मौर्य साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
मौर्य साम्राज्य
Blank.png इ.स.पू. ३२२इ.स.पू. १८५ Blank.png  
Blank.png  
Blank.png


Maurya Dynasty in 265 BCE.jpg
सर्वोच्च शिखरावर असताना मौर्य साम्राज्य (गडद निळे) मांडलिक राज्यांसहित (फिकट निळी).
राजधानी पाटलीपुत्र (आजचे पटना)
शासनप्रकार अर्थशास्त्र ग्रंथात लिहल्याप्रमाणे निरंकुश राजतंत्रीय
राष्ट्रप्रमुख चंद्रगुप्त मौर्य (इ.स.पू. ३२०-२९८)
बृहद्रथ (इ.स.पू. १८७-१८०)
अधिकृत भाषा संस्कृत, प्राकृत व इतर
क्षेत्रफळ ५० लक्ष वर्ग किमी


मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारताच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य होते. त्यावर इ.स.पू. ३२१ ते इ.स.पू. १८५ पर्यंत मौर्य वंशाने राज्य केले होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती.[१] हे साम्राज्य इ.स.पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केले. त्याने नंद घराण्याला पराभूत करून आपले साम्राज्य प्रस्थापित केले. त्याने भारतातील सत्तांच्या विघटनाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला. इ.स.पू. ३२० पर्यंत या साम्राज्याने अलेक्झांडरच्या प्रांतशासकांना (क्षत्रप) हरवून पूर्णपणे वायव्य भारत ताब्यात घेतला होता.[२]

५०,००,००० वर्गकिमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक, व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्या सर्वोच्च शिखरावर असताना हे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तानइराणचे काही भाग इतके पसरले होते. भारताच्या मध्य व दक्षिण प्रदेशांमध्ये चंद्रगुप्तबिंदुसार यांनी कलिंग (सध्याचा ओरिसा) हा प्रदेश वगळता विस्तार केला. कलिंग नंतर सम्राट अशोकाने जिंकून घेतला. अशोकाच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. इ.स.पू. १८५ मध्ये शुंग साम्राज्याने मौर्यांना पराभूत करून मौर्य साम्राज्य संपुष्टात आणले.

चंद्रगुप्ताने आपल्या कारकीर्दीत सिंधू नदीपलीकडील अलेक्झांडरच्या साम्राज्याचा प्रदेश जिंकून घेतला. चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर याला पराभूत करून इराणचेही काही भाग जिंकून घेतले.

कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत कलिंग युद्धानंतर साम्राज्याने ५० वर्षे शांतता व सुरक्षितता अनुभवली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून या धर्माचा श्रीलंका, आग्नेय व पश्चिम आशिया तसेच युरोपमध्ये प्रसार केला. अशोकाचे सारनाथ येथील स्तंभशीर्षावरील सिंह व अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहे.

या साम्राज्याची लोकसंख्या अंदाजे ५ ते ६ कोटी इतकी होती. त्यामुळे त्याकाळात मौर्य साम्राज्य हे जगातील एक अत्यंत जास्त लोकसंख्या असलेले साम्राज्य होते.[३]

अनुक्रमणिका

सुरुवातीचा काळ[संपादन]

चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य[संपादन]

मुख्य लेख: चंद्रगुप्त मौर्य
हेही पहा: मौर्य राज्यकर्त्यांची यादी

मौर्य साम्राज्याची स्थापना साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्य या तक्षशिला येथील त्याच्या ब्राह्मण शिक्षकाच्या मदतीने केली. आख्यायिकांनुसार, चाणक्य मगध प्रांतात गेला. मगधामध्ये नंद घराण्यातील धनानंद हा जुलमी राजा राज्य करत होता. त्याने चाणक्याला अपमानित केले. सूड घेण्याच्या निर्धाराने चाणक्याने ही जुलमी सत्ता मोडून काढण्याची प्रतिज्ञा केली.[४] दरम्यान, अलेक्झांडर या ग्रीक सम्राटाने बियास नदी ओलांडून भारतावर स्वारी केली होती. अलेक्झांडर बॅबिलोनला परत गेला तिथेच त्याचा ख्रिस्तपूर्व ३२३ मध्ये मृत्यू झाला. त्याच्या साम्राज्यात फूट पडली व अनेक विखुरलेल्या सत्रपांनी (प्रांतशासक) आपापली वेगवेगळी राज्ये तयार केली.

