पालघर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?पालघर जिल्हा

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° ४२′ ००″ N, ७२° ४६′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ७ मी
जिल्हा पालघर
लोकसंख्या ५२,६७७ (2011)
खासदार राजेंद्र गावित
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५२५
• एमएच48, एमएच ०४

पालघर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचे मुख्य शहर आहे. ते ठाणे शहरापासून ५२.३ किमी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ७४ किमी अंतरावर आहे,तसेच मुबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर शहरापासून २० कि.मी अंतरावर आहे.[१].

सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६वा जिल्हा १ आॅगस्ट २०१४ रोजी अस्तित्वात आला..कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सहयाद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी या दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, डहाणू, तलासरी, पालघर, मोखाडा, वसई, वाडा, आणि विक्रमगड या तालुक्यांचा समावेश आहे़. पालघर जिल्हाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४,६९,६९९ हेक्टर असून त्यामध्ये एकूण १००८ गावे व ३८१८ पाडे आहेत. तसेच ४७७ ग्रामपंचायती आहेत.पालघर जिल्हातील साक्षरतेचे प्रमाण ६७ टक्के आहे. त्यामधील पुरुषांचे प्रमाण ७२ टक्के इतके आहे तर महिलांचे प्रमाण ५९ टक्के आहे.

पालघर हा हिस्सा असलेल्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १.१० कोटी होती. मात्र, विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या नव्या पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,३५,१७८ एवढी असून, ठाण्याची लोकसंख्या ९६ लाख १८ हजार ९५३ इतकीच राहिली आहे़. जिल्ह्यातील जव्हार, तलासरी आणि मोखाडा हे तीन तालुके १०० टक्के आदिवासीबहुल आहेत, तर पालघर, वसई, वाडा आणि विक्रमगड ह्या तालुक्यांत आदिवासी आणि बिगरआदिवासी अशी संमिश्र लोकसंख्या आहे. गडचिरोलीनंदुरबारप्रमाणेच पालघर जिल्ह्याला आदिवासी जिल्ह्याचे स्वतंत्र अस्तित्व मिळणार असल्याने, त्यासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या अनुदानामुळे पालघर परिसराचा विकास झपाट्याने होण्यास मदत होणार आहे़.

पालघर जिल्हानिर्मितीनंतर पालघरसाठी १४८ कोटी ३६ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली. याशिवाय २५० कोटी रुपयांच्या अनावर्ती खर्चास व फर्निचर खरेदीसाठी ६७ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. ही एकूण रक्कम ४६५ कोटी ८९ लाख इतकी आहे. आदिवासी जनतेला शासनाच्या सोईसुविधांचा लाभ होण्यासाठी यापूर्वी सुरू करण्यात आलेले जव्हार येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे कार्यालय सुरूच राहणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी विविध विभागांंची एकूण ५६ प्रशासकीय कार्यालये असतील. त्यासाठी पदनिर्मितीची कार्यवाहीही चालू आहे..

पालघर शहर रेल्वे, रस्ते आणि समुद्र मार्गाने मुंबई आणि गुजरात राज्याशी जोडलेले आहे. मुंबई शहरापासून जवळ असल्यामुळे शैक्षणिक, औद्योगिक आणि शहरी प्रगतीस खूप वाव आहे. पालघर येथून महाराष्ट्रातील उर्वरित भागासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत. पालघर शहराभोवती असलेल्या कमारे, काटाळे, केळवे, कोकणेर, खारेकुरण, दापोली, नागझरी, माहीम, वडराई, वाकसई, शिरगाव, सातपाटी,,तसेच बाहेरगांवी जाण्यासाठी पुढील बसेस उपलब्ध आहेत. - अहमदनगर, औरंगाबाद, कल्याण, चाळीसगांव, जळगाव, ठाणे, तारापूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, बोईसर, भिवंडी, मनोर, मिरज, वाडा, विक्रमगड, शिर्डी, सफाळे, सांगली, सातारा, अशा अनेक शहरी आणि ग्रामीण भागांत जाण्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत.

