एर इंडिया
![]() | ||||
| ||||
स्थापना | जुलै १९३० (टाटा एअरलाइन्स म्हणून) | |||
---|---|---|---|---|
हब |
| |||
मुख्य शहरे |
| |||
फ्रिक्वेंट फ्लायर | फ्लाईंग रिटर्न्स | |||
अलायन्स | स्टार अलायन्स (जुलै २०१४ पासून)[१] | |||
उपकंपन्या | एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया रीजनल, एअर इंडिया कार्गो, इंडियन एअरलाइन्स, पवन हंस | |||
विमान संख्या | १०० | |||
ब्रीदवाक्य | Your Palace in the Sky (आकाशातील तुमचा महाल) | |||
पालक कंपनी | एअर इंडिया लिमिटेड | |||
मुख्यालय | नवी दिल्ली, भारत | |||
प्रमुख व्यक्ती |
जे.आर.डी. टाटा (संस्थापक) रोहित नंदन (सी.इ.ओ.) | |||
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एअर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.
एके काळी भारतीय उपखंडामधील सर्वात मोठी विमानकंपनी असलेल्या एअर इंडियाचा एकूण वाहतूकीमध्ये ६० टक्के वाटा होता. परंतु सरकारी गैरवापर व अनास्था, आर्थिक संकटे, युनियन समस्या इत्यादींनी ग्रासलेली एअर इंडिया हळूहळू इतर खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेली. सप्टेंबर २००७ ते मे २०११ दरम्यान भारतीय विमानवाहतूकीमधील एअर इंडियाचा वाटा १९.२ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर घसरला. २०११ मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली व तिला आर्थिक संकटामधून बाहेर काढले. ह्याच वर्षी इंडियन एरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले. त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एअर इंडियाच्या आर्थिक तोट्यामध्ये लक्षणीय घट होत आहे. २०१४ मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमानसंघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
२०२२मध्ये टाटा उद्योगसमूहाने ही कंपनी विकत घेतली.
इतिहास[संपादन]
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जे.आर.डी. टाटा ह्यांनी १९३२ साली टाटा सन्स नावाची कंपनी स्थापन केली. एप्रिल १९३२ मध्ये टाटांना ब्रिटिश सरकारने हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याचे कंत्राट दिले. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांनी एक टपालविमान कराचीहून अहमदाबादमार्गे मुंबईच्या जुहू विमानतळावर स्वतः चालवत आणले. टाटा एरलाइन्सकडे सुरुवातीला केवळ दोन विमाने व एक वैमानिक होता. सुरुवातीच्या काळात कराची ते मद्रास दरम्यान टपालसेवा पुरवली जात असे. त्या वर्षी टाटांना टपालवाहतूकीमधून ६०,००० फायदा झाला. १९३७ सालापर्यंत हा फायदा ६ लाखांपर्यंत पोचला होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर २६ जुलै १९४६ रोजी टाटा एरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया ठेवण्यात आले व ती एक सार्वजनिक कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली भारत सरकारने एअर इंडियाचे ४९ टक्के समभाग विकत घेतले व त्याबदल्यात एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली. ८ जून १९४८ रोजी एअर इंडियाची मुंबईहून कैरो व जिनिव्हामार्गे लंडन हीथ्रो ही पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली गेली व १९५० साली नैरोबी सेवा सुरू झाली. २५ ऑगस्ट १९५३ रोजी भारत सरकारने एअर इंडियामधील आपली गुंतवणूक वाढवली व बहुसंख्य भागीदारी प्रस्थापित केली ज्यामुळे एअर इंडिया सरकारी कंपनी बनली. एअर इंडियाचे अधिकृत नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे ठेवण्यात आले. ह्याच वर्षी इंडियन एरलाइन्सची स्थापना करण्यात आली व एअर इंडियाची सर्व देशांतर्गत विमानसेवा इंडियन एरलाइन्सकडे वळवली गेली.
२१ फेब्रुवारी १९६० रोजी बोइंग कंपनीचे ७०७ विमान विकत घेऊन जेट विमान ताफ्यामध्ये आणणारी एअर इंडिया ही आशियामधील पहिली विमानकंपनी बनली. १४ मे १९६० रोजी एअर इंडियाने लंडनमार्गे न्यू यॉर्कच्या जे.एफ.के. विमानतळापर्यंत प्रवासी सेवा सुरू केली. १९६२ मध्ये कंपनीचे नाव पुन्हा बदलून संक्षिप्तपणे एअर इंडिया ठेवले गेले. १९७१ मध्ये एअर इंडियाने बोइंग ७४७ हे जंबो विमान आपल्या ताफ्यामध्ये सामील केले तर १९८६ मध्ये एरबस ए-३१० हे विमान घेतले. १९९३ मध्ये एअर इंडियाने दिल्ली ते न्यू यॉर्क ही विनाथांबा सेवा सुरू केली तर १९९६ मध्ये शिकागोच्या ओ'हेअर विमानतळापर्यंत सेवा चालू झाली.