ग्रीक सेनापती युडेमस व पिथोन यांनी इ.स.पू. ३१६ पर्यंत राज्य केले. नंतर चंद्रगुप्ताने चाणक्याच्या मदतीने (जो त्याचा आता सल्लागार होता) त्यांना पराभूत केले. मगधातील सत्तेच्या जोरावर त्याने एक मोठे साम्राज्य तयार केले.[५]

चंद्रगुप्ताचा उदय हा काहीसा विवादात्मक व रहस्यमय आहे. मुद्राराक्षस (राक्षसाचे काव्य - राक्षस हा मगधाचा प्रधान होता.) या ह्या काव्यात विशाखादत्ताने चंद्रगुप्त मौर्य हा नंदांचा नातलग असल्याचे लिहले आहे. महापरिनिबाण सुत्त या प्राचीन बौद्ध धर्मग्रंथात एक "मौर्य" नावाच्या क्षत्रिय जमातीचा उल्लेख आहे. तरीही, ऐतिहासिक पुराव्यांविना अजून निष्कर्ष काढणे कठीण आहे. चंद्रगुप्ताचा ग्रीक लेखांत "सँड्रोकोत्तोस" (Sandrokottos) म्हणून उल्लेख येतो. तरुणपणी तो अलेक्झांडरला भेटला असल्याचेही सांगण्यात येते. असेही सांगण्यात येते की तो नंद सम्राटाला भेटला व त्याने सम्राटाला नाराज केले व कशीबशी सुटका करून घेतली. चाणक्याचे मूळ ध्येय हे चंद्रगुप्ताच्या नेत्रुत्वाखाली लुटारू टोळी तयार करण्याचे होते. विशाखादत्ताचे "मुद्राराक्षस" व जैन ग्रंथ "परिशिष्टपावन" यांत चंद्रगुप्ताच्या हिमालयीन राजा पुरुषोत्तम (पोरस) यांच्या मैत्रीसंबंधी उल्लेख आहेत.

मगध साम्राज्यावरील विजय[संपादन]

चाणक्याने चंद्रगुप्त व त्याच्या सैन्यास मगध जिंकण्यासाठी प्रोत्साहन दिले. चंद्रगुप्ताने चातुर्याने मगध व आजूबाजूच्या प्रांतांमधून नंद राजावर नाराज झालेले तरुण लोक व लढण्यासाठीची साधने गोळा केली. त्याच्या सैन्यामध्ये तक्षिलाचा भूतपूर्व सेनापती, चाणक्याचे इतर हुशार विद्यार्थी, काकायीच्या पोरस राजाचा मुलगा मलयकेतू व लहान राज्यांचे राज्यकर्ते होते.

पाटलीपुत्रवर आक्रमण करण्याच्या तयारीत चंद्रगुप्ताने एक योजना तयार केली. लढाई घोषित करण्यात आली व नगधचे सैन्य मौर्याच्या सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी शहरापासून दूर अंतरावर आले. दरम्यान, मौर्याचे सेनापती व हेर यांनी मगधाच्या भ्रष्ट सेनापतीला लाच दिली तसेच राज्यात यादवीयुद्धाचे वातावरण निर्माण केले, ज्याची परिणती युवराजाच्या मृत्यूत झाली. धनानंदाने शरणागती पत्करली व सत्ता चंद्रगुप्त मौर्याकडे देऊन तो अज्ञातवासात गेला. चंद्रगुप्ताने मगधाचा प्रधान राक्षस यस हे पटवून दिले की त्याची निष्ठा मगधावर होती, मगधाच्या वंशावर नव्हे. चंद्रगुप्ताने त्याला हेही सांगितले की शहर व राज्य नष्ट होईल असे युद्ध तो होऊ देणार नाही. राक्षसाने चंद्रगुप्ताचे कारण मान्य केले व चंद्रगुप्त अधिकृतरीत्या मगध सम्राट झाला. राक्षस हा चंद्रगुप्ताचा मुख्य सल्लागार झाला व चाणक्य मोठा राजनेता झाला.

