayamvara Battle | Mahabharata Stories" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-01-19. 2019-01-17 रोजी पाहिले.