११ जुलै २००६ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झालेला डबा (CNN-IBN News)
पश्चिम रेल्वेवरील बॉम्बस्फोट झालेली ठिकाणे दाखवणारी आकृती

भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जुलै ११, इ.स. २००६ रोजी एकापाठोपाठ एक अशा ७ बॉम्बस्फोटांची मालिका झाली. हया हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या १२ मार्च १९९३ च्या मुंबईवरील बॉम्बहल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. ह्या हल्ल्यामध्ये २०० लोक मृत्युमुखी पडले व साधारण ७०० लोक जखमी झाले.

सविस्तर माहिती[संपादन]

सगळे हल्ले मुंबईमधील पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर अथवा ट्रेनमध्ये (प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले) झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:२४ ते ६:३५ ह्या ११ मिनिटांच्या कालावधीत हे हल्ले झाले. मुंबईची धमनी समजली जाणारी पश्चिम रेल्वे दररोज अंदाजे ४५ लाख प्रवाशांची ने-आण करते. ह्या हल्ल्यांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. अडकलेल्या प्रवाशांना ११ जुलैची रात्र त्यांचे जवळ राहणारे नातेवाइकांकडे काढावी लागली. ज्यांना हे शक्य नव्हते त्यांच्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेजांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली होती. बेस्टनेही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आपल्या सर्व बसेस रस्त्यावर आणल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख ह्यांनी मृतांच्या नातेवाइकांना १ लाख व जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. भारतीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव ह्यांनी रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जवळच्या नातेवाइकाला रोजगार हमीची घोषणा केली. ह्या घटनेची इंग्रजीमध्ये माहिती येथे (इंग्रजी विकिपीडियामध्ये) मिळेल.

११ जुलै २००६ मुंबई बॉम्बस्फोटांमधील जीवितहानी दाखवणारा तक्ता
स्थळ काळ (भारतीय प्रमाण वेळ) मृतांची संख्या जखमींची संख्या
खार रोड १८:२४ ? ?
जोगेश्वरी १८:२५ ? ?
माहिम १८:२६ ? ?
मीरा रोड १८:२९ ? ?
माटुंगा रोड १८:३० ? ?
बोरीवली १८:३५ ? ?
वांद्रे (बांद्रा) ? ? ?
एकूण ११ मिनिटे १८९ ८१७

बाँबस्फोटाच्या कटाची योजनाबद्ध आखणी[संपादन]

अतिशय योजनाबद्धरीत्या व्यूहात्मक पातळीवर अधिकाधिक काळजी घेऊन साखळी बाँबस्फोटाची योजना आखण्यात आली. तिच्यासाठी दहशतवादी तयार करण्यापासून अनेक बाबींवर खास मेहनत घेण्यात आली.

  • मार्च २००६ : बहावलपूर येथे लष्करे तैय्यबाचा सूत्रधार अझम चिमा याच्या हवेलीत कटाचा डाव शिजला, त्यात ‘सिमी’ आणि ‘लष्कर’चे नेते यांना सामील करून दोन मोड्युल्स ठरविण्यात आली. ५० जणांना बहावलपूरला प्रशिक्षणासाठी पाठविले, तेथे त्यांना खास प्रशिक्षण दिले.
  • २५ जून २००६ : ‘लष्कर’ने बाँबरना भारतात घुसवले. नेपाळ सीमेमार्गे कमाल अन्सारीने दोघा पाकिस्तानींना, अब्दुल माजीदने पाच जणांना बांगलादेश मार्गे आणि चौघांना कच्छमार्गे भारतात आणले.
  • २७ जून २००६ : मुंबईच्या उपनगरांत चार ठिकाणी ११ जणांना पेरण्यात आले.
  • ८ ते १० जून २००६ : एहसान उल्लाहने १५ ते २० किलो आरडीएक्‍स पाकिस्तानातून कांडलामार्गे भारतात आणले. अमोनिअम नायट्रेट मुंबईत खरेदी केले. सांताक्रूझ भागातील दोन ठिकाणांवरून ८ प्रेशर कुकर खरेदी केले.
  • ९ ते १० जुलै २००६ : गोवंडीतील महम्मद अलीच्या फ्लॅटमध्ये बाँब बनविले.

घटनाक्रम[संपादन]

  • ११ जुलै २००६ - आरोपी वेगवेगळ्या टॅक्‍सीमधून चर्चगेट रेल्वे स्टेशनवर गेले, तेथे वेगवेगळ्या उपनगरी गाड्यांमध्ये (लोकल) स्फोटकांच्या सात पिशव्या ठेवल्या. सायंकाळी ६.२४ वाजता माटुंग्यातील लोकलच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात स्फोट झाला, नंतरच्या आठ मिनिटांमध्ये भाईंदर, सांताक्रूझ, माहीम, वांद्रे, जोगेश्‍वरी, बोरीवली, खार रोड या स्थानकांवर स्फोटाच्या घटना घडल्या. १८९ लोक ठार आणि ८१७ जण जखमी
  • जुलै ते ऑक्‍टोबर २००६ - या कालावधीत मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) ‘सिमी’शी संबंधित १३ जणांना अटक. १९७७ मध्ये उत्तर प्रदेशात स्थापलेल्या ‘सिमी’वर नंतर बंदी घातली होती.
  • ३० नोव्हेंबर २००६ - ‘एटीएस’तर्फे अटकेतल्या १३ आणि फरार १५ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र
  • २९ सप्टेंबर २००६ - प्रेशर कुकरमध्ये स्फोटके ठेवून ते वेगवेगळ्या लोकलच्या डब्यांत ठेवण्याचे काम ‘लष्कर ए तैयबा’च्या सदस्यांनी केले, असा मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त ए. एन. रॉय यांचा दावा
  • जून २००७ - सुनावणीला सुरुवात
  • फेब्रुवारी २००८ - ‘मोक्कां’तर्गत वापरलेला ‘प्रमोटिंग इनसर्जन्सी’ हा वाक्‍प्रयोग घटनाबाह्य आहे, असा दावा १३ संशयितांपैकी कमाल अन्सारी याने केल्याने सर्वोच्च न्यायालयाची सुनावणीला स्थगिती
  • सप्टेंबर २००८ - इंडियन मुजाहिदीनच्या (आयएम) ऑपरेटिव्हला अटक
  • एप्रिल २०१० - सर्वोच्च न्यायालयाने कमाल अन्सारीचा अर्ज फेटाळत खटल्याची सुनावणी सुरू करण्याचा आदेश दिला
  • १३ फेब्रुवारी २०१० - आरोपी फाहिम अन्सारी याचे वकील शाहीद आझमी यांची मुंबईतील कार्यालयात गोळ्या घालून हत्या
  • ३० ऑगस्ट २०१३ - इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासीन भटकळ याला भारत-नेपाळ सीमेवर इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोने साखळी बाँबस्फोटाबद्दल अटक केली. २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीचे उट्टे काढण्यासाठी २००६ मध्ये साखळी स्फोट घडविल्याचे यासीनने सांगितले, त्यामुळे ‘एटीएस’ने अटक केलेल्या १३ जणांबाबत प्रश्‍न निर्माण झाला
  • २० ऑगस्ट २०१४ - सरकारी पक्षाने २०० साक्षीदारांच्या आणि बचाव पक्षाने ४० साक्षीदारांच्या साक्षी तपासल्यानंतर खटल्याचे कामकाज आठ वर्षांनंतर संपले. खास न्यायाधीश यतीन शिंदे यांच्यासमोर कामकाज चालले
  • ११ सप्टेंबर २०१५ - खास न्यायालयाने १३ आरोपींना दोषी ठरवले.
  • ३० सप्टेंबर २०१५ - खास न्यायाधीश यतीन शिंदे यांनी पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, तर सातांना जन्मठेपेची शिक्षा दिली.

खटल्याचा निकाल[संपादन]

मुंबई शहरात पश्‍चिम लोहमार्गावर ११ जुलै २००६ रोजी सात लोकल गाड्यांमध्ये झालेल्या भीषण बाँबस्फोटांच्या खटल्यातील पाच आरोपींना ३० सप्टेंबर २०१५ला विशेष मोक्का न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची, तर अन्य सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ती अशी -

  • विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन शिंदे यांनी बाँबस्फोटातील सर्व बारा दोषी आरोपींना प्रत्येकी सुमारे अकरा लाख असा एकूण १.५१ कोटी रुपयांचा दंडही सुनावला आहे.
  • फाशीची शिक्षा सुनावलेले आरोपी (एकूण ५)
    • कमाल अहमद अन्सारी
    • मोहंमद फैजल शेख
    • एहत्तेशाम सिद्दिकी
    • नावेद हुसेन खान
    • असिफ खान

या बाँबस्फोटामध्ये १८९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाचही आरोपींना न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम ३०२ (हत्या), १२० ब (कटकारस्थान) आणि मोक्काच्या कलम ३ (१) नुसार (संघटितपणे कटकारस्थान रचून हत्या घडविणे) दोषी ठरविले आहे. यानुसार आरोपींना मरेपर्यंत फाशी द्या, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

  • जन्मठेपेची शिक्षा झालेले आरोपी
    • तन्वीर अहमद अन्सारी
    • मोहंमद माजिद शफी
    • शेख आलम शेख
    • मोहंमद साजिद अन्सारी
    • मुझ्झमील शेख
    • सोहेल मेहमूद शेख
    • जमीर अहमद शेख

सर्व आरोपींचे बंदी घातलेल्या सिमी संघटनेशी संबंध होते, असे विशेष तपास पथकाने (एटीएस) जाहीर केले होते. मात्र पाकिस्तानमधील लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेशी संधान बांधून हा स्फोट घडविल्याचा दावाही नंतर एटीएसने केला. भारतीय दंड विधानासह स्फोटके कायदा, हत्यारे कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता या कायद्यान्वये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. या बाँबस्फोटात ८२९ जण गंभीर जखमी झाले होते. एकूण तेरा आरोपींपैकी एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. याशिवाय अद्याप तेरा आरोपी फरार असून सर्व पाकिस्तानी आहेत. शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपींच्या नातेवाइकांची बाजूही न्यायालयाने ऐकली होती. आरोपींना कमी शिक्षा देण्याची विनवणी नातेवाइकांनी केली होती.

बाह्य दुवे[संपादन]