चंद्रगुप्त मौर्य[संपादन]

सेल्युकस निकेटर याने अलेक्झांडरच्या साम्राज्याचा पूर्व भाग त्याच्या मृत्यूनंतर ताब्यात घेऊन भारताचे भाग जिंकून घेण्याचा त्याने प्रयत्न केला तेव्हा चंद्रगुप्त त्याच्याशी इ.स.पू. ३०५ मध्ये लढला. या लढाईत त्याने सेल्युकसचा पराभव केला. त्यानंतर दोन्ही राज्यांनी एकमेकांशी तह केला. तहानुसार सेल्युकसच्या मुलीचा चंद्रगुप्ताबरोबर विवाह झाला. तर कंभोज-गांधार (पॅरोपॅमिसेड), कंदाहार (अराचोसिया) व बलुचिस्तान (जेड्रोसिया) हे प्रांत मौर्य अधिपत्याखाली आले. बदल्यात ५०० लढाऊ हत्ती चंद्रगुप्ताकडून सेल्युकसला मिळाले, ज्यांचा उपयोग त्याला इप्ससच्या लढाईत झाला. दोन्ही देशांत राजनैतिक संबंध दृढ झाले. मेगॅस्थनिस, डिमॅकसडायोनिसस हे ग्रीक इतिहासकार चंद्रगुप्ताच्या दरबारात राहत.

चंद्रगुप्ताने पाटलीपुत्र येथे गुंतागुंतीच्या शासनव्यवस्थेसोबत शक्तिशाली व केंद्रीकृत प्रांत निर्माण केला. मॅगिस्थनिसनुसार, चंद्रगुप्ताने भव्य इराणी शहरांशी स्पर्धा करेल अशी ६४ दरवाजे व ५७० मनोरे असलेली मोठी लाकडी भिंत पाटलीपुत्रभोवती बांधली होती. चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार याने दक्षिण भारतात आपल्या सत्तेचा विस्तार केला. त्याच्या दरबारीही डिमॅकस हा ग्रीक राजदूत होता.

मेगॅस्थनिसने चंद्रगुप्ताच्या सत्तेतील मौर्य जनतेचे शिस्तप्रिय, साधी राहणी, प्रामाणिकता, व निरक्षरता या गुणांचे वर्णन केले आहे.

"सर्व भारतीय अत्यंत काटकसरीने राहत (विशेषतः तंबूत). त्यांना बेशिस्त लोक आवडत नसत. ते कायद्यांचे नीट पालन करत असत. चोरी हा प्रसंग फार कमी वेळा घडे. मेगॅस्थनिसच्या म्हणण्यानुसार जे सँड्रोकोत्तोसच्या (चंद्रगुप्त) तंबूतील ४,००,००० माणसांपैकी काहीनी असे निदर्शनास आणले की चोरीमध्ये २०० द्राखमांहून जास्त काहीही नेलेले नव्हते. भारतीयांचे लिखित कायदे नव्हते व भारतीय लिहिण्याच्या बाबतीत अज्ञानी होते. त्यामुळे ते स्मृतीवरच अवलंबून असत. तरीही ते आनंदाने, साधेपणाने व काटकसरीने राहत. बार्लीच्या धान्यापेक्षा ते तांदळापासून बनलेली मदिरा पीत असत. त्यांचे अन्न हे भातापासून बनलेले आहे."

बिंदुसार[संपादन]

बिन्दुसार हा दुसरा मौर्य सम्राट होता. तो चंद्रगुप्ताचा मुलगा होता. त्याच्या कारकीर्दीत मौर्य साम्राज्याचा दक्षिणेत कर्नाटकमध्ये विस्तार झाला. त्याचा मृत्यू ख्रिस्तपूर्व २७२ मध्ये झाला.

अशोक[संपादन]

चंद्रगुप्ताचा नातू (बिन्दुसाराचा मुलगा) हा अशोकवर्धन मौर्य हा होता. तो इ.स.पू. २७३ ते इ.स.पू. २३२ इतका काळ मौर्य साम्राज्याचा सम्राट होता.

अशोक राजपुत्र असताना त्याने उज्जैन व तक्षिला येथील बंडे मोडून काढली. राजा म्हणून तो महत्त्वाकांक्षी व आक्रमक होता. त्याने दक्षिण भारतात मौर्य राजवट पुनर्स्थापित केली. परंतु कलिंगचे युद्ध हा त्याच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा प्रसंग ठरला. त्याने कलिंग जिंकण्यासाठी लढलेल्या युद्धात त्याचा विजय झाला तरीही अंदाजे १,००,००० सैनिक व नागरिक या युद्धात मरण पावले. त्यात १०,००० हून जास्त अशोकाचे लोक होते. जेव्हा त्याने हे पाहिले, तेव्हा त्याला इतके घोर युद्ध केल्याबद्दल पश्चात्ताप झाला. कलिंग जिंकल्यावर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने हिंसा व युद्ध यांचा त्याग केला.

अशोकाने अहिंसेची तत्त्वे प्राण्यांची शिकार करणे तसेच गुलामगिरीची प्रथा बंद करून अंमलात आणली. (कलिंग युद्धातील पराभूतांना सक्तीने गुलाम केले गेले होते) त्याच्याकडे असलेल्या प्रचंड व शक्तिशाली सैन्याचा उपयोग त्याने अधिकार व शांतता राखण्यासाठी केला. अशोकाने आशिया व युरोपीय राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवले तसेच त्याने तिथे बौद्ध विचारांचा प्रसार केला. ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याच्या राज्यात शांती, समृद्धी व सामंजस्य त्याच्या राज्यात नांदत होते. त्यामुळे तो भारतातील सर्वांत प्रसिद्ध राजांपैकी एक आहे. तो भारतात अजूनही एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो.

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील मस्की येथील शिलालेख

दगडामध्ये कोरलेले अशोकाचे शिलालेख संपूर्ण भारतीय उपखंडात सापडतात. अतिपश्चिमेकडील अफगाणिस्तानपासून दक्षिणेकडे नेल्लोर जिल्ह्यातही ते आढळतात. या शिलालेखांवर अशोकाची धोरणे व कार्य लिहिले आहे. प्रामुख्याने हे शिलालेख प्राकृत भाषेत लिहले गेले आहेत, तरी दोन शिलालेख ग्रीकमध्ये तर एक ग्रीक व एक ॲरेमाइक भाषेमध्ये लिहला गेला आहे. ते असेही प्रमाणित करतात की अशोकाने भूमध्य समुद्राकडील ग्रीक राजांकडेसुद्धा आपले राजदूत पाठवले होते. त्यांच्यावर ग्रीक राजांची नावेदेखील कोरण्यात आली आहेत. अंतियोको (अँटियोकस), तुलामाया (टॉलेमी), अंतिकिनी (अँटिगोनस), मक (मॅगस), व अलिकासुन्दरो (अलेक्झांडर) यांची नावे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे शिलालेखांवर आली आहेत. त्यांच्या प्रदेशाचे (म्हणजेच ग्रीसचे) भारतापासूनचे अंतरही शिलालेखांवर अचूक म्हणजेच "६०० योजने दूर" (एक योजन म्हणजे सात मैल) असे लिहिले आहे (अंदाजे ४,००० मैल).

प्रशासन[संपादन]

उभ्या देवतेसह असलेले मौर्य खंडित पदक. उत्तरपूर्व पाकिस्तान. इ.स.पू. तिसरे शतक. ब्रिटिश म्युझियम

मौर्य साम्राज्य हे चार प्रांतात विभागले गेले होते. त्यातील एक प्रांत हा प्रचंड अर्धचंद्राकार आकाराचा होता. अशोकाच्या शिलालेखांच्या अनुसार प्रांतांची नावे तोसली (पूर्वेकडील), उज्जैन (पश्चिमेकडील), सुवर्णनगरी (दक्षिणेकडील) व तक्षशीला (उत्तरेकडील) ही होती. प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख हा कुमार (राजपुत्र) असे. तो प्रांतावर राजाचा प्रतिनिधी म्हणून राज्य करत असे. राजपुत्राला सहाय्यक म्हणून महाअमात्य व मंत्र्यांची समिती असे. अशीच शासनव्यवस्था साम्राज्याच्या स्तरावरदेखील असे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून सम्राट तर त्यास साहाय्य करण्यासाठी मंत्रीपरिषद असे.

मौर्य साम्राज्याचे सैन्य हे त्याकाळील सर्वांत मोठे सैन्य होते. या साम्राज्याकडे ६,००,००० पायदळ, ३०,००० घोडदळ व ९,००० लढाऊ हत्ती होते. हेरगिरीचा विभाग अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करत असे. अशोकाने जरी युद्ध व विस्तारास आळा घातला तरी त्याने त्याचे सैन्य शांतता व सुरक्षितता यांसाठी कायम ठेवले.

अर्थव्यवस्था[संपादन]

मौर्य साम्राज्याचे चांदीचे नाणे. यावर चक्र व हत्ती यांच्या प्रतिमा आहेत. इ.स.पू. तिसरे शतक.

दक्षिण आशियात राजकारणातील एकता व लष्करी एकता यांमुळे प्रथमच संपूर्ण भारताची एकत्र आर्थिक व्यवस्था उदयास आली. आधीच्या काळात शेकडो राज्ये, शेकडो लहान सैन्ये, शेकडो प्रमुख तसेच आपापसातील अनेक युद्धे अशी परिस्थिती होती. मौर्य काळात शेतकरी कराच्या व सरकारला पिके देण्याच्या बोज्यातून मुक्त झाले. त्याऐवजी अर्थशास्त्र या चाणक्याच्या ग्रंथातील तत्वांच्या आधारे शासनाद्वारे प्रशासित अशा शिस्तशीर व उचित प्रणालीद्वारे कर घेतला जाई.

चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतभर एकच चलन स्थापित केले. त्याने भारतात शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना न्याय व सुरक्षा मिळावी म्हणून प्रांतीय नियंत्रकांचे व प्रशासकांचे जाळे निर्माण केले. मौर्य सैन्याने अनेक गुन्हेगारी टोळ्या, प्रांतीय व्यक्तिगत सैन्ये व ज्यांनी काही प्रदेशावर आपले प्रभुत्व स्थापन करावयाचे आहे अशा व्यक्तिंना पराभूत केले. मौर्य कर गोळा करण्यात कडक असले तरी त्यांनी अनेक सार्वजनिक कार्ये व कालवे तयार केले. भारतात अंतर्गत व्यापार या काळात नवीन राजकीय एकात्मता व अंतर्गत सुरक्षा यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाढला.

मौर्य साम्राज्याचे तांब्याचे नाणे. इ.स.पू. तिसऱ्या शतकाचा उत्तरार्ध.

भारत-ग्रीस मैत्रीच्या काळात व्यापाराचे आंतरराष्ट्रीय जाळे वाढले. सध्या पाकिस्तानअफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबर खिंड ही या व्यापारात अतिशय महत्त्वाची होती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये भारताशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करू लागली. मौर्य साम्राज्याचे मलय द्वीपकल्पाबरोबरही व्यापारी संबंध होते. भारत रेशमाच्या वस्तू, मसाले व विविध खाद्यपदार्थ निर्यात करी. युरोपाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केल्याने हे साम्राज्य अधिकच समृद्ध झाले. अशोकाच्या कारकीर्दीत हजारो रस्ते, कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा व इतर सार्वजनिक कामे झाली. धान्य व कर गोळा करण्यासंबंधीच्या अनेक कठोर कायद्यांच्या शिथिलीकरणाने मौर्य साम्राज्यात उत्पादनक्षमता व आर्थिक हालचाल वाढली.

मौर्य साम्राज्याची अर्थव्यवस्था ही त्यानंतर अनेक शतकांनंतर उदयाला आलेल्या रोमन साम्राज्यासारखीच होती. दोन्ही साम्राज्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध ठेवत. दोन्ही साम्राज्यांत सहकारी संस्थांसारख्या संस्था होत्या.

धर्म[संपादन]

सम्राट अशोकाच्या काळात झालेला बुद्ध धर्माचा प्रसार.

मौर्यकाळात आरंभी हिंदू धर्म साम्राज्याचा प्रमुख धर्म होता. पुढे अशोकाने बुद्ध धर्माचा स्वीकार करुन बुद्ध धर्माचा देशभर प्रसार केला. त्याने श्रीलंकेमध्ये आपला मुलगा महेन्द्र व मुलगी संघमित्रा यांना पाठवून तेथे बुद्धधर्माचा प्रसार केला. तेथील राजा तिसा याने बुद्धधर्माचा स्वीकार केला. अशोकाने पश्चिम आशिया, ग्रीसआग्नेय आशिया येथे अनेक धर्मप्रसारक पाठवले.

वास्तूंचे अवशेष[संपादन]

कुम्राहर येथील मौर्य स्तंभ

सध्या मौर्यकाळातील वास्तूंचे अवशेष फारच कमी प्रमाणात शिल्लक आहेत. १० मीटर उंची असलेल्या ८० स्तंभ असलेल्या मौर्यकालीन बहुस्तंभी मंडपाचे अवशेष पटनाच्या रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कुम्राहर येथे सापडले आहेत. मौर्य राजधानीच्या जवळ असल्याने ह्यास खूप महत्त्व आहे. तिची शैली काही प्रमाणात इराणच्या हखामनी वास्तुशैलीसारखी आहे.

बराबार गुहा या मौर्यकालीन वास्तुशैलीचे अजून एक उत्तम उदाहरण आहेत. यातील लोमस ऋषी गुहेचा पुढील भाग महत्त्वाचा आहे. या गुहा मौर्यांनी बौद्धांमधील आजीविक संप्रदायांना देऊ केल्या होत्या.

