तेलुगू भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तेलगु या पानावरून पुनर्निर्देशित)
तेलुगू
తెలుగు
स्थानिक वापर भारत, मॉरिशस, मलेशिया, अमेरिका, कॅनडा
प्रदेश आंध्र प्रदेश,तेलंगणा,तमिळनाडू, पॉंडिचेरी, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, ओरिसा, छत्तीसगड.
लोकसंख्या ७,४२,००,००० (प्रथमभाषा)
(द्वितीयभाषा)
क्रम २०, १६ १५(प्रथम भाषा)
बोलीभाषा आंध्रबोली, रायलसीमा, तेलंगाणा.
भाषाकुळ
द्राविडी
लिपी तेलुगू
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

भारत ध्वज भारत

भाषा संकेत
ISO ६३९-१ te
ISO ६३९-२ tel
भाषिक प्रदेशांचा नकाशा

तेलुगू ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने भारतीय उपखंडात बोलली जाणारी, द्राविड भाषाकुळातील भाषा आहे. भारतातील आंध्र प्रदेशतेलंगणा या राज्यांची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील एक भाषा आहे. लोकसंख्येनुसार तेलुगू ही भारतातील बोलली जाणारी (हिंदी, मराठीच्या खालोखाल) तिसरी भाषा आहे. बंगालच्या विभाजनाआधी तेलुगू भाषेचा तिसरा क्रमांक होता . तेलुगू भाषेला भारत सरकारने अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळविणाऱ्या ओरिया, कन्नड, तमिळ, मल्याळमसंस्कृत या आणखी पाच भाषा आहेत.

तेलुगूभाषी प्रदेश[संपादन]

तेलुगू भाषा भारतासह मॉरिशस , अमेरिका ,पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलियान्यू झीलंड या देशांत बोलली जाते. भारतात ती मुख्यत्वे आंध्र प्रदेश राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर केरळ, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडूछत्तीसगढ या राज्यांत, तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागांत बोलली जाते.

तेलुगूच्या इतिहासाचे कालखंड[संपादन]

१. अज्ञात काळ - इ.स. ५००ते १०००
२. पुराण काळ - इ.स. १००० ते १४००
३. काव्यप्रबंध काळ - इ.स. १४०० ते १६५०
४. ऱ्हास काळ - इ.स. १६५१ ते १८५०
या कालखंडात विजयनगरचे साम्राज्य मोडले. आंध्र प्रदेश छोट्या छोट्या राज्यांत विभागला गेला. साहित्य कृत्रिम आणि तकलुपी बनले. कवींना राजाश्रय नाकारला जाऊ लागला. तेलुगू भाषेत गद्यलेखन सुरू झाले. ऱ्हासाच्या काळातच वेंकट कृष्णप्पा नावाच्या पहिल्या गद्यकाराने ’जेमिनी भारत’ या नावाचा ग्रंथ लिहिला. असे असले तरी याच काळात त्यागराज आणि क्षेत्रय्या हे दोन कवीही झाले.
५. आधुनिक काळ - इ.स. १८५०पासून पुढे

तेलुगू भाषेतील महाकवी[संपादन]

१. अन्नमाचार्य (इसवी सनाचे १५वे शतक) : अन्नम्माचार्य या कवीने तेलुगूच्या बोलीभाषेत तिरुपतीच्या लीलावर्णनाची ३२००० पदे रचली असे सांगतात. त्या पदांपैकी १३०० पदे उपलब्ध आहेत.
२. अलसानि पेद्दन्ना (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध) : या कवीने 'मनुचरित्र' नावाचे काव्य रचले. ती कथा त्याने मार्कंडेय पुराणातून घेतली होती. सर्व दृष्टीने अप्रतिम वठलेल्या या काव्याने राजा कृष्णदेवराय इतका प्रभावित झाला की त्याने पेद्दन्नाला आंध्रकवितापितामह अशी पदवी प्रदान दिली.
३. तिक्कन्न सोमय्याजी (इ.स. १२२० ते १२९०) : नन्नय्याच्या महाभारताचे अपुरे काम १३व्या शतकातल्या तिक्कन्न सोमयाजी या महाकवीने पुढे नेले. तिक्कन्न हा गौतम गोत्री आपस्तंब ब्राह्मण होता. तो नेल्लोर जवळच्या रंगनाथस्वामींच्या मंदिराजवळ राहात असे. नेल्लोरचा राजा मनुमसिद्धीने तिक्कन्नाची विद्वत्ता पाहून त्याला आपल्या पदरी आश्रय दिला. तिक्कन्न राजाचा मंत्री, सेनापती व राजकवी झाला. या तिन्ही कामगिऱ्या त्याने यशस्वीरीत्या पार पाडल्या. राज्यावर आक्रमण झाले असता तिक्कन्नाने वरंगलच्या गणपतिदेव राजाच्या मदतीने आक्रमण परतून लावले.

तिक्कन्नाने सोमयाग केला म्हणून लोक त्याला तिक्कन्न सोमय्याजी म्हणू लागले. गणपती काकतीय या विद्वानाने आंध्रात एकदा एक वादसभा भरवली होती. तिक्कन्नाने त्या सभेत भाग घेऊन जैन आणि बौद्ध पंडितांचा पराभव करून वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले.

तिक्कन्नाचे तेलुगू आणि संस्कृत या दोनही भाषांवर प्रभुत्व होते. सोमयाग केल्यावर तिक्कन्नाने, नन्नय्याने अपुरे ठेवलेल्या महाभारताच्या तेलुगू अनुवादाचे काम सुरू केले. नान्नय्या ज्याचा अनुवाद करता करता मरण पावला, ते वनपर्व हे अशुभ पर्व आहे या समजुतीने त्याने ते तसेच अर्धवट ठेवून विराट पर्वापासून ते शेवटच्या पर्वापर्यंतचे भाषांतर पूर्ण केले. तिक्कन्नाचा हा पराक्रम पाहून मनुमसिद्धी राजाने त्याला कविब्रह्म अशी पदवी दिली.
४. त्यागराज (इ.स. १७६७ ते १८४७)
५. नान्नय्यभट्ट (पुराणकाळ)
पुराणकाळाच्या प्रारंभी चालुक्य नरेश राजराज हा आंध्र प्रदेशावर राज्य करीत होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेत पंडित असलेला नान्नय्यभट्ट, हा त्या राजराज राजाचा कुलगुरू होता. हा राजा जेव्हा गादीवर आला तेव्हा प्रजाजन वैदिक धर्मातील श्रेष्ठ तत्त्वे विसरून विकृत धर्मकल्पनांच्या आहारी गेले होते. या गोष्टीने चिताक्रांत झालेल्या राजाने नान्नय्यभट्टाला सल्ला विचारला. नान्नय्याने सुचवले की महाभारताचे तेलुगू भाषांतर करावे, म्हणजे ते वाचून लोकांना खऱ्या धर्माचे ज्ञान होईल. राजाने नान्नय्यानेच भाषांतर करावे अशी इच्छा व्यक्त केली. नान्नय्याला जाणवले की त्या काळची तेलुगू भाषेसाठी सुबद्ध व्याकरण नसल्याने महाभारताचा अनुवाद करण्यास असमर्थ आहे. तेव्हा नान्नय्याने ’आंध्रशब्दचिंतामणि’ आणि ’लक्षणसार’ हे दोन ग्रंथ निर्माण केले, आणि त्यांत तेलुगूमधील सगळी शब्दसंपदा एकत्र केली. नंतर नान्नय्यभट्ट महाभारताच्या अनुवादाच्या कामाला लागला. त्याने महाभारतातील आदिपर्व आणि सभापर्व याचे भाषांतर पूर्ण केले, मात्र तिसरे वनपर्व अर्धे झाले असतानाच नान्नय्याला मृत्यूने गाठले. महाभारत अर्धवट राहिले खरे, पण झालेला अनुवाद इतका सरस होता की नान्नय्याला तेलुगूचा आदिकवी अशी उपाधी प्राप्त झाली. अर्धवट राहिलेले भाषांतर पुढे तिक्कन्न सोमय्याजी आणि यर्रापगड यांनी पुरे केले.
६. पालकुरती सोमनाथ (इसवी सनाचे १४वे शतक)
७. पिंगळी सूरन्न (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध)
८. बम्मेर पोतन्न (इ.स. १४०५ ते १४७०)
९. भद्रभूती
१०. भास्कर कवी (इसवी सनाचे १४वे शतक) : भास्कर कवी आणि त्यांचे अनेक शिष्य यांनी १४व्या शतकात चंपू पद्धतीने रामायण कथा पूर्ण केली. या रामायणाला 'भास्कर रामायण' म्हणतात. आंध्रात गावोगावच्या मंदिरांतून आणि घरोघरीही हे रामायण वाचले जाते.
११. यर्राप्रगड (इसवी सनाचे १४वे शतक)
