जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काश्मीर रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग
प्रदेश जम्मू आणि काश्मीर
मालक भारतीय रेल्वे
चालक उत्तर रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ३४५ किमी (२१४ मैल)
ट्रॅकची संख्या
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण नाही
मार्ग नकाशा
जम्मू-बारामुल्ला मार्गाचा नकाशा. यातील उधमपूर-काझीगुंड हा भाग अजून बांधला जात आहे.

साचा:जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग

श्रीनगर रेल्वे स्थानक

जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग (उर्दू:کشمیر ریلوے) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल.

भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला शहरामध्ये सुरू होणारा हा मार्ग श्रीनगर, अनंतनाग, उधमपूर इत्यादी शहरांमधून वाट काढत जम्मू येथे संपतो. जम्मूमधील जम्मू तावी स्थानकापर्यंत उत्तर रेल्वेचे जाळे विकसित असल्यामुळे काश्मीर रेल्वेमार्गामुळे काश्मीरसाठी भारताच्या सर्व भागांमधून रेल्वे प्रवास सुलभ होईल.

एकूण ३४५ किमी लांबीच्या ह्या मार्गावरील बारामुल्ला ते बनिहाल हा १३० किमी लांबीचा व जम्मू ते कटरा हा ७८ किमी लांबीचा अशा दोन स्वतंत्र पट्ट्यांचे काम पूर्ण झाले असून ह्या मार्गांवर वाहतूक सुरू आहे. बनिहाल ते कटरा ह्या १३० किमी लांबीच्या सर्वात दुर्गम पट्ट्याचे बांधकाम सुरू असून ते २०२० मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. ह्या मार्गावरील काम अत्यंत कठीण असून येथे एकूण ६२ पूल व अनेक बोगदे अपेक्षित आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ४ जुलै २०१४ रोजी कटरा ते नवी दिल्ली श्री शक्ती एक्सप्रेस ह्या गाडीचे उद्घाटन केले. कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ह्या स्थानकामुळे वैष्णोदेवीला भेट देणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.

तपशील[संपादन]

ह्या मार्गावरील रियासी जिल्ह्यात बांधण्यात येत असलेला चिनाब पूल

जम्मू-बारामुल्ला मार्ग साधारण ४ पट्ट्यांत विभागला गेला आहे.

  • पट्टा ० जम्मू ते उधमपूर (५३ किमी लांबी): हा मार्ग २००५ साली बांधून पूर्ण झाला.
  • पट्टा १ उधमपूर ते कटरा (२५ किमी लांबी): हा मार्ग २०१४ साली बांधून पूर्ण झाला. ह्यामुळे वैष्णोदेवीच्या पायथ्याशी असलेले कटरा शहर रेल्वेमार्गाद्वारे उर्वरित भारतासोबत जोडले गेले. ह्या मार्गावर ७ बोगदे व ३० लहानमोठे पूल आहेत.
  • पट्टा २ कटरा ते बनिहाल (१४८ किमी लांबी): संपूर्ण मार्गावरील सर्वाधिक खडतर असलेल्या ह्या पट्ट्याचे बांधकाम अजून सुरू आहे व २०२० पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित नाही. ह्या मार्गाच्या जोडणीमध्ये अनेकदा बदल घडून आले आहेत व अजूनही संपूर्ण मार्गाचे स्थान ठरलेले नाही. अत्यंत दुर्गम भागातून वाट काढत बांधला जत असलेला हा मार्ग जगातील सर्वात अवघड बांध्काम प्रकल्पांपैकी एक आहे. ह्या मार्गावर ६२ पूल व अनेक बोगदे अपेक्षित आहेत. काझीगुंड ते बनिहाल ह्या १८ किमी लांबीच्या टप्प्याचे काम जून २०१३ मध्ये पूर्ण झाले. ह्याच टप्प्यावर पीर पंजाल रेल्वे बोगदा हा ११.२१५ किमी लांबीचा भारतातील सर्वाधिक लांब बोगदा स्थित आहे.
  • पट्टा ३ बनिहाल ते उधमपूर (११२ किमी): ह्या पट्ट्याचे बांधकाम २००९ साली पूर्ण झाले.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]