इतिहास[संपादन]

१०० वर्षांपूर्वी पालघर हे ठाणे जिल्ह्यातील माहीम तालुक्यातील एक छोटे खेडेगाव होते.इ.स. १८९३ साली हल्लीची वेस्टर्न रेल्वे म्हणजे पूर्वीची बॉंम्बे बरोडा ॲन्ड सेंट्रल इंडिया रेल्वे B.B.&.C.i पालघरवरून जात असल्याने पालघर रेल्वे स्थानक झाले. इ.स. १८९०पासून प्लेग-मलेरियाच्या साथीमुळे व रेल्वेच्या सोयीमुळे केळवा माहीम गावातील श्रीमंत लोक पालघरला स्थाईक होऊ लागल्याने गाव वाढू लागले. इ.स. १९१८ साली, १० मार्चला तालुका कचेरी माहीमहून पालघरला आली. १९२३ साली पालघर कचेरीची हल्लीची इमारत बाधली गेली.

१९१८ साली लोकमान्य टिळकांची पालघर येथे सभा झाली. रेल्वेमुळे गुजराथशी दळनवळण वाढल्याने अनेक गुजराती व्यापारी पालघरमधे स्थायिक झाले. रेल्वेच्या कामासाठी आलेले उत्तरभारतीय ब्राह्मण समाज पालघरला स्थिरावला इ.स. १९२० साली व्यंकटेश ॲंग्लो व्हर्नाक्युलर हायस्कूल या संस्थने शाळा काढली. तिचेच रूपांतर नंतर आर्यन हायस्कूलमधे झाले. इ.स. १९२३मध्ये पालघर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. मात्र त्यावेळी मर्यादित लोकांनाच मतदानाचा अधिकार होता.

इ.स.१९३० च्या आसपास मुंबईतील म्हशींच्या गोठ्यांना व घोड्यांच्या तबेल्यांना पालघर येथून गवताचा पुरवठा होऊ लागला व पालघरातील शेतकरी लोकाना एक नवीन फायदेशीर धंदा मिळाला. १४ ऑगस्ट १९४२ रोजी "चलेजाव" आंदोलनात काढलेल्या मोर्चावरती पालघरमध्ये गोळीबार होऊन पाच तरुण मृत्यू पावले. त्यांच्या स्मरणार्थ आजचा हुतात्मा चौक बांधला आहे. हिंदुस्थानच्या फाळणीमुळे इ.स.१९४८मध्ये पालघरमध्ये सिंधी लोकांचे आगमन झाले. इ.स.१९५२मध्ये ग्रामपंचायतीत सर्वांना मताधिकार मिळाला. इ.स.१९५९मध्ये पंचायत समितीची स्थापना झाली. इ.स.१९८० पासून पालघरच्या आजूबाजूला उद्योगधंदे सुरू झाले. उद्योगधंद्यांच्या आगमनांमुळे पालघरची लोकसंख्या सतत वाढत आहे. इ.स. १९९० च्या आसपास निवासासाठी मोठ्या इमारती बांधणे सुरू झाले. इ..स.१९९८- पालघर नगरपरिषदेची स्थापना. इ.स. २०१३ पासून लोकल रेल्वे सुरू होऊन पालघरचे रूपांतर मुंबईच्या उपनगरात झाले. १ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्‍घाटन झाले.


