गिरणा धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिरणा धरण
अधिकृत नाव गिरणा धरण
धरणाचा उद्देश सिंचन
बांधकाम सुरू १९५५
उद्‍घाटन दिनांक १९६९
बांधकाम खर्च १३ कोटी रुपये

गिरणा धरण हे भारतातल्या पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातले एक धरण आहे. १९५५ मध्ये धरण बांधकामासाठी कुदळ मारली गेली. १४ वर्ष सलग काम झाल्यावर १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण झाले. चाळीसगाव शहराच्या पश्चिमेला ४० कि.मी.वर नांदगाव तालुक्यात हे महाकाय गिरणा धरण आहे. गिरणा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असला तरी सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो.

धरणाची माहिती[संपादन]

गिरणा धरण हे २१५० कोटी घनफूट साठवण क्षमतेचे आहे. प्रकल्पांसाठी १३ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. १ हजार ४०० फूट दगडी तर १ हजार ७६० मातीचे बांधकाम आहे. धरणाची नदीपातळीपासूनची उंची १३३ इंच तर समुद्रसपाटीपासून १३१८ इंच असून १८५० कोटी घनफूट उपयुक्त तर ३०० कोटी घनफूट मृतसाठा निर्धारित केला आहे. १३ हजार ५५० एकर बुडीत क्षेत्रात धरणाचा विस्तार व्यापला असून १ लाख ४१ हजार ३६४ एकर सिंचन क्षेत्राला धरणाने हिरवळ प्रदान केली आहे. कालव्यामुळे २ लाख ६३ हजार ३७७ एकर क्षेत्र ओलिताखाली येते.धरणाची ऐकून पाणी साठवन क्षमता 22 टी.एम.सी आहे.

सिंचन आणि पाणी पुरवठा[संपादन]

गिरणा धरणापासून निघालेला डावा पांझण कालवा ५३ कि.मी. लांबीचा, उजवा जामदा २० कि.मी.चा, डावा जामदा ४०चा तर निम्न गिरणा काठ कालवा ६० कि.मी. लांबीचा आहे. या कालव्यांमुळे गिरणा खोऱ्याला सुपीकता व समृद्धता लाभली आहे. तथापि कालव्यांपासून होणारी गळती, पाटचा‍ऱ्यां दुरुस्तीची गरज हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. याबाबत गिरणा पाटबंधारे विभागाचे सतत दुर्लक्ष होत आहे. मालेगाव शहर, चाळीसगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा एकूण १२७ पाणीपुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हा एकमेव जिवंत पाण्याचा स्रोत आहे. मात्र याच योजनांद्वारे जळगाव जिल्ह्याच्या जवळपास पाऊण भागातील लोकसंख्येची तहान भागते. बिगर सिंचनासाठी धरणाचे पाणी दहीगाव बंधाऱ्यापर्यंत प्रवास करते. पिण्यासाठी २ महिन्यांतून एकदा पाणी सोडले जाते.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे