गौतम बुद्ध
| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. |
गौतम बुद्ध( रोमन लिपी:Siddhārtha Gautama संस्कृत: सिद्धार्थ गौतम पाली: सिद्धार्थ गौतम ) बुद्ध धर्माचा संस्थापक सिद्धार्थ गौतम हा भारतीय उपखंडाच्या उत्तर विभागातील अध्यात्मिक गुरू. बौद्ध मतानुयायी याला वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. त्याच्या जन्माचा व मृत्यूचा नेमका काळ निश्चितपणे सांगता येत नाही. विसाव्या शतकातल्या इतिहासकारांच्या मते, इ.स.पू. ५६३ ते इ.स. पू. ४८३ हा त्याचा जीवन काळ. अलीकडील काळातील संशोधक विद्वानांनी ठामपणे व्यक्त केलेल्या मतानुसार, बुद्धाच्या मृत्यूचा सन इसवी पूर्व 400 च्याही अल्याड किंवा पल्याड 20 वर्षे असा असावा, तथापि यावरही मतैक्य नाही. शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) -हे गौतमाचेच दुसरे नांव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्याची जीवनकहाणी, त्याची प्रवचने, आणि त्याने घालून दिलेले मठवासाचे नियम पवित्र मानून अनुयायांनी त्याच्या मृत्यू नंतर संकलित केले आणि मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केले . गौतमबुद्धाच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकीचा ठेवा पाठांतराद्वारे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे सुपूर्द होत गेला. त्याच्या मृत्यू नंतर साधारण 400 वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेला. या लिखाणात प्रस्तुत केलेले बुद्ध चरित्र ऐतिहासिक सत्य म्हणून मानण्याचा पूर्वीच्या पाश्चिमात्य विद्वानांचा दृष्टिकोन आताच्या विद्वानांच्या फारसा पचनी पडत नाहीस दिसते. नवे विद्वान या लिखाणातून प्रतीत होणारे बुद्धाचे चरित्र व शिकवण सरसकटपणे इतिहास म्हणून मानण्यास तयार नाहीत.
अनुक्रमणिका |
जीवनपट [संपादन]
सिद्धार्थ गौतम विषयीच्या महितीचा मुख्य स्त्रोत म्हणजे बौद्ध वाङमय. बुद्ध आणि त्याचे अनुयायी दरसाल चार महिने त्याच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धाच्या मृत्यू पश्चात लगेचच आणि मग एका शतकानंतर, अनुयायांनी एक संसद बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. या संसदेतील, कांही नियमांनुसार, हे साधु बुद्ध जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधु कडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, मौखिक जतनाने हा ऐतिहासिक ठेवा पिढ्यानुपिढ्या पुढे चालत राहिला. उपलब्ध पुराव्या नुसार, दुसऱ्या संसद दरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धाची शिकवण लेखी रुपात येण्यासाठी बुद्ध मृत्युनंतर तीन ते चार शतके जावी लागली. दरम्यान, बुद्धास अधिक मोठेपण देण्याच्या हेतूने त्यात कांही विश्वस्तांनी फेरबदल ही केले.
एकूण भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, बुद्ध जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदी ऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विषद करण्यात आले. या नोंदींनुसार तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते.
जन्म [संपादन]
सिद्धार्थाचे जन्मस्थळ- लुंबिनी आणि त्याचे बाळपण गेले ती कपिलवस्तू राजधानी , सध्याच्या नेपाळमध्ये पडतात. त्या काळी हा भाग वैदिक संस्कृतींच्या परीघा बाहेरचा होता. कदाचित त्याची मातृभाषा इंडो-आर्यन भाषांपेक्षा निराळी ही असावी. त्याच्या समाजरचनेत जातिव्यवस्था नव्हती, राजपद नव्हते, व ब्राह्मणी समाजव्यवस्थाही नव्हती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध धर्मीय वाङमय नुसार, त्याचा पिता राजा शुद्धोदन शाक्य या कोशल प्रांती वास करणाऱ्या प्राचीन जमातीचा राजा होता, अणि गौतम हे त्यांच्या घराण्याचे नांव होते. लोक कथेनुसार शुद्धोदन हा सूर्यवंशीय इक्ष्वाकू घराण्याचा वंशज हेता. राजा शुद्धोदनाची पत्नी राणी महामाया किंवा मायादेवी ही सिद्धार्थाची आई. त्याच्या जन्माच्या 10 चांद्रमासां पूर्वी, मायादेवीस एक शुभसूचक स्वप्न पडले. त्यात, एक सहा सोंडांचा शुभ्र हत्ती तिच्या उजव्या कुशीत शिरला. गर्भवती असताना अनेक शुभचिन्हे अनुभवत, शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी मायादेवी बाळंतपणासाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसक म्हणून साजरा करतात. सिद्धार्थ जन्मानंतर, किंवा सात दिवसांनंतर राणी मायादेवी निजधामास पोहोचली. बाळाचे नांव सिद्धार्थ (म्ह. आपले ध्येय सार्थ करणारा ) असे ठेवण्यात आले. त्याचे दर्शन घेण्यास पर्वतांतल्या वास करणारा विजनवासी असा एक असित नामक सिद्ध तेथे दूरवरून तेथे उपस्थित झाला. बाळाने आपला पाय या योग्याच्या कोसांवर ठेवला, तेव्हा त्याचा तळ पाय आणि त्यावरील शुभ चिन्हे पाहताच त्याने भविष्यवाणी वर्तविली, की हा मुलगा एक तर चक्रवर्ती राजा होईल, अन्यथा एक महान योगी होईल.
पाचव्या दिवशी बारसे करण्यासाठीच्या समारंभी राजा शुद्धोदनाने आठ विद्वान ब्राह्मणांस भविष्य सांगण्यासाठी पाचारण केले. साऱ्यांनी एकमताने भाकीत वर्तविले, की हा एक महान राजा होईल किंवा महान योगी होईल. या आठां पैकी सर्वांत धाकट्या अशा एकट्या कौंडिण्यने ( जो पुढे प्रथम अरहंत बनला,) नि:संदिग्धपणे सांगितले, की राजा बीजा नव्हे, तर हा पुढे बुद्धच होईल.
प्रारंभिक आयुष्य आणि विवाह [संपादन]
राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मत:च प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – महापजापती गौतमीने पोटच्या पोरा प्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजांतवैभव आणि राज सुलभ अशा सुख वैभवाचा जणी कांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केलेला होता. सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग त्याने बांधलेला होता. “महान योगी” होण्यापासून रोखण्यासाठी, दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये , धार्मिक वा अध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ आकांक्षा होती. सोळावे वर्ष प्राप्त झाल्यावर शुद्धोदनाने त्याचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले. धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्नी, राजस पुत्र. सौख्यास कांहीही कमी नाही अशी 29 वर्षे सिद्धार्थाचे आयुष्य पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत गतिमान होते.
गृहत्याग आणि तपस्या [संपादन]
लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या -चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या साऱ्या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या मर्यादित जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपलं सुख हा अपवाद आहे आणि जग दु:खात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला. आणि एक संन्यासी त्याने पाहिला. त्याची झोप उडाली, सुखात मन रमेना झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते, पति म्हणून अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राज वाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंथक नामक घोड्यासह उभा होता. देवगणांनी कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खुर कापडात बांधले होते.
सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला. या संन्याशाला मगध देशाचा राजा बिंबिसारा याच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.
ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरुंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांस ही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग तो चालू लागला.
सिद्धार्थ आणि इतर पांच सह संन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्न पाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरूवात केली.या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला. सिद्धार्थाने मध्यममार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करुनच आत्मबोध होउ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर रहायला हवे, हा तो मध्यम मार्ग. शरीर धारणेपुरते अन्न –थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला. त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती, की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता. मग एके दिवशी, बोधगया येथे एका अश्वत्थ(पिंपळ) वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईतो न उठण्याचा निश्चय केला. त्याच्या सोबत्यांच्या मनाने घेतले, की सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे, सबब त्याला सोडून ते निघून गेले. 49 दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर ,वयाच्या 35 व्या वर्षी बोधीवृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली. चांद्रमासांपैकी, काही विद्वानांच्या मते तो पांचवा महिना होता, काहींच्या मते तो बारावा महिना होता. इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले
हिंदू परंपरेने बुद्ध हा विष्णूचा अवतार मानला जातो. बौद्ध धर्मानुसार बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही. बुद्ध हे स्वतः मी मानवाचा पुत्र आहे सांगत . इतरांप्रमाणे मी देव अथवा देवपुत्र आहे , असा त्यांनी कधी प्रचार केला , अशी इतिहासात नोंद नाही .[२]
बुद्ध संस्कृती [संपादन]
ही संस्कृती जगाचे विविध देश जसे- श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड ब्रम्हदेश येथे पसरली.तेथे गौतम बुद्धाचे अनेक पुतळे निर्माण केल्या गेले. तथागत बुद्ध यांच्या सिंह मुद्रा,ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा,आशीर्वाद मुद्रा,भूमिस्पर्श मुद्रा,उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत.पुणे येथे त्यासंबंधी एक 'आर्य नागार्जुन' संग्रहालयही आहे.ते बुद्ध संस्कृती आणि संशोधन संस्था पुणे तर्फे संचालित करण्यात येते.
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- गौतम बुद्ध इन आउर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)
|
|||||||