आंबा (गाव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंबा कोल्हापूर-रत्‍नागिरी रस्त्यावर आंबा घाटाच्या आधी हे गाव आहे. पर्यावरणदृष्ट्या जैवविविधतेने विशेष करून संपन्न आणि प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाटामध्ये आंबा हे गाव आहे.थंड हवा आणि निसर्गरम्य परिसर यामुळे हे गाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

  ?आंबा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
९.१९ चौ. किमी
• ५९९.८१ मी
जवळचे शहर मलकापूर
विभाग पुणे
जिल्हा कोल्हापूर
तालुका/के शाहूवाडी
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
१,१९५ (२०११)
• १३०/किमी
९३० /
भाषा मराठी
आंबेश्वर देवराई

लोकसंख्या व भौगोलिक स्थान[संपादन]

आंबा गावाच्या सर्वात जवळचे शहर मलकापूर ११ किलोमीटर अंतरावर आहे. हे ९१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २५६ कुटुंबे व एकूण ११९५ लोकसंख्या आहे. यामध्ये ६१९ पुरुष आणि ५७६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ७८ असून अनुसूचित जमातीचे ११ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६७०२६ आहे.[१]

साक्षरता[संपादन]

  • एकूण साक्षर लोकसंख्या: ८०१
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ४४३ (७१.५७%)
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ३५८ (६२.१५%)

व्यवसाय[संपादन]

गावातील बहुतेक लोकांचा शेती हा व्यवसाय असून ते पावसाच्या पाण्यावर भात, नाचणी अशी पिके घेतात. काही शेतकरी कलिंगड, बटाटे अशी पिके सुद्धा घेतात. गावात पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळालेली असल्यामुळे अनेक लोक रिसॉर्टमध्ये काम करतात.काही गावकऱ्यांची स्वतःच्या मालकीची रिसॉर्टसुद्धा आहेत.

जैवविविधता[संपादन]

हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे.

वनस्पती[संपादन]

आंबा आणि परिसरातील जंगलात आंबा,जांभूळ,पायर,कदंब,दालचिनी,आवळा,हिरडा,बेहडा,कडीलिंब,बकुळ,कुंकूफळ,आळू,सुरू,साग,बांबू,तोरण,कुंभा,कोकम,कटक वृक्ष,कुड्याचे चांदकुडा, पांढरा कुडा, कृष्ण कुडा, नागल कुडा हे प्रकार, राळधूप,सीतेचा अशोक, काळा उंबर, भुई उंबर, साधा उंबर हे उंबराचे प्रकार,आवळा इ. वृक्ष आहेत. मोठ्या प्रमाणावर करवंदाच्या जाळ्या आहेत.

प्राणी[संपादन]

आंबा आणि परिसरातील जंगलात बिबट्या,शेकरू,गवा,ससा,अजगर,साप,खार इ. प्राणी आढळतात.

पक्षी[संपादन]

आंबा आणि परिसरातील जंगलात शिपाई बुलबुल,लाल बुडाचा बुलबुल, खाटीक,वेडा राघू, घार, कापशी घार,ब्राह्मणी घार, मलबार धनेश,मोठा भारतीय धनेश, सर्पगरुड, स्वर्गीय नर्तक,हरीयल,रान कोंबडा,ब्राहमणी मैना,काडीवाली पाकोळी,टिटवी इ. पक्षी आढळतात. पायरच्या झाडाला फळे आली की मोठे भारतीय धनेश हमखास जंगलातून गावात फळे खाण्यासाठी येतात.भारतीय पिट्टा उर्फ नवरंग, ब्लॅकबर्ड [मराठी शब्द सुचवा], धोबी हे स्थलांतरीत पक्षी सुद्धा आढळतात.

फुलपाखरे[संपादन]

आंबा आणि परीसर विविध प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध असल्यामुळे येथे असंख्य जातींची फुलपाखरे आढळतात.महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू असलेले ब्ल्यू मॉरमॉन हे आकाराने बरेच मोठे असलेले आणि सुंदर फुलपाखरू सुद्धा येथे आढळते.

पर्यटनस्थळे[संपादन]

आंबेश्वर मंदिर

आंबेश्वर देवालय[संपादन]

येथील आंबेश्वर देवालय महाराष्ट्रातील जुन्या देवरायांपैकी एका देवराईमध्ये आहे.सुमारे 4 एकर परिसरात ही देवराई पसरलेली आहे. सुमारे 300 ते 400 वर्षे जुनी आहे. देवराई मधील वृक्ष तोडले जात नसल्यामुळे ही देवराई घनदाट आहे आणि मानवी हस्तक्षेप कमी असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता सुद्धा आढळते. आंबेश्वर मंदिरात शंकराची पिंड आहे. हे ग्रामदैवत आहे. तसेच विठ्ठलाई, नवलाई, वाघजाई, खानजाई, चांदभैरी या इतर ग्रामदेवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत.नवरात्रामध्ये उपास करणारे भक्त नऊ दिवस देवळातच मुक्काम करतात, अशी येथील प्रथा आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा सुद्धा आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. तसेच वीरगळ आहे.

देवराईतील वनस्पती[संपादन]

देवराईमध्ये सोनचाफा, कोकम, काटेसावर,आंबा,पिम्पारणी,वड,किंजळ,बांबू,कदंब,सातवीण असे अतिशय उंच वाढलेले वृक्ष आढळतात. अनेक वनौषधींनी ही देवराई समृद्ध आहे.

पावनखिंड[संपादन]

आंब्यापासून जवळच पावनखिंड हे बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यामुळे प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक ठिकाण आहे.

  • कोकण कडा
  • मानोली धरण

शैक्षणिक सुविधा[संपादन]

आंब्यामध्ये आंबा हायस्कूल ही माध्यमिक शाळा आहे.

माहिती केंद्र[संपादन]

पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने आंबा हे महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे येथे वनखात्याच्या वतीने 'निसर्ग माहिती केंद्र' चालवले जाते. परिसरात आढळणाऱ्या जैव विविधतेविषयी माहिती येथे दिली जाते.

जमिनीचा वापर[संपादन]

नृसिंह मंदिर

आंबा ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • वन: ३२०.६८
  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: १८.७७
  • लागवडीयोग्य पडीक जमीन: १९.१३
  • पिकांखालची जमीन: ५६०.४२
  • एकूण कोरडवाहू जमीन: ७.४
  • एकूण बागायती जमीन: ५५३.०२

सण आणि उत्सव[संपादन]

दरवर्षी नृसिंह जयंतीच्या दिवशी गावात जत्रा भरवली जाते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]