औरंगजेब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(औरंगजेब कबर या पानावरून पुनर्निर्देशित)


औरंगजेब
बादशाह
कबूतर घेऊन बसलेला औरंगजेब, चित्रकार: कदाचित बिचित्रा
अधिकारकाळ १६५९-१७०७
राज्याभिषेक 1659
राज्यव्याप्ती अफगाण ते बंगाल, काश्मिर ते विजापूर
राजधानी आग्रा, दिल्ली, औरंगाबाद
पूर्ण नाव अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर
पदव्या बादशहा, आलमगीर
जन्म नोव्हेंबर ३, १६१८
दाहोद, भारत
मृत्यू मार्च ३, १७०७
अहमदनगर, महाराष्ट्र, भारत
पूर्वाधिकारी शाह जहान
युद्धे राजपूत, अहोम,

छत्रपती संभाजी महाराज छ्त्रपती राजाराम महाराज छ्त्रपती ताराबाई राणीसाहेब

उत्तराधिकारी आझम शाह
वडील शहाजहान
पत्नी रबीया दुराणी, दिलरास बानो बेगम
संतती * पहिला बहादूर शाह, पुत्र
राजघराणे मुघल
औरंगजेब

मुही अल-दिन मुहम्मद, जो सामान्यतः औरंगजेब (पर्शियन: اورنگ‌زیب, अर्थ: 'सिंहासनाचा अलंकार') म्हणून ओळखला जातो आणि त्याला आलमगीर असेही म्हणतात (पर्शियन: عالمگیر, रोमनीकृत: ʿĀlamgīr, अर्थ: 'जगद्विजेता'), हा सहावा मुघल सम्राट होता. जुलै १६५८ पासून १७०७ मध्ये मृत्यूपर्यंत औरंगजेबाने राज्य केले.

तो सम्राट असताना मुघलांनी जवळजवळ संपूर्ण दक्षिण आशियामध्ये पसरलेल्या त्यांच्या प्रदेशासह त्यांची सर्वोच्च सत्ता गाठली.[२][३] [४][५] शेवटचा प्रभावी मुघल शासक मानला जाणाऱ्या औरंगजेबाने फतवा 'आलमगिरी' संकलित केला होता. संपूर्ण दक्षिण आशियामध्ये शरिया आणि इस्लामिक अर्थशास्त्र पूर्णपणे लागू केलेल्या मोजक्या राजांपैकी तो एक होता.[६][७][८]

तैमुरी घराण्यातील असलेल्या औरंगजेबाचे सुरुवातीचे जीवन धार्मिक कार्यांनी व्यापलेले होते. वडील शाहजहान याच्या हाताखाली औरंगजेबाने एक कुशल लष्करी कमांडर म्हणून ओळख मिळवली. औरंगजेबाने १६३६-१६३७ मध्ये दख्खनचा सुभेदार आणि १६४५-१६४७ मध्ये गुजरातचा राज्यपाल म्हणून काम केले होते. त्याने १६४८-१६५२ मध्ये मुलतान आणि सिंध प्रांतांचे संयुक्तपणे प्रशासन केले आणि शेजारच्या सफाविद प्रदेशांमध्ये मोहीमा चालू ठेवल्या.

सप्टेंबर १६५७ मध्ये शाहजहानने त्याचा सर्वात मोठा आणि उदारमतवादी मुलगा दारा शिकोहला त्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. परंतु औरंगजेबाने हे नाकारले आणि फेब्रुवारी १६५८ मध्ये स्वतःला सम्राट म्हणून घोषित केले. एप्रिल १६५८ मध्ये औरंगजेबाने धर्मात येथील युद्धात शिकोह आणि मारवाड राज्याच्या सैन्याचा पराभव केला. मे १६५८ मध्ये समुगढच्या लढाईत औरंगजेबाच्या निर्णायक विजयाने त्याचे सार्वभौमत्व मजबूत केले आणि संपूर्ण साम्राज्यात त्याचे वर्चस्व मान्य केले गेले. जुलै १६५८ मध्ये शहाजहान आजारातून बरा झाल्यानंतर, औरंगजेबाने त्याला राज्य करण्यास अक्षम घोषित केले आणि त्याला आग्रा किल्ल्यात कैद केले.

औरंगजेबाच्या राजवटीत मुघल हे जवळजवळ संपूर्ण दक्षिण आशियामध्ये पसरलेल्या त्यांच्या प्रदेशासह सर्वात मोठ्या सत्तेवर पोहोचले. वेगवान लष्करी विस्तार हे त्याच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य होते आणि अनेक राजवंश व त्यांची राज्ये मुघलांनी उलथून टाकली. त्याच्या विजयांमुळे त्याला आलमगीर ('विजेता') ही शाही पदवी मिळाली. मुघलांनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठी उत्पादन शक्ती म्हणून छिंग चीनलाही मागे टाकले होते. मुघल सैन्यात हळूहळू सुधारणा होत गेली आणि ती जगातील सर्वात मजबूत सैन्यांपैकी एक बनली.

एक कट्टर मुस्लिम असलेल्या औरंगजेबाला असंख्य मशिदी बांधण्याचे आणि अरबी कॅलिग्राफीच्या संरक्षक कामांचे श्रेय दिले जाते. त्याने साम्राज्याची प्रमुख नियामक संस्था म्हणून फतवा अल-आलमगीर हा यशस्वीपणे लादला आणि इस्लाममध्ये धार्मिकरित्या निषिद्ध असलेल्या गोष्टींना प्रतिबंधित केले. औरंगजेबाने अनेक स्थानिक विद्रोहांना दडपून टाकले असले तरी, त्याने परदेशी सरकारांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले होते.

औरंगजेब हा सामान्यतः इतिहासकारांनी मुघलांच्या महान सम्राटांपैकी एक मानला आहे. समकालीन स्त्रोतांमध्ये औरंगजेबाची काही गोष्टींसाठी प्रशंसा केली जाते, तर राजकीय हत्या आणि हिंदू मंदिरे पाडल्याबद्दल त्याच्यावर टीका केली जाते. शिवाय त्याने या प्रदेशाचे इस्लामीकरण, जिझिया कर लागू करणे आणि गैर-इस्लामिक प्रथा बंद केल्याने गैर-मुस्लिमांमध्ये तो तिरस्करणीय आहे. औरंगजेबाचे स्मरण मुस्लिमांनी फक्त ११व्या-१२व्या इस्लामिक शतकातील शासक आणि मुजद्दीद (शताब्दी पुनरुज्जीवनकर्ता) म्हणूनच केले आहे.

राजकीय कारकिर्दीची सुरुवात[संपादन]

१६३४ मधे शाहजहानने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबने मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते औरंगाबाद केले. इ.स.१६३७ साली औरंगजेबने रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. जहान‍आरा बेगम ही औरंगजेबची थोरली बहीण. इ.स.१६४४ मध्ये औरंगजेबची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आला, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबला दख्खनच्या सुभेदारीवरून पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाही. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. तेथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदख्शान (अफगाणिस्तान) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.[ संदर्भ हवा ]

सत्तासंघर्ष[संपादन]

सन १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला तर औरंगजेबने त्याला कैद करून मारले. दाराशुकोह, शाह सुजा आणि औरंगजेब यांच्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्याने स्वतःला बंगालचा गव्हर्नर म्हणून घोषित केले होते त्या शाह सुज़ाला औरंगजेबकडून हार पत्करून ब्रह्मदेश येथील अराकानक्षेत्री जावे लागले. १६५९ साली औरंगजेबने शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व दाराशुकोहचा शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहानला मारण्यासाठी औरंगजेबने दोनदा विष पाठवले होते पण ज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहानला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकले.[ संदर्भ हवा ]

मराठ्यांविरुद्ध युद्ध[संपादन]

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबनी त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे, आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाची बोबडी वळली व तो जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून उडी मारून पळाला.तरीही शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा काल्पनिक दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.[ संदर्भ हवा ]

सुरतेचा पहिला छापा[संपादन]

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे छत्रपती शिवाजीराजे चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर छत्रपती शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहरावरच्या छापमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेचा छापा ही पूर्णपणे वेगळी जाणवते.छत्रपती शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.[ संदर्भ हवा ]

मिर्झाराजे जयसिंहाची मोहीम[संपादन]

इ.स. १६६५. औरंगजेबाने त्याचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार मुघलांना २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजीराजे यासह औरंगजेबांसमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.[ संदर्भ हवा ]

शिवाजी महाराजांची आगऱ्यातील नजरकैद[संपादन]

इ.स. १६६६ साली औरंगजेबने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचे संभाजीराजे देखील होते. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीराजेंचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीराजेंबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि युवराज संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.[ संदर्भ हवा ]

आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. संभाजी महाराजांना त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबच्या हातात पडायचे नाही.[ संदर्भ हवा ]

यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे[ संदर्भ हवा ]

सर्वत्र विजयी घोडदौड[संपादन]

शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. इ.स. १६७९ मध्ये स्वतः औरंगजेब मोठ्या फौजेसह दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला. याच दरम्यान ३ एप्रिल, इ.स. १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी राजांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. औरंगजेबने इ.स.१६८९मध्ये कपटाने संभाजीराजे यांना कैद करून ठार मारवले. २७ वर्षे सतत लढाई करूनही औरंगजेबच्या हाती काहीच लागले नाही.[ संदर्भ हवा ]

औरंगजेब धर्मांध होता. त्याने अनेक हिंदूना इस्लाममध्ये बळजबरीने धर्मपरिवर्तन करून आणले. त्यातच दक्षिणेतील मोहिमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमेतून त्याला काहीच साधता आले नाही. जबरदस्तीच्या धर्मपरिवर्तनाच्या धोरणांमुळे औरंगजेबच्या इस्लामेतर सैन्यात बंडाळी खदखदू लागली. औरंगजेबचा ३ मार्च, इ.स. १७०७ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे मृत्यू झाला. औरंगजेबनंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. इ.स. १७५१ मध्ये दिल्लीची अवस्था इतकी बिकट बनली की पेशव्यांना "अहमदिया" करार करून दिल्लीच्या आणि "शहेनशहाच्या" संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.[ संदर्भ हवा ]

मृत्यू[संपादन]

औरंगजेबाचा मृत्यू खंगुन वयाच्या ९१व्या वर्षी महाराष्ट्राच्या (भिंगार) अहमदनगर येथे झाला. त्याची कबर खुलताबाद येथे आहे[ संदर्भ हवा ]

औरंगजेबावरील मराठी पुस्तके[ संदर्भ हवा ][संपादन]

  • मुकद्दर कथा औरंगजेबाची २०२० (लेखक : स्वप्निल रामदास कोलते)
  • अकबर ते औरंगजेब (१९२३) : मूळ इंग्रजी, लेखक : विल्यम हॅरिसन मूरलॅंड (१८६८ - १९३८). मराठी भाषांतर राजेंद्र बनहट्टी
  • आलमगीर (नयनतारा देसाई)
  • औरंगजेब : कुळकथा (लेखक : प्रा. रा.आ. कदम)
  • औरंगजेब - शक्यता आणि शोकांतिका (लेखक : रवींद्र गोडबोले)
  • औरंगजेब बादशाहाचें चरित्र, १८९६ (चि.गं. गोगटे)
  • मराठे व औरंगजेब (लेखक : सेतुमाधव पगडी)
  • रणसंग्राम (मूळ इंग्रजी 'फ्रॉंटियर्स' लेखिका : मेधा देशमुख भास्करन; मराठी अनुवादक - नंदिनी उपाध्ये) (शिवाजी आणि औरंगजेब यांच्या जीवनातील समकालीन प्रसंगांवर आधारलेली कादंबरी)
  • शहेनशहा (लेखक : ना.सं. इनामदार). हिंदी रूपांतर - शाहंशाह
  • India of Aurangzeb : Topography, Statistics and Roads (१९०१) (लेखक : यदुनाथ सरकार)
  • India Under Aurangzeb (मूळ इंग्रजी, लेखक : यदुनाथ सरकार, मराठी अनुवाद : `औरंगजेब' - डाॅ. श.गो. कोलारकर). पाच खंड
  • औरंगजेबाचा इतिहास- भ.ग. कुंटे (जदुनाथ सरकार यांच्या History of Aurangzeb ह्या पाच खंडी ग्रंथाचा अनुवाद)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Tomb of Aurangzeb" (PDF). ASI Aurangabad. Archived from the original (PDF) on 23 September 2015. 21 March 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Chapra, Muhammad Umer (2014). Morality and Justice in Islamic Economics and Finance (इंग्रजी भाषेत). Edward Elgar Publishing. pp. 62–63. ISBN 9781783475728.
  3. ^ Bayly, C.A. (1990). Indian society and the making of the British Empire (1st pbk. ed.). Cambridge [England]: Cambridge University Press. p. 7. ISBN 9780521386500.
  4. ^ Turchin, Peter; Adams, Jonathan M.; Hall, Thomas D (December 2006). "East-West Orientation of Historical Empires". Journal of World-Systems Research. 12 (2): 223. ISSN 1076-156X. 12 September 2016 रोजी पाहिले.
  5. ^ József Böröcz (10 September 2009). The European Union and Global Social Change. Routledge. p. 21. ISBN 9781135255800. 26 June 2017 रोजी पाहिले.
  6. ^ Catherine Blanshard Asher, (1992) "Architecture of Mughal India – Part 1", Cambridge university Press, Volume 1, Page 252.
  7. ^ Hussein, S M (2002). Structure of Politics Under Aurangzeb 1658-1707. Kanishka Publishers Distributors. p. 158. ISBN 978-8173914898.
  8. ^ Kawser Ahmed; Helal Mohiuddin (2019). The Rohingya Crