त्रेता युग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्रेता युग हा त्यातील दुसरा भाग आहे. वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) दिवशी या युगाचा आरंभ झाला असे मानले जाते. या युगाच्या आरंभी वर्णाश्रम व्यवस्था अस्तित्वात आली असे मानले जाते.[१]

युगाची कल्पना[संपादन]

वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यांतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलीयुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०२ मध्ये झाला असे मानले जाते.[२]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा.
  2. ^ थापर, रोमिला. द पेंग्विन हिस्ट्री ऑफ अर्ली इंडिया : फ्रॉम द ओरिजिन्स टू एडी १३०० (इंग्रजी भाषेत).