पालघर जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी[संपादन]

१. वसई तालुक्यावर पूर्वी पोर्तुगीजांचे अधिराज्य होते. पेशवे काळामध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या साम्राज्यास सुरूंग लावत पावणेतीनशे वर्षापूर्वी मराठी झेंडा रोवला. २. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 'सन १९४२ च्या चले जाओ' आंदोलनामध्ये पालघर हे महत्त्वाचे केंद्र होते. इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता. या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाचजण शहीद झाले. सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवडचे सुकुर गोविंद मोरे हे पाचजण स्वातंत्र्यासाठी इंग्रजाशी लढा देताना शहीद झाले. या शहिदांची स्मृती म्हणून पालघर शहरामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे. ३. इसवी सन १९३०चा मिठाचा सत्याग्रह सुरू झाला तेव्हा पालघर तालुक्यातील वडराई ते सातपाटी पासून अनेक कार्यकर्ते या सत्याग्रहात सामील झाले होते. त्यावेळी सातपाटी येथे परदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती. ४. जव्हार येथे राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान होते . तेथील संस्थानाचा प्रसिद्ध राजवाडा आजही सुस्थितीत आहे.

चित्रकलेचा वारसा[संपादन]

जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोळी महादेव, कातकरी, कोळी मल्हार, कोकणा-कोकणी, दुबळा, धोडिया, टोकरे- कोळी वारली इत्यादी आदिवासी जमाती आहेत. आदिवासी सामाज्याने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य ही त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे . वारली चित्रकारी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा मनुष्य वास्तव्य करीत होता त्या काळापासून म्हणजे साधारपणे ११०० वर्षापासून(?) जतन केलेली आहे . या चित्रकलेमधे आदिवासी समाज्याच्या विविध चालीरीती तसेच दैनंदिन होणाऱ्या घडामोडी, आदिवासींच्या दैनंदिन जीवनात होणारे प्रसंग उदा० लग्न, नृत्य, विविध सण, निसर्गातील घडामोडी अशा प्रकारचे प्रसंग उत्तम प्रकारे चित्ररूपाने दाखवले जातात . ही चित्रे कुठल्याही प्रकारचा रासायनिक रंग न वापरता निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू, उदा० माती,तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग व बांबूच्या काड्यांचे ब्रश वापरून काढली जातात . ही कला आदिवासींच्या जीवनशैलीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी चित्रकला असून या चित्रकलेला भारतात तसेच परदेशात खूप मागाणी आहे. श्री. जीव्या सोमा म्हसे हे वैशिट्यपूर्ण वारली चित्रकला शैलीचे चित्रकार म्हणून आज प्रसिद्ध असून ते आजच्या नवीन वारली चित्रकरांचे आदर्श आहेत. त्यांच्या वारली चित्रकलेतील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने 2011 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे.

औद्योगिक माहिती[संपादन]

आशिया खडांतील सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत पालघर जिल्ह्यातील बोईसर शहराजवळ आहे.

उद्योग[संपादन]

सातव्या पंचवार्षिक योजनेखाली दाखविलेल्या सर्व योजना आठव्या पंचवार्षिक योजनेत अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत.
या योजने अंतर्गत लहान व कुटीर उद्योग करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यावरबत भर देण्यात आला आहे.
जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले एक क्षेत्र आणि तीन शासकीय सहकारी औद्योगिक वसाहती असून ५७५७ नोंदणीकृत लघु उद्योग, १८८३ नोंदणीकृत अस्थायी लघु उद्योग व ४२७ मोठे/मध्यम उद्योग-घटक आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले औद्योगिक क्षेत्र[संपादन]

एमआयडीसी, तारापूर तालुका व पालघर जिल्हा शासनाच्या मदतीने उभारण्यात आलेल्या सहकारी ओद्योगिक वसाहती[संपादन]

१. दि पालघर तालुका ओद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, ता.पालघर
२. दि वसई तालुका ओद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, ता.वसई
३. प्रियदर्शिनी ओद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, ता.वाडा.

महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ व कोंकण विकास महामंडळाने स्थापन केलेल्या ओद्योगिक वसाहती[संपादन]

एमएसएसआयडीसी वुडबेस्ड कॉम्प्लेक्स, वाडा क्षेत्रफळ-२२ एकर ,प्लॉट संख्या -१९
विशाल प्रकल्प सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील एकूण १५ विशाल प्रकल्पांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली असून यापैकी ७ प्रकल्पांनी उत्पादन सुरू केले आहे. वाडा तालुक्यात एकूण ८ विशाल प्रकल्प प्रस्तावित आहेत.

पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता, जंगलपट्टी, बंदरपट्टी व पठारी प्रदेश असे ढोबळ मानाने भौगोलिक विभाग पडतात . या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम तेथील लोकांचे राहणीमान व व्यवसाय यांचेवर झालेला दिसून येतो . जव्हार, मोखाडा व विक्रमगड या डोंगराळ जंगलपट्टी भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे .

या भागात प्रामुख्याने भात व नागली यांची शेती केली जाते . तसेच अलीकडच्या काळात हळद लागवडीचा प्रयोगदेखील यशस्वी झालेला आहे . याशिवाय जंगलातील लाकूडफाटा गोळा करणे व जंगलातील मध , लाख व औषधी वनस्पती इत्यादी गौण उत्पादाने गोळा करणे हादेखील व्यवसायाचा एक भाग आहे .

बंदरपट्टी भागामध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच त्यावर आधारित मासे सुकविणे, कोळंबी संवर्धन प्रकल्प इत्यादी व्यवसाय केले जातात. पालघर तालुक्यातील आलेवाडी, दांडी, दातिवरे, नवापूर, नांदगांव बंदर, मुरबे, सातपाटी, तसेच वसई तालुक्यातील अर्नाळा, किल्ला बंदर, नायगांव, पाचू बंदर, आणि डहाणू तालुक्यामधील चिंचणी, डहाणू व बोर्डी या ठिकाणी मासेमारीसाठी प्रमुख बंदरे आहेत.
मासे टिकविण्यासाठी शीतगृहे तसेच तसेच आईस कारखाना या व्यवसायात देखील रोजगार निर्मिती होते . पालघर तालुक्यातील सातपाटी येथून पापलेट व कोळंबी या माशांची निर्यात केली जाते .

जिल्ह्यातील सपाट पठारी प्रदेशामध्ये औद्योगिक पट्टे अस्तित्वात आहेत. यामध्ये मुख्यतः कापड उद्योग, रासायनिक कारखाने, अभियांत्रिकी उद्योग, स्टील उद्योग इत्यादीचा समावेश आहे. बोईसर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक विभागात टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, विराज स्टील, यांसारख्या पोलाद निर्मितीचे कारखाने आहेत, तसेच डी-डेकॉर, सियाराम यांसारख्या कापड निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत.

या उद्योगांमुळे या परिसरात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती व पूरक व्यवसाय निर्मिती झालेली आहे . तसेच येथून मोठया प्रमाणात निर्यात होऊन परकीय चलन मिळते . वाडा तालुक्याला हा 'ड' वर्गीय औद्योगिक दर्जा प्राप्त झालेला आहे . वाडा तालुक्यामध्ये ओनिडा, कोकाकोला यासारखे कारखाने आहेत.
वसई तालुक्यातील वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रे विकसित झाली आहेत.
डहाणू तालुक्यातील चिंचणी व पालघर तालुक्यातील तारापूर येथे घरोघरी पारंपरिक डायमेकिंग हा प्रमुख व्यवसाय केला जातो .

भौगोलिक सीमा[संपादन]

जगाच्या नकाशावर पालघर शहराचे अक्षांश १९.७° उत्तर, आणि रेखांश ७२.७७° पूर्व असे आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर विरार स्थानकाच्या पुढे पालघर हे चौथे रेल्वे स्थानक आहे पालघर हे स्थानक व्यापारासाठी महत्त्वाचे आहे

पालघर जिल्हा विशेष माहिती[संपादन]

पालघर जिल्हा मुख्यालयापासून २ कि.मी अतरांवर मौजे दापोली जि.पालघर येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले नारळ बीजोत्पादन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
हे केंद्र सुरू करण्यासाठी मौजे दापोली गावांतील १०० एकर शासकीय जमीन देण्यात आली आहे.
पहिल्या टप्यातील कामास सुरुवात झाली आहे.

शिक्षण[संपादन]

पालघर शहरात शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणासहित संशोधन स्तरावरील शिक्षणाची सोय आहे. येथील महत्त्वाची शाळा-महाविद्यालये पुढीलप्रमाणे आहेत.

महाविद्यालये[संपादन]

१) आर्यन एज्युकेशन सोसायटीचे किशोर गंगाधर संखे डी.एड. महाविद्यालय ,पालघर
२) जीवन विकास शिक्षण संस्थेचे स.तु.कदम महाविद्यालय,पालघर
३) बी.एड. महाविद्यालय
४) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय

मराठी माध्यमाच्या शाळा[संपादन]

  • आनंदाश्रम विद्यालय
  • जीवन विकास शिक्षण संस्थेचे श्री. स. तु. कदम विद्यालय पालघर .
  • जिल्हा परिषद पालघर : जि.प प्राथमिक शाळा पालघर नं १
  • जिल्हा परिषद मराठी शाळा दापोली, जि.पालघर
  • जिल्हा परिषद मराठी शाळा (तालुका शाळा), पालघर
  • आर्यन एज्युकेशन सोसायटीचे म.नी दांडेकर हायस्कूल
  • भगिनी समाज विद्यामंदिर pa

इंग्रजी माध्यमाच्या शाळा[संपादन]

  • आनंद आश्रम इंग्लिश हायस्कूल
  • आर्यन इंग्रजी माध्यम हायस्कूल
  • केनम इंग्लिश हायस्कूल
  • जवाहर नव उदय विद्यालय (केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड)
  • श्री जे. पी इंटर आंतरराष्ट्रीय स्कूल(आय सी एस सी बोर्ड)
  • ट्विंकल स्टार इंग्लिश हायस्कूल
  • भगिनी समाज विद्यामंदिर (सेमी इंग्रजी )
  • सुंदरम सेंट्रल स्कूल (केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड)
  • सेक्रेड हार्ट हायस्कूल
  • सेंट जोहान आंतरराष्ट्रीय स्कूल (केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड)
  • सूर्य व्हॅली स्कूल
  • होली स्पिरिट इंग्लिश हायस्कूल

हिंदी माध्यमाच्या शाळा[संपादन]

  • भवानी विद्या निकेतन हिंदी हायस्कूल

गुजराती माध्यमाच्या शाळा[संपादन]

  • आर्यन गुजराती स्कूल
  • जिल्हा परिषद स्कूल

नागरी सुविधा[संपादन]

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[२] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

औद्योगिक वसाहत[संपादन]

पालघर शहराजवळच एक विस्तीर्ण औद्योगिक वसाहत आहे. येथे रसायने, वस्त्रप्रावरणे, अवजड यंत्रे, औषधे इत्यादींचे काही कारखाने आहेत.

भेट देण्यासारखी स्थळे[संपादन]

  • वाघोबा खिंड
  • केळवे समुद्र किनारा
  • मोरेकुरन-कोळगाव शीवेवरील वनराई बधांरा
  • मौजे दापोली (पालघर जिल्हा) येथील वनीकरण क्षेत्र
  • लक्ष्मी नारायण मंदिर (पालघर-केळवे रस्ता)
  • शिरगावचा समुद्र किनारा
  • शीतलादेवीचे केळवे येथील पुरातन मंदिर
  • सातपाटी समुद्र किनारा
  • हुतात्मा स्तंभ (पाच बत्ती)
  • श्री क्षेत्र तिलसेश्वर शिव मंदिर  वाडा

वृत्तपत्रे[संपादन]

१) नवयुग पालघर २) पालघर मित्र 3) तुफानी सागर, 4) दै. पुढारी (पालघरसह वसई-विरार)


पालघरविषयीची पुस्तके[संपादन]

  • कोकणाचं सांस्कृतिक संचित पालघर (अनंत मोहिते)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पालघर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ /https://www.bankofindia.co.in/