एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://www.manogat.com/node/20254 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.




एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (टोपणनाव: मंदार; १ जुलै, इ.स. १८८७:रेंदाळ - २२ नोव्हेंबर, इ.स. १९२०:रेंदाळ) हे एक मराठी कवी होते. कोल्हापूरजवळच्या रेंदाळ या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. या गावाचे कुलकर्णीपण रेंदाळकरांच्या वाडवडिलांकडे होते. सुरुवातीच्या काळातील रेंदाळकरांच्या कवितांवर रेंदाळकर या आडनावाऐवजी कुलकर्णी असे आडनाव आढळते, त्याचे कारण हेच होय.

बालपण[संपादन]

रेंदाळकरांचे बालपण रेंदाळ आणि कुरुंदवाड येथे गेले. रेंदाळ येथे केवळ प्राथमिक शिक्षणापर्यंतचीच सोय त्या काळी असल्याने चौथीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी रेंदाळकर कागलला गेले. कागल येथे रेंदाळकरांचे वास्तव्य असतानाच्याच काळात त्यांचे वडील वारले. पंधराव्या-सोळाव्या वर्षी झालेला हा आघात रेंदाळकरांना सोसणे फार जड गेले.

नोकरी[संपादन]

१९०५ मध्ये रेंदाळकरांनी बेळगाव जिल्ह्यातील कुन्नूर (चिक्कोडी तालुका) या गावी शिक्षकाची नोकरी केली. रेंदाळकरांना वाचनाचा दांडगा छंद होता. कुन्नूरसारख्या खेड्यात तो भागेना व एकंदरीतच तेथील नीरस जीवनालाही ते कंटाळून गेले व त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

संस्कृतचा अभ्यास[संपादन]

रेंदाळकरांना उत्तम कविता करायची फार इच्छा होती, परंतु अक्षरगण वृत्तांत कविता लिहायची तर संस्कृत भाषेत प्रावीण्य हवे, असे त्यांच्या मनाने घेतले व संस्कृत शिकण्याचा निश्चय करून ते सांगलीत आले. तेथे ते संस्कृत पाठशाळेत जाऊ लागले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातील विख्यात संस्कृतज्ञ बाळशास्त्री हुपरीकर हे त्यांचे आप्त होते. 'सिद्धान्त कौमुदी'चे अध्ययन करण्याचीही रेंदाळकरांची इच्छा होती. ती त्यानी हुपरीकरांना कळविली व होकार येताच, १९०९ च्या सुमारास सांगलीतील मुक्काम हलवून रेंदाळकर कोल्हापूरला आले. तेथे त्यांनी दोन वर्षे सिद्धान्त कौमुदीचे अध्ययन केले.

कवितालेखन[संपादन]

कोल्हापूरच्या मुक्कामात रेंदाळकरांमधील कवित्व बाळशास्त्री हुपरीकरांच्या ध्यानी आले. त्यांनी रेंदाळकरांना प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात त्या काळी 'विजयी मराठा' हे साप्ताहिक निघत असे. याच साप्ताहिकात रेंदाळकरांच्या सुरुवातीच्या काळातील कविता प्रसिद्ध झाल्या. मात्र, 'मंदार' या टोपणनावाने त्या प्रसिद्ध होत असत.

रेंदाळकरांना बंगाली भा़षा उतम येत होती. त्यांनी तरुलता मुझुमदार, मधुसूदन मायकेल दत्त या बंगाली कवींच्या कवितांचे मराठी रूपांतर केले आहे. बंगालीबरोबरच काही संस्कृत, इंग्रजी व क्वचित गुजराती काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या.

पहिली कविता[संपादन]

इ.स. १९०८ साली 'वरिवरी जळे बाळे! डोळे अहा भरले किती!' ही रेंदाळकरांची अगदी पहिली कविता 'केरळ कोकिळा'मध्य़े प्रसिद्ध झाली. या मासिकाचे विख्यात संपादक कृष्णाजी नारायण आठवले हे चोखंदळ व चिकित्सक म्हणूनच प्रसिद्ध होते. रेंदाळकरांच्या काव्यगुणांची आठवले यांनी त्यांच्या कवितेखालीच मनमोकळी स्तुती केली होती.

कवितासंग्रह[संपादन]

पुढे कोल्हापुरातील जगद्गुरू मठातर्फे 'धर्मविचार' हे मासिक सुरू झाले. रेंदाळकर त्याचे सहसंपादक झाले. हे काम एकीकडे सुरू असताना त्यारेंदाळकरांचे कवितालेखनही जोमात होते. याच काळात 'मंदारमंजरी' या शीर्षकाने १९१० रोजी रेंदाळकरांनी निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. 'सुधारक', 'विविधज्ञानविस्तार', 'मनोरंजन', 'प्रगती' इत्यादी त्या वेळच्या नियतकालिकांत या पुस्तकाची प्रशंसापर परीक्षणे प्रसिद्ध झाली. 'मंदारमंजरी'मुळे महाराष्ट्रातील मान्यवर कवींमध्ये त्यांची गणना होऊ लागली.

रेंदाळकरांचे सांगलीतील वास्तव्य वामन जनार्दन कुंटे यांच्या वाड्यात होते. पुढे कुंटे त्यांचे गाढ स्नेही झाले. रेंदाळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कवितांचे दोन खंड कुंटे यांनी प्रसिद्ध केले. कुंटे यांच्यामुळेच रेंदाळकरांच्या कविता महाराष्ट्रापुढे आल्या. या कविता रेंदाळकरांची कविता' (दोन भाग, १९२४; १९२८) ह्या नावाने संकलित करण्यात आल्या आहेत.

रेंदाळकरांनी आंग्ल कवी टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’ या काव्याचे ‘सारजा’ ह्या नावाने मराठीत रूपांतर केले.

रेंदाळकरांचे प्रकाशित काव्यसंग्रह[संपादन]

  • अन्योक्तिमुक्तांजंलि (दोन भाग, १९११;१९१५)
  • मंदारमंजरी (१९१०)
  • बुद्धिनीति (१९१६)
  • मोहिनी (खंडकाव्य, १९१३)
  • यमुनागीत (दीर्घकाव्य)
  • विरहिणी राधा (१९१६)
  • सारजा (दीर्घकाव्य)

संपादकीय कारकीर्द[संपादन]

रेंदाळकर सहसंपादक असलेल्या 'धर्मविचार'चे प्रकाशन १९१२ मध्ये एका वर्षापुरते स्थगित झाले. त्यानंतर रेंदाळकर मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या 'मासिक मनोरंजन'मध्ये साहाय्यक संपादक म्हणूम रुजू झाले. तेथे आधीच पदावर असलेल्या विठ्ठल सीताराम ऊर्फ वि.सी. गुर्जर यांच्याबरोबरच 'मनोरंजन'वर रेंदाळकरांचेही नाव झळकू लागले. गुर्जर यांचे ते साहाय्यक होते.'मनोरंजन'शिवाय 'करमणूक', विविधज्ञानविस्तार' येथेही निरनिराळ्या काळी रेंदाळकर संपादक म्हणून काम करत होते.

कौटुंबिक माहिती[संपादन]

रेंदाळकरांचे लग्न वयाच्या तेविसाव्या-चोविसाव्या वर्षी झाले. रेंदाळकरांच्या पत्नींना पुढे हिस्टेरिया जडला. १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाले. रेंदाळकर पती-पत्नीला दोन मुली आणि एक मुलगा होता.

रेंदाळकरांच्या प्रसिद्ध कविता[संपादन]

१. अजुनी चालतोचि वाट. ही कविता बालभारती या शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकात आहे.< br/> २. हे कानामागुनी आले | शाहणे फारची झाले | उघडितों तयांचे डोळे ||...संग्रामगीते (रेंदाळकरांची कविता -खंड ३)

संदर्भ[संपादन]

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले