पंचगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंचगंगा नदी
कोल्हापूरजवळ पंचगंगा नदी
उगम प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका, कोल्हापूर
मुख नृसिंहवाडी (कृष्णा नदी)
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
लांबी ८०.७ किमी (५०.१ मैल)
ह्या नदीस मिळते कृष्णा नदी
उपनद्या कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, गुप्त सरस्वती

पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगिकीकरणामुळे इतर नद्यांप्रमाणे याही नदीमध्ये प्रदूषण होत आहे

पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती करवीर तालुक्यातल्या चिखली गावातील प्रयाग संगमापासून सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते

पंचगंगाला काळा ओढा, चंदूर ओढा, जयंती, तिळवणी ओढा, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार आदी ओढे मिळतात.

सायंकाळचा वेळीचे पंचगंगा नदीवरील दृश्य.

प्रवाह[संपादन]

कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे रुई, इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला नृसिंहवाडी कुरुंदवाड येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळते टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह कबनूरजवळ मिळतो.

प्रदूषणाचे स्वरूप[संपादन]

सध्या (२०१८ साली) पंचगंगा नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याच्यामध्ये कारखान्यामुळे होणारे प्रदूषण खूप जास्त आहे. पंचगंगेची भारतातील प्रमुख प्रदूषित नद्यामंध्ये गणना होते. पंचगंगा प्रदूषणाचा जयंती नाला हा प्रमुख स्रोत आहे. जलप्रदूषणामुळे २०१२ साली औद्योगिक नगरी इचलकरंजी येथे काविळीची साथ आली आणि त्यामध्ये ४२ लोक दगावले. हजारो लोकांना जलजन्य रोगांची लागण झाली. काळा ओढा हा अत्यंत प्रदूषित नाला असून वस्त्रोद्योगातील प्रोसेसिंगमधून रासायनिक सांडपाणी या ओढ्यामध्ये सोडले जाते. त्याचबरोबर चंदूर ओढा, तिळवणी ओढा यामुळेसुद्धा नदीच्या प्रदूषणामध्ये भर पडत असते. प्रत्येक वर्षी हजारो मासे मृत्युमुखी पडतात. २०१९ मध्ये पंचगंगा नदीला महापूर आला होता आणि त्याने कोल्हापूर शहर पाण्याखाली गेले होते.तसेच कोल्हापूरच्या पूर्वेकडे ८ कि.मी हालोंडी गांव १००% पुरात बुडाले होते.त्यांनतर पुन्हा २०२१ मध्ये देखील अगदी सेम स्थिती निर्माण झाली होती.

पंचगंगा नदी घाट