नान्नय्यभट्टाचे महाभारताचा तेलुगू अनुवाद करायचे अपुरे काम तिक्कन्न सोमय्याजीने १३व्या शतकात पुरे करत आणले. पण जे लिहीत असताना नान्नय्याचा मृत्यू ओढवला ते वनपर्व अशुभ असावे, अशा समजुतीने तिक्कन्न सोमय्याजीने वनपर्व अर्धवटच ठेवले. त्या पर्वातील २९०० पैकी १६०० श्लोकांचे भाषांतर झाले नव्हते. त्यासाठी १४ वे शतक उजाडावे लागले. त्या शतकात निपजलेल्या व अन्नवेम्मा रेड्डी या राजाच्या आश्रयाला असलेल्या यर्राप्रगड कवीने वनपर्वाचे काम पूर्ण केले. मात्र श्लोकरचना न करता त्याने वनपर्वाचा अनुवाद प्रबंधरचनेत (निर्मळ प्रासादिक अशा गद्यात) केला. तिक्कन्ना आणि यर्राप्रगड यांची भाषाशैली इतकी एकसारखी आहे.की, दोघांच्या रूपांतरातला फरक सांगणे कठीण आहे. यर्राप्रगडला लोक प्रबंधपरमेश्वर म्हणू लागले, आणि नन्नय्य, तिक्कन्न आणि यर्राप्रगड यांना कवित्रय असे नाव पडले.
१२. वेमन्न (इसवी सनाचे १५वे शतक)
१३. श्रीनाथ (इ.स. १३८० ते १४६०)
काव्यप्रबंध काळाचा मुकुटमणी. लहानपणीच श्रीनाथाने तेलुगू व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि तो थोडीफार कविताही करू लागला होता. तरुणपणी याने श्रीहर्ष कवीच्या नैषधीय या संस्कृत महाकाव्याचा तेलुगू अनुवाद केला. त्या अनुवादित ग्रंथाला ’शृंगार नैषध’ असे म्हणतात. तेलुगूतल्या पाच महाकाव्यातले हे एक आहे. या काव्याने श्रीनाथ कवीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि कोंडविच्डू या राजाकडे आश्रयही. राजाने त्याची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली.
इ.स. १४२५ च्या सुमारास श्रीनाथने राजाश्रय सोडला आणि तो देशाटनाला निघाला. प्रवासातच त्याने ’हरविलाससमु’ नावाचे काव्य रचले. त्या काव्यात शिवलीलांचे मनोहर वर्णन केले आहे. पुढे श्रीनाथ विजयनगरला गेला. त्यावेळी तेथे कृष्णदेवराय गादीवर होता. त्याच्या दरबारात असताना श्रीनाथने, गौड डिंडिमभट्ट नावाच्या कवीला शास्त्रार्थात हरविले. या विजयामुळे श्रीनाथला कविसार्वभौम ही पदवी मिळाली. राजाने त्याचा सुवर्णाभिषेकही केला.
त्यानंतर श्रीनाथ तेलंगणातील राचकोंडाचा राजा सर्वज्ञसिंगम याच्या दरबारी आणि नंतर राजमहेंद्रवरम्‌‍च्या वीरभद्र रेड्डी या राजाच्या आश्रयाला गेला. तेथे त्याने ’भीमखंड’,’काशीखंड’ आणि ’पल्नाडि वीरचरित्रमु’ ही काव्ये रचली. या शेवटच्या काव्यात श्रीनाथाची प्रतिभा सर्वोच्चबिंदूला पोचली होती. या कवीचे बहुतेक आयुष्य मानमरातबात आणि वैभवविलासात गेले.
१४. क्षेत्रय्या (इसवी सनावे १७वे शतक)
हा कृष्णा जिल्ह्यातल्या मौव नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मला. लहानपणी याचे नाव वरदय्या होते. त्याला तेलुगू व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. कुचिपुडी या गावाला येऊन त्याने संगीत आणि नाट्य या विषयांचे अध्ययन केले, व नंतर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यामुळे लोक त्याला क्षेत्रय्या म्हणू लागले.
पुढे तंजावरच्या विजयराघव नावाच्या राजाकडे क्षेत्रय्याला आश्रय मिळाला. तेथे राहून त्याने खूप काव्यरचना केली. तो पराकाष्ठेचा श्रीकृष्णभक्त होता. त्याची भक्ती अर्जुनाप्रमाणे सख्ख्या भावासारखी आणि त्याचवेळी राधेप्रमाणे पत्नीभावाची होती. आयुष्यभर त्याने श्रीकृष्णाची मधुराभक्ती केली. श्रीकृष्णाने क्षेत्रय्याला एकदा दर्शन दिले, असे म्हणतात.
आजही आंध्र प्रदेशात आणि तमिळनाडूत क्षेत्रय्याचे काव्य लोकप्रिय आहे. त्याने हजारो पदे रचली असली तरी त्याला शिष्यपरंपरा न लाभल्याने त्याची बरीचशी काव्यरचना काळाच्या ओघात लुप्त झाली.

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत