मराठीतील बोलीभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवनागरी लिपीत मराठी

भारत देशात मराठी बोलणारी माणसे भारताच्या जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत.

जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची पोटभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.

पिढ्या न्‌ पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या यांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे 'मी मराठी बोलतो' असे कुणी विधान केले तर 'कुठली मराठी बोलता?' असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे कोंकणी मराठी, कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार कानांवर पडत. भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर,बागलाणी, नंदुरबारी, खालल्यांगी, वरल्यांगी, ताप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात.

आदिवासी पोटभाषा[संपादन]

महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या पोटभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी पोटभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने विदर्भात आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात व आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतही गोंडी बोली बोलली जाते. महाराष्ट्रातील आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते. गोंडी बोलीला लिपी असल्याचे पुरावेही अलीकडचे काही संशोधक देत आहेत. गोंडी बोलीभाषेचा बारकाईने अभ्यास करणारा जर्मन भाषातज्ञ जूल ब्लाॅच याने गोंडी बोलीची आंतरराष्ट्रीयता शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता. द्राविडी भाषासमूहातील कोणत्याही भाषेची अभिन्न वैशिष्ट्ये धारण करणारी गोंडी ही एकमेव प्राचीन भाषा आहे असे मत काॅल्डवेलने गोंडी भाषेच्या सात वैय्याकरणीय कसोट्या लावून मांडले होते.

भिल्ली भाषा गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये बोलली जाते. या पोटभाषेवर त्या त्या राज्यांच्या प्रमाण भाषेचा प्रभाव असल्याने महाराष्ट्रात ती मराठीची पोटभाषा म्हणून गणली जाते.

समूहानुसार होणारे उपप्रकार[संपादन]

नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडिया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, 'आरे मराठी', जिप्सी बोली, कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, ढोर-कोळी/टोकरे कोळी (खानदेश) घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, वडारी, वैदू, दखनी उर्दू, बेलदार-गोलकर, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी,चित्पावनी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, गोंडी, लेवा, डांगी,वाडवळ / वडवली/ळी, कैकाडी,अहिराणी, कदोडी / सामवेदी, तावडी, तडवी, आगरी, देहवाली, जुदाव, महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, गुजरी, वगैरे.

  • खानदेशी किंवा अहिराणी- महाराष्ट्रातील सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी बोलीभाषा ही खानदेशी आहे. आणि गंमत म्हणजे ह्या भाषेचे अजून दोन प्रकार पडतात. जसे की अहिराणी(धुळे,जळगाव, नंदुरबार), बागलानी (नाशिक) अहिराणी भाषेला खूप समृद्ध असा वारसा आहे. ह्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे अहिराणी भाषेतील लोकगीते आणि काही गाजलेली गाणी.
महत्वाचे म्हणजे अहिराणी भाषेत हिंदी आणि गुजरातीचा प्रभाव जास्त आहे आणि बागलानी भाषेत मराठीचा जास्त प्रभाव दिसतो.
  • बागलाणी- बागलाणी ही अहिराणी भाषा आहे. फक्त ह्या भाषेत मराठी भाषेचा प्रभाव जास्त आहे. बागलाण हा नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष आणि डाळिंब पिकवणारा प्रांत म्हणून प्रसिद्ध आहे. मराठा साम्राज्यातील हा एक महत्त्वाचा प्रांत होता. येथे तुम्हाला मराठा साम्राज्यातील आणि शिवाजी महाराजांचे महत्वाचे किल्ले बघावयास मिळतात.

उदा. साल्हेर (महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला) यांत सटाणा,मालेगाव,देवळा आणि कळवण या तालुक्यांचा समावेश होतो. सटाणा तालुक्याचे अधिकृत नाव हे बागलाण आहे. मराठा, माळी, सुतार, कुंभार, धनगर, गवळी ह्या सर्व जातींची भाषा ही ह्या परिसरात बागलाणी आहे.

  • बंजारा - काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज वास्तव्यास असून स्वतंत्र भाषा व स्वतंत्र संस्कृतीमुळे बंजारा समाज जगभर ओळखल्या जातो. त्यांच्या मातृभाषेला 'बंजारा भाषा', 'बंजारी भाषा' असे म्हणतात. इंडो आर्यन वर्गातील ही राजस्थानी प्रभावीत असलेली प्राचीन काळापासून बोलली जाणारी भाषा आजही टिकून आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा , विदर्भात ही भाषा मोठ्याप्रमाणात बोलल्या जाते. या भाषेतून पुस्तक , सिडीज निर्मिती होतांना दिसून येते. भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न होतांना दिसते.
  • मराठवाडी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील धाराशिवलातूर जिल्ह्य़ात ही बोलीभाषा वापरली जाते. काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेचाचा परिणाम होतो परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. 'लाव', 'लास', 'आव' या स्वरूपाचे कारकवाचक प्रत्यय या बोलीचे वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, चाल्लास, ठिवताव इत्यादी.
  • मालवणी - दक्षिण रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धी पावली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्टय़पूर्ण शब्द आहेत. जसे की, झिल (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
  • झाडीबोली - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्य़ांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराजकृत 'विवेकसिंधू'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
  • नागपुरी - पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांचे काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाटरायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वऱ्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.
  • लेवा बोली - तापी, पूर्णा, वाघुर आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेतीव्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात मदतनीस असणाऱ्या बारा बलुतेदारांनीही हीच बोली संपर्कभाषा म्हणून स्वीकारली आहे. म्हणूनच तिला ‘लेवा गणबोली’ असे संबोधले जाते. जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात आणि लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूपर्यंतच्या परिसरात तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर पर्यंतच्या भागात लेवा बोली बोलली जाते. या बोलीतील शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून लेवा बोलीचा आविष्कार दिसतो. भालचंद्र नेमाडे, के.नारखेडे, श्रीराम अत्तरदे या लेखकांनीही आपल्या साहित्यात या बोलीचा वापर केला आहे.
  • तावडी - तावडी बोली ही जळगाव जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांकडील प्रदेशात पाचोरा व जामनेर तालुक्यात बोलली जाते.
  • आगरी - आगरी बोली ही महाराष्ट्राच्या राज्याच्या उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते. आगरामधले आगरी, गवळी व कुणबी तसेच किनारपट्टीवरील कोळी, खारवी, भंडारी व भोई ही बोली बोलतात. रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही आगरी बोलणारे लोक प्रामुख्याने आढळतात.
  • चंदगडी - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाजारास गेल्लो'(मी बाजारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
  • वऱ्हाडी - बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून वऱ्हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला जातो. जसे, 'नदीच्या गायात, गाय फसली' (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.
  • देहवाली - भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराती आणि हिंदी भाषेचा यावर मोठा प्रभाव आढळतो. बोलीची गुजरातीशी वाक्यरचनाही मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेचे खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवालीच्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमी द्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
  • कोल्हापुरी - कोल्हापुर भागात बोलली जाणारी ही बोली आहे. बोलीभाषापैकी कोल्हापुरी मराठी बोली ही निष्कपट, गरीब, खेडवळ, अशिक्षित शेतकऱ्याची बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो. श्रीविष्णूच्या गर्भश्रीमंत तिरुपति रूपापेक्षा, त्याच्या अस्सल शेतकरी वेषातल्या पंढरपूरच्या विठोबाच्या रूपाला, अथवा श्रीशंकराच्या मल्हारी /खंडोबाला मनोभावे भजणाऱ्या- पुजणाऱ्या रांगड्या शेतकऱ्यांच्या मुखांतून उमटणारी ही बोलीभाषा आहे. मराठी भाषेच्या विविध धाटणींच्या बोलींपैकी पुणेरी मराठी बोली ही ज्यास्तीत ज्यास्त व्याकरणशुद्ध म्हणून ओंळखली जाते, तथापि ती बहुतांशी लेखी लिपीनुसार बोलली जात असल्यामुळे ऐकण्यास नाटकी आणि सपक वाटते.  तुलनेने ह्या अस्सल रांगड्या भाषेतल्या बोली कानांना अधिक रसरशीत, ठंसकेबाज आणि दमदार वाटतात. तिरुपती आणि विठोबातल्या फरकासारखाच हाही फरक आहे.
  • बेळगावी - बेळगाव या सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तिचित्रात या भाषेला विपुल वापर आढळतो. जसे काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला... या भाषेत गा हा प्रत्यय लावला जातो जसे 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
  • वाडवळी - उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्य़ात सागरी किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते. तिचा उगम आणि विकास बहुतांशी ठाणे जिल्ह्यात झालेला दिसतो. ही बोली वसई परिसरात बोलली जाते.
  • तंजावर मराठी - ही मराठी भाषेचीच़ एक बोली असून ती भारतातील तमिळनाडू ह्या राज्यात बोलली ज़ाते. ज़वळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आज़ही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाचा ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेच़ा प्रभाव ह्या भाषेवर ज़ाणवतो.
  • नंदभाषा - व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आज़ही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणाऱ्या काव्यरचनाही केल्या आहेत.

संदर्भ[संपादन]