केळ
मूसा जातिच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात. केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठीच याची लागवड करण्यात येते केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर पानाची लांबी हि साडेतीन मीटर असू शकते. केळीची लागवड कंदापासून केली जाते. केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर याच्या पानाची लांबी हि साडेतीन मीटर असू शकते. केळीला येणारी फळे हि घडामध्ये येतात याला लोंगर असे म्हणतात. एक घडामध्ये साधारणत: १० फण्या असतात तर एका फणीस १६-१८ केळी असतात. याचे फुल/फुलोरा हे तपकिरी रंगाचे असते. कच्ची फळे हिरवी तर पिकलेली पिवळी किंवा लालसर दिसतात. [1] याला शास्त्रीय नाव मुसा इंडिका (Musa indica ) केळी ही वनस्पती वृक्ष असून सुद्धा तिला खोड नाही. या वनस्पतीचा जीवाश्म मध्येसुद्धा संदर्भ दिसतो .अतिशय जलद गतीने ऊर्जा देणारे हे महत्त्वाचे फळ आहे.
लागवड[संपादन]
क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळी उत्पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने किंवा परप्रांतात विक्रीच्या दृष्टीने होणा-या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला उत्पादनापैकी सुमारे ५० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्हयांत आहे. म्हणून जळगांव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते. मुख्यतः उत्तर भारतात जळगाव भागातील बसराई केळी पाठविली जाते. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया इराण, कुवेत, दुबई, जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात केली जाते. त्यापासून मोठया प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. केळीच्या ८६ टक्केहून अधिक उपयोग खाण्याकरीता होतो. पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात. फळापासून टिकावू पूड, मुराब्बा, टॉफी, जेली इत्यादी पदार्थ बनवितात. वाळलेल्या पानाचा उपयोग आच्छादनासाठी करतात. केळीच्या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्हणून उपयोगात आणतात. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून उपयोग केला जातो.
लागवडीचा हंगाम[संपादन]
केळीच्या लागवडीचा मोसम हवामानानुसार बदलत असतो. कारण हवामनाचा परिणाम केळीच्या वाढीवर, फळे लागण्यास व तयार होण्यास लागणारा कालावधी या वरच होत असतो. जळगांव जिल्हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्या सुरुवातीस सुरु होतो. यावेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते. जून जुलै मध्ये लागवड केलेल्या बागेस मृगबाग म्हणतात. सप्टेबर ते जानेवारी पर्यात होणा-या लागवडीस कांदेबाग म्हणतात. जून जूलै पैकी लागवडीपेक्षा फेब्रूवारी मध्ये केलेल्या लागवडीपासून अधिक उत्पन्न मिळते. या लागवडी मुळे केळी १८ महिन्याऐवजी १५ महिन्यात काढणे योग्य होतात.
लागवड पध्दत[संपादन]
लागवड करताना ०.५*०.५*०.५ मीटर आकाराचे खड्डे खोदून किंवा स-या पाडून लागवड करतात. दोन झाडातील अंतर बसराई जाती करिता १.२५ किंवा १.५० मीटर असते.
खते व वरखते[संपादन]
या झाडाची मुळे उथळ असतात. त्यांची अन्नद्रव्यांची मागणी जास्त असते. त्यामुळे वाढीच्या सुरुवातीच्या काळात (पहिले चार महिने) नत्रयुक्त जोरखताचा हप्ता देणे महत्वाचे ठरते. प्रत्येक झाडास २०० ग्रॅम नत्र तीन समान हप्त्यात लावणीपासून दुस-या तिस-या व चौथ्या महिन्यात द्यावे. प्रत्येक झाडास प्रत्येक वेळी ५०० ते ७०० ग्रॅम एरंडीची पेंड खतासोबत द्यावी. शेणखताबरोबर ४०० ग्रॅम ओमोनियम सल्फेट प्रत्येक झाडास लावणी करतांना देणे उपयुक्त ठरते.
दर हजार झाडास १०० कि. नत्र ४० कि. स्फूरद व १०० कि. पालांश ( प्रत्येक खोडास) १०० ग्रॅम नत्र ४० ग्रॅम स्फूरद, ४० ग्रॅम पालाश म्हणजेच हेक्टरी ४४० कि. नत्र १७५ कि. स्फूरद आणि ४४० कि. पालाश द्यावे.
उत्पादन[संपादन]

केळीच्या उत्पादनात जागतिक पातळीवर भारत प्रथम आणि भारतात महाराष्ट्र राज्य प्रथम आहे. केळीच्या जागतिक उत्पादनापैकी भारतात २० टक्के उत्पादन होते तर भारतातील एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात २५ उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा व यावल ही तालुके केळी उत्पादनात अग्रेसर आहे.
जाती[संपादन]
बसराई, श्रीमंती, वेलची, सोनकेळी, लाल केळी, चक्रकेळी, कुन्नन, अमृतसागर, बोंथा, विरूपाक्षी, हरिसाल, सफेद वेलची, लाल वेलची, वामन केळी, ग्रोमिशेल, पिसांग लिलीन, जायंट गव्हर्नर, कॅव्हेन्डीशी, ग्रॅन्ड नैन, राजापुरी, बनकेळ, भुरकेळ, मुधेली, राजेळी
उपयोग[संपादन]
पूर्वीपासून केळी फळाचा मुख्य उपयोग खाण्यासाठी केला जातो. सध्या केळी पासून केळीचे वेफर्स, केळीचा जॅम, केळीची भुकटी, केळीचे पीठ, केळीची प्युरी, सुकेळी, केळीचे पेठे, केळीची दारू, ब्रॅन्डी, शिरका, केळी बिस्कीट असे कितीतरी पदार्थ बनवले जातात.
कच्या केळीची भाजी पूर्वीपासूनचा बनवतात. केळीच्या पानांचा उपयोग दक्षिण भारतात जेवण वाढण्यासाठी केला जातो. केळीच्या पानांचा उपयोग जनावरांना चारा म्हणूनही होतो तसेच वाळलेली पाने इंधन म्हणून वापरता येते. केळी हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आणि याचा वापर नेहमी आहारात समावेश केल्यास आपले आरोग्य चांगले राहते.कच्च्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, विटॅमिन बी ६, विटॅमिन सी,स्टार्च तसेच अॅन्टिऑक्सिडेंट्स असतात.
केळी खाण्याचे फायदे[संपादन]
- दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.
- अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत.
- ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
- परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरुर केळे खा.
- केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.
- केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. यात पोटॅशियम, फॉलिक ॲसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम असते.
- जुलाबाचा त्रास होत असल्यास केळे खाणे उत्तम.
- केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते.
- रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते.
- अधिक मद्यपान केल्याने हॅंगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.
- मलावरोध-यातील फायबर आणि हेल्दी स्टार्चमुळे आतडी स्वच्छ होतात.मल साचून राहत नाही. यामुळे मलावरोधची समस्या नष्ट होते.
- भूक शमते-यातील फायबर्स आणि अन्य पोषक तत्त्वांमुळे भूक नियंत्रित होते. वेळोवेळी भूक लागत नाही.
- कॅन्सर-कॅन्सरपासून बचाव होतो. यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. मूड स्विंगची समस्या दूर होते.
- पचनक्रिया-यामुळे पाचक रसांचे स्त्रावण उत्तम होऊन पचनक्रिया सुधारते.
- लठ्ठपणा-रोज एक कच्चे केळे खाल्ल्यास यातील फायबर्समुळे अनावश्यक फॅट सेल्स आणि अशुद्धता नष्ट होते.
- मधुमेह-मधुमेहाचा प्राथमिक स्तर असल्यास कच्चया केळीचे सेवन करावे. मधुमेह नियंत्रणात राहतो.
सांस्कृतिक महत्त्व[संपादन]
हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला, आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुंज अशा शुभकार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर दोन केळीचे उंच व पाने असलेले खांब रोवून त्याचे तोरण केले जाते. आपण हे ही अनेक दा आपण एकले असेल ही ज्या मुलांचे विवाह जुळत नाही त्या वेळेस ही याच झाडाची पूजा आपणास करावयास सांगितली जाते. की आपण जेव्हा केळीच्या पानावर गरम गरम वाढतो. तेव्हा पानमधील असलेले पोशाक तत्वे अन्नात मिसळतता. जे आपल्या शरीरासाठी योग्य असतातत. या मुळे आपल्या शरीरावर खाज,डाग,पुरळफोड अशा समस्या दूर होततात.केळीच्या पानमध्ये “एपिगोलो गट्लेत’’आणि ईजेसीजी सारखे पायलिफिलोस आंटी ऑक्ससेड आढळतता.याच पणामुळे आंटी ऑक्ससाईड आपणास मिळतता. या मुळे आपल्याला त्वचेवर दीर्घकाळ तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. मेंदूला होणारा रकतस्राव सुरळीत चालू शकतो. केळीच्या पानावर जेवण केल्यास अन्नपचन पण सोपे होते. केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून ते पण त्वचेवर गुंडा ळून लावल्यास त्वचेचा आजार ठीक होतो .]2
केळीपासून बनवले जाणारे पदार्थ[संपादन]
जेली[संपादन]
५० टक्के पिकलेल्या केळीचा गर पाण्यात एकजीव करून १५ ते २० मिनिटे गरम करावा. तो गर गाळून घ्यावा. गाळलेल्या गरात समप्रमाणात साखर, ०.५ टक्के सायट्रेिक आम्ल व पेक्टीन टाकून उकळी येईपर्यंत मिश्रण शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे १०४ अंश से.असते. तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी. पेरूच्या जेलीपेक्षा केळीची जेली पारदर्शक व स्वादिष्ट असते.
जॅम[संपादन]
कोणत्याही जातीच्या पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्रीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन, ०.३ टक्के सायट्रेिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८ ते ७० डिग्री झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे. तयार जॅम कोरड्या व निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावा. हा पदार्थ एक वर्षापर्यंत टिकू शकतो.