अशोकाचे स्तंभ ह्या सर्वांत जास्त पसरलेल्या मौर्य वास्तू आहेत. बरेचसे स्तंभ सुंदरतेने सजवलेले आढळले आहेत. संपूर्ण भारतीय उपखंडात ते चाळीसहून अधिक सापडले आहेत.

साम्राज्याचा अस्त[संपादन]

अशोकाच्या राजवटीनंतर ५० वर्षे दुर्बल राजांनी मौर्य साम्राज्यावर राज्य केले. बृहद्रथ हा या साम्राज्याचा शेवटचा राजा होता. त्याच्या कारकीर्दीत त्याचे राज्य अशोकाच्या साम्राज्याहून खूपच लहान होते. तो बुद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता.

बृहद्रथाची हत्त्या[संपादन]

बृहद्रथाची हत्त्या इ.स.पू. १८५ मध्ये लष्करी संचलनादरम्यान त्याच्या मुख्य ब्राह्मण सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंग याने केली. त्याने मौर्य साम्राज्याच्या जागी शुंग साम्राज्याची स्थापना केली. "अशोकवदन" सारख्या बौद्ध ग्रंथात बृहद्रथाच्या मृत्यूमुळे व शुंगांच्या उदयामुळे हिंदू धर्माचे पुनरुत्थान व बौद्धांविरोधी लाट आली असे लिहिले आहे. सर जॉन मार्शल यांच्या म्हणण्याप्रमाणे बौद्ध धर्माविरोधीच्या लाटेला स्वतः पुष्यमित्र शुंगच कारणीभूत असावा, परंतु नंतरचे शुंग राजे बौद्ध धर्माला समर्थन करणारे होते हे लक्षात आले आहे. मात्र एटिने लॅमोते व रोमिला थापार तसेच इतर इतिहासकारांनी सांगितले आहे की बौद्ध धर्माला विरोध करण्यासंबंधी ऐतिहासिक पुरावा सापडत नसल्याने बौद्ध धर्मासंबंधीचा विरोध अतिशयोक्तीपूर्ण आहे.

भारत-ग्रीक राज्याची स्थापना[संपादन]

मौर्यांचे साम्राज्य संपुष्टात आल्यावर खैबर खिंड असुरक्षित बनली व पुढील काळात तेथून परकीय आक्रमणे आली. ग्रीस-बॅक्ट्रियाचा राजा डिमेट्रियस याने या परिस्थितीचा फायदा घेऊन इ.स.पू. १८०च्या सुमारास दक्षिण अफगाणिस्तान व पाकिस्तान जिंकून घेतले. त्याने भारत-ग्रीक राज्य स्थापन केले. ग्रीकांनी पुढील शंभर वर्षांच्या कालखंडात मध्य भारतावर चढाई केली. या ग्रीक राजांच्या कारकीर्दीत बौद्ध धर्म खूपच फोफावला तसेच राजा मिनँडर हा बौद्ध धर्मातील महत्त्वाची व्यक्ती बनला. परंतु या राजांचे राज्य कुठवर पसरले होते हे विवादात्मक आहे. नाणकशास्त्रात्मक पुराव्यांवरुन लक्षात येते की त्यांचे राज्य ख्रिस्तजन्माच्या कालखंडापर्यंत शिल्लक होते. परंतु त्यांनी शुंग, सातवाहनकलिंग अशा प्रबळ स्थानिक सत्तांसी केलेला संघर्ष संदिग्ध आहे. परंतु हे स्पष्ट आहे शक (सिथियन) टोळ्यांनी इ.स.पू. ७०च्या सुमारास भारत-ग्रीक राज्याचा पराभव करुन सिंधू नदी च्या आसपासचा प्रदेश, मथुराजवळील प्रदेश व गुजरात हे प्रदेश जिंकले.

संदर्भ[संपादन]

  1. अ हिस्टरी ऑफ इंडिया भाग १ (इंग्रजी) (रोमिला थापार)
  2. हिस्टरीफाइल्स या संकेतस्थळावरुन
  3. गुगल बुक्सवरील द फर्स्ट ग्रेट पॉलिटिकल रिॲलिस्ट: कौटिल्य ॲन्ड हिज अर्थशास्त्र
  4. नमिता संजय सुगंधी यांचे बिट्वीन द पॅटर्न्स ऑफ हिस्टरी: रिथिंकींग मौर्यन इंपेरियल इन्टरॅक्शन इन द सदर्न डेक्कन हे पुस्तक
  5. हिस्टरीफाईल्स.कॉ.युके

बाह्य दुवे[संपादन]