चक दे! इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चक दे! इंडिया
चक दे! इंडिया
दिग्दर्शन शिमित अमीन
निर्मिती यश चोप्रा प्रॉडक्शन
प्रमुख कलाकार शाहरुख खान
सागरिका घाटगे
विद्या माळवदे
संवाद आदित्य चोप्रा
संकलन जिमीत सहानी
संगीत सलीम-सुलेमान
पार्श्वगायन सुखविंदर सिंग
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ऑगस्ट १० इ.स. २००७
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १५३ मिनिटे
निर्मिती खर्च रु. २४ करोड
एकूण उत्पन्न रु. १०३.६५ करोड



चक दे! इंडिया हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शिमित अमीनने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खान हा कबीर खानच्या भूमिकेत भारतीय हॉकी संघाचा पूर्वीचा कप्तान असतो; पाकिस्तान संघाविरुद्धच्या पराभवामुळे त्याला संघामधून बाहेर काढले जाते. समाजातून त्याला आणि त्याच्या आईला बहिष्कृत केले जाते. तब्बल सात वर्षानंतर हरवलेली निष्ठा परत मिळवण्यासाठी तो विवादग्रस्त भारतीय महिला संघाची प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतो. विवादग्रस्त संघ ते विश्वविजेता संघ ह्या वाटचालीमध्ये खान प्रसिद्धी मिळवून समाजामध्ये उंच मानेने आपल्या आईसमवेत परत येतो. जे त्याला व त्याच्या आईला दुर्लक्षित करतात, तेच पुन्हा त्यांच्या स्वागताला येतात.

पार्श्वभूमी[संपादन]

क्रिकेटच्या तुलनेत दुर्लक्षिल्या गेलेल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीची दुरवस्था ही या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. चक दे! इंडिया हा जिमीत सहानी संकलित आणि शिमित अमिन दिग्दर्शित, भारतीय महिला हॉकी संघावर आधारित हिंदी चित्रपट आहे. एखादी इच्छा, सांघिक कामगिरी आणि चांगला प्रशिक्षक व त्याचे योगदान एखाद्या संघामध्ये किती बदल घडवू शकते, हे या चित्रपटामध्ये सुरेखपणे मांडले आहे.

कलाकार[संपादन]

कथानक[संपादन]

कबीर खान हा कथानकातील भारतीय हॉकी संघाचा एकेकाळचा कर्णधार. एक महत्त्वाचा सामना गमावून स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याचा दोष त्याच्या माथी येतो. स्पर्धक पाकिस्तानी संघाशी हातमिळवणी करून मुद्दाम हारल्याचा खोटा आळ त्याच्यावर ठेवला जातो. दुखावलेला कबीर खान राष्ट्रीय संघापासून दूर निघून जातो. सुमारे सात वर्षानंतर परत येतो तो हॉकीचा कोच म्हणून. स्पर्धेत जिंकण्याची कोणतीही आशा नसलेल्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षकपद तो मागून घेतो आणि सर्व अडथळ्यांवर मात करीत शेवटी त्याच दुबळ्या संघाला विश्वविजेता बनवून स्वतःवरचा कलंक धुऊन टाकण्याचा प्रयत्न करतो.

उल्लेखनीय[संपादन]

"चक दे! इंडिया" या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट ह्या प्रवर्गामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[१] सुखविंदर सिंहच्या, सलीम मर्चंट, मरिअने डिक्रुझ यांच्या आवाजातील चक दे! इंडिया हे गाणे अतिशय उस्फूर्त आणि प्रेरणादायी आहे.

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर १० वर्षांनी, म्हणजे इ.स. २०१७ साली 'चक दे'च्या टीममधील मुली काय करत आहेत?[संपादन]

चक दे इंडियाच्या मुली दहा वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत, अडचणीत सल्लामसलत करतात.

१. सागरिका घाटगे (प्रीती सबरवाल) : नसरुद्दीन शहाच्या 'इरादा' चित्रपटात दिसली होती. क्रिकेटर जहीर खानबरोबर सगाई झाली; (लग्न?)

२. चित्राश्री रावत (कोमल चौताला) : 'चक दे'नंतर अनेक चित्रपटांत आणि टीव्ही सीरियल्समध्ये दिसली. सध्या 'शंकर जयकिशन' नावाच्या सीरियलमध्ये केतन सिंहाच्या पत्नीची भूमिका करत आहे.

३. शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) : 'बी.ए. पास' या चित्रपटानंतर नाटकांकडे वळली. महेश दत्तानीचा सिने प्ले 'द बिग फॅट सिटी'त दिसली होती.

४. तान्या अबरोल (बलबीर कौल) : शिक्षण पूर्णकेल्यावर 'सी आयडी' आणि अशाच काही सीरियल्समध्ये काम केले. तिची एक वेब सीरियल येणार आहे. पंजाबी चित्रपटांत काम करते.

५. शुभी मेहता (गुंजन लाखानी) : आमरस चित्रपटात काम केल्यानंतर Forever End a Day या लघु चित्रपटात काम केले. आता गुडगाव (दिल्ली)त हिची कंपनी कॉर्पोरेट ट्रेनिंग देते.

६. विद्या माळवदे (विद्या शर्मा) : संघाची गोलकीपर आणि कॅप्टन. सध्या योगाचे वर्ग घेते. देशात-परदेशांत कार्यशाळा भरवते.

७. सीमा आझमी (राणी डिस्पोटा) : एनएसडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका नाटक मंडळीत दाखल झाली. तेते ती नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करते. सध्या 'इस प्यार को क्या नाम दूॅं-३'मध्ये विनोदी भूमिका करते आहे.

८. मॅसोचॉन (मॉली झिमिक) : मणिपुरी खेळाडूची भूमिका करणारी ही मुलगी ईशान्य भारतात परतली.. तेथे ती एक तरुणांच्या एनजीओत काम करते आहे. तिला एक मुलगी झाली आहे.

९. अनाहिता नायर : (आलिया बोस) : २०११ साली लग्न करून कायमची सिंगापूरला गेली. तिला एक मुलगी आहे, तिचे नाव आलिया ठेवले आहे.

१०. आर्या मेनन (गुल इकबाल) : विक्रम मोटवानी आणि अनुराग कश्यपच्या बेब सीरीजमध्ये ती क्रिएटिव्ह प्रोड्यूसर होती. आता तिची स्वतःची ॲड फिल्म्स काढणारी प्रॉडक्शन कंपनी आहे.

११. सॅंडिया फुर्टाडो ( नेत्रा रेड्डी) : मुंबईत वांद्‌ऱ्याला राहणाऱ्या सॅंडियाचे २०१६ साली लंडनमध्ये लग्न झाले. ती पी.आर. प्रोफेशनल आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]