१९९८ साली अटलबिहारी वाजपेयींचे मंत्रीमंडळ सत्तेवर आल्यानंतर एअर इंडियाच्या खाजगीकरणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला. परंतु २००१मध्ये सिंगापूर एरलाइन्ससोबत वाटाघाटी फिस्कटल्यानंतर खाजगीकरणाचे प्रयत्न थंडावले. ह्यादरम्यान एअर इंडियाने शांघाय, न्यूअर्क, लॉस एंजेल्स, वॉशिंग्टन इत्यादी अनेक मोठ्या विमानतळांवर सेवा चालू केल्या. परंतु वक्तशीरपणा, टापटीप, व्यावसायिकता इत्यादी बाबींमध्ये सातत्याने अपयशी ठरत राहिलेल्या एअर इंडियाची पीछेहाट चालूच राहिली. २००६-०७ मध्ये एअर इंडिया व इंडियन एरलाइन्स ह्यांचा एकत्रित तोटा तब्बल ७.७ अब्ज इतका होता. ह्या दोन्ही कंपन्यांचे चुकीच्या वेळी करण्यात आलेले एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर मार्च २००९मध्ये हा तोटा
७७ अब्जांवर पोचला व कंपनी बंद पडण्याचे संकट उभे राहिले. जून ते ऑगस्ट २०११ ह्या ती महिन्यांदरम्यान एअर इंडियाकडे कर्मचारी व वैमानिकांचा पगार तसेच कर्जावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी देखील निधी नव्हता. भारत सरकारने एप्रिल २००९मध्ये ३२ अब्ज तर मार्च २०१२ मध्ये ६७.५ अब्ज इतकी मदत केली. एअर इंडियाच्या आर्थिक पुनर्रचनेचे अनेक आखाडे बनवले गेले ज्यांमधील अनेक उपक्रम आजही चालू आहेत. २०१२ मधील एका सरकारी अहवालामध्ये एअर इंडियाचे अंशतः खाजगीकरण केले जावे असा प्रस्ताव मांडण्यात आला. आर्थिक तूट भरून काढण्याकरिता एअर इंडियाने आपल्या ताफ्यामधील अनेक विमाने विकली व पुन्हा भाड्याने घेतली.
मार्च २०१३ मध्ये ६ वर्षांच्या कालावधीनंतर एअर इंडियाने आर्थिक सुधारणा दाखवली. २०१३-१४ वित्तीय वर्षादरम्यान एअर इंडियाचा तोटा ४४ टक्क्यांनी घटला असून मिळकतीमध्ये २० टक्यांनी वाढ झाली आहे.
कंपनी रचना व कार्य[संपादन]
संस्था[संपादन]
एअर इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी एअर इंडियाची पालक कंपनी आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये एअर इंडिया व इंडियन एरलाइन्सचे एकत्रीकरण झाल्यानंतर एअर इंडिया लिमिटेडच्या अधिपत्याखाली केवळ ३ कंपन्या आहेत.
एअर इंडिया लिमिटेड | |||||||||||||||||||||
एअर इंडिया | एअर इंडिया एक्सप्रेस | एअर इंडिया रीजनल | |||||||||||||||||||
एअर इंडियाचे मुख्यालय नवी दिल्लीच्या इंडियन एरलाइन्स हाउस येथे आहे. २०१३ पर्यंत हे मुख्यालय मुंबईच्या मरीन ड्राइव्हवरील एअर इंडिया बिल्डिंग ह्या प्रसिद्ध २३ मजली इमारतीमध्ये होते. १९७४ साली बांधून झालेली एअर इंडिया बिल्डिंग एस्कलेटरचा वापर करणारी भारतामधील पहिली इमारत होती.
उपकंपन्या[संपादन]
एअर इंडिया रीजनल[संपादन]
१९९६ साली इंडियन एरलाइन्सची अलायन्स एअर ही कमी दरात वाहतूक पुरवणारी उपकंपनी स्थापन केली गेली. एअर इंडिया व इंडियन एरलाइन्सचे एकत्रीकरण झाल्यानंतर अलायन्स एअरचे नाव बदलून एअर इंडिया रीजनल असे ठेवले गेले. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हब असणारी एअर इंडिया रीजनल भारतातील २५ शहरांना सेवा पुरवते. सद्य घटकेला एअर इंडिया रीजनलच्या ताफ्यात ३ ए.टी.आर. ४२ तर २ बोम्बार्डिये सीआरजे७०० विमाने आहेत व ८ ए.टी.आर. ७२ विमानांची ऑर्डर दिलेली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस[संपादन]
२००४ साली स्थापन झालेली एअर इंडिया एक्सप्रेस ही एअर इंडियाची कमी दरात वाहतूक पुरवणारी उपकंपनी असून ती प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये कार्यरत आहे. ही कंपनी प्रामुख्याने मध्य पूर्व व आग्नेय आशियामधील शहरांसाठी दर आठवड्याला सुमारे १०० सेवा पुरवते.
एअर इंडिया कार्गो[संपादन]
१९५४ साली स्थापन झालेली एअर इंडिया कार्गो ही आशियामधील सर्वात पहिली मालवाहू विमानकंपनी होती. एअर इंडिया कार्गोकडे ६ विमाने होती व भारताच्या अनेक शहरांमध्ये ती मालवाहतूक करत असे. २०१२ साली एअर इंडियाच्या पुनर्रचनेदरम्यान एअर इंडिया कार्गो बंद करण्यात आली.
गंतव्यस्थाने[संपादन]
सध्या एअर इंडिया भारतामधील ६० तर ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप व उत्तर अमेरिका खंडांमधील ३१ शहरांमध्ये विमानसेवा पुरवते. लहान पल्ल्याच्या देशांतर्गत सेवेसाठी एरबस ए-३२० शृंखलेमधील विमाने वापरली जातात. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडिया प्रामुख्याने बोइंग ७७७ विमाने वापरते.
विमानांचा सद्य ताफा[संपादन]




विमान | वापरात | ऑर्डर | प्रवासी क्षमता | टीपा | |||
---|---|---|---|---|---|---|---|
F | C | Y | एकूण | ||||
एअरबस ए३१९-१०० | २२ | — | — | ८ | ११४ | १२२ | १० |
— | — | — | १४४ | १४४ | ५ विमाने भाडेतत्त्वावर | ||
एअरबस ए३२०-२०० | २५ | — | — | १६८ | १६८ | ६ विमाने विकली व पुन्हा भाडेतत्त्वावर घेतली. | |
— | २० | १२५ | १४६ | ||||
एअरबस ए३२०नीयो | ७ | ७ | NYA | ||||
एअरबस ए३२१-२०० | २० | — | — | २० | १५२ | १७२ | १२ विमाने विकली व पुन्हा भाडेतत्त्वावर घेतली. |
एअरबस ए३५०-९०० | — | २५ | TBA | ||||
बोइंग ७४७-४०० | ४ | — | १२ | २६ | ३८५ | ४२३ | २ विमाने विकली व पुन्हा भाडेतत्त्वावर घेतली. |
बोइंग ७७७-२००एलआर | ८ | — | ८ | ३५ | १९५ | २३८ | |
बोइंग ७७७-३००-ईआर | १२ | ३ | ४ | ३५ | ३०३ | ३४२ | [२] |
बोइंग ७८७ ड्रीमलायनर | २३ | ४ | — | १८ | २३८ | २५६ | ७ विमाने विकली व पुन्हा भाडेतत्त्वावर घेतली. |
अपघात व दुर्घटना[संपादन]
- १९५० चे दशक
- ३ नोव्हेंबर १९५० रोजी एअर इंडिया फ्लाईट २४५ मलबार प्रिन्सेस हे मुंबईहून लंडनला निघालेले व ४० प्रवासी व ८ चमू प्रवास करत असलेले लॉकहीड बनावटीचे विमान फ्रान्सच्या मॉंट ब्लॅंक पर्वतावर आदळले ज्यात सर्व मृत्यूमुखी पडले.[३][४]
- ११ एप्रिल १९५५ रोजी काश्मीर प्रिन्सेस हे मुंबईहून हॉंग कॉंग व जाकार्ताला निघालेले व ११ प्रवासी व ८ चमू प्रवास करत असलेले लॉकहीड बनावटीचे विमान हवेतच स्फोट होऊन दक्षिण चीन समुद्रात कोसळले ज्यात १६ मृत्यूमुखी पडले.[५]
- १९ जुलै १९५९ रोजी रानी ऑफ एरिया हे ३९ प्रवासी व ७ चमू प्रवास करत असलेले लॉकहीड बनावटीचे विमान मुसळधार पावसात मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावर उतर असताना धावपट्टीवरून पुढे घसरत गेले व कोसळले. ह्या अपघातात विमानाचे पूर्ण नुकसान झाले परंतु सर्व प्रवासी व चमू बचावले.
- १९६० चे दशक
- २४ जानेवारी १९६६ रोजी एअर इंडिया फ्लाईट १०१ कांचनगंगा हे मुंबईहून लंडनला निघालेले व १०६ प्रवासी व ११ चमू प्रवास करत असलेले बोइंग ७०७ बनावटीचे विमान फ्रान्सच्या मॉंट ब्लॅंक पर्वतावर आदळले ज्यात सर्व मृत्यूमुखी पडले. मरण पावलेल्या प्रवाशांमध्ये ख्यातनाम भारतीय शास्त्रज्ञ होमी भाभा ह्यांचा समावेश होता.
- १९७० चे दशक
- २५ डिसेंबर १९७४ रोजी एअर इंडिया फ्लाईट 105 ह्या मुंबईहून बैरूत, रोम व पॅरिस मार्गे न्यू यॉर्कला निघालेल्या बोइंग ७४७ बनावटीच्या विमानाचे एका ३१ वर्षीय प्रवाशाने अपहरण केले. परंतु चमूने अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन इटालियन पोलिसांच्या स्वाधीन केले.[६]
- १ जानेवारी १९७८ रोजी एअर इंडिया फ्लाईट ८५५ सम्राट अशोक हे मुंबईहून दुबईला निघालेले व १९० प्रवासी व २३ चमू प्रवास करत असलेले बोइंग ७४७ बनावटीचे विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच अरबी समुद्रात कोसळले ज्यात सर्व मृत्यूमुखी पडले.
- १९८० चे दशक
- २१ जून १९८२ रोजी एअर इंडिया फ्लाईट ४०३ गौरीशंकर हे मलेशियाहून मद्रासमार्गे मुंबईला येत असलेले व ९९ प्रवासी व १२ चमू प्रवास करत असलेले बोइंग ७०७ बनावटीचे विमान मुसळधार पावसात मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावर उतर असताना कोसळले. ह्या अपघातात २ चमू व १५ प्रवासी मरण पावले.[७][८]
- २३ जून १९८५ रोजी एअर इंडिया फ्लाईट १८२ सम्राट कनिष्क हे मॉंत्रियालहून लंडन व दिल्लीमार्गे मुंबईला येत असलेले व ३०७ प्रवासी व २२ चमू प्रवास करत असलेले बोइंग ७४७ बनावटीचे विमान बब्बर खालसा ह्या खलिस्तानवादी अतिरेकी संघटनेच्या सदस्यांनी एका बॉंबस्फोटामध्ये उडवले. हा हल्ला भारत सरकारने अमृतसरच्या सुवर्णमंदिरामध्ये पार पाडलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी केला गेला होता. फ्लाईट १८२ विमान आयर्लंडच्या कॉर्क शहरावरून जात असताना बॉबचा स्फोट झाला व विमान अटलांटिक महासागरात कोसळले. ह्या दहशतवादी हल्ल्यात सर्व प्रवासी व चमू मृत्यूमुखी पडले.[९] ह्या घटनेनंतर एअर इंडियाने मॉंत्रियाल सेवा बंद केली.
- १९९० चे दशक
- ७ मे १९९० रोजी एअर इंडिया फ्लाईट १३२ सम्राट विक्रमादित्य हे लंडनहून दिल्लीमार्गे मुंबईला चाललेले व १९५ प्रवासी व २० चमू प्रवास करत असलेले बोइंग ७४७ बनावटीच्या विमानाला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतर असताना आग लागली. ह्या अपघातात विमानाचे पूर्ण नुकसान झाले परंतु सर्व प्रवासी व चमू बचावले.[१०]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ [१]
- ^ "Aviation Safety Network: Air India incident at EWR". Archived from the original on 2014-10-06. २०१४-०६-०४ रोजी पाहिले.
- ^ "MALABAR PRINCESS". 17 June 2009 रोजी पाहिले.
- ^ "The "Malabar Princess" Catastrophe". Archived from the original on 2014-02-04. 17 June 2009 रोजी पाहिले.
- ^ "ASN Aircraft accident Lockheed L-749A Constellation VT-DEP Great Natuna Islands". Aviation-safety.net. Archived from the original on 2009-08-25. 10 June 2010 रोजी पाहिले.
- ^ "ASN Aircraft accident Boeing 747-237B registration unknown Roma-Fiumicino Airport (FCO)". Aviation-safety.net. Archived from the original on 2013-11-04. 2014-05-04 रोजी पाहिले.
- ^ "Accident Database: Accident Synopsis 06221982". airdisaster.com. Archived from the original on 16 June 2008. 2020-05-25 रोजी पाहिले.
- ^ "Air India plane crashes". www.airsafe.com. 2020-05-25 रोजी पाहिले.
- ^ "Indepth: Air India" (इंग्रजी भाषेत). CBC News. Archived from the original on 2007-05-02. ८ मे २००७ रोजी पाहिले.
- ^ "ASN Aircraft accident Boeing 747-237B VT-EBO Delhi-Indira Gandhi International Airport (DEL)". Aviation-safety.net. Archived from the original on 2009-08-22. 10 June 2010 रोजी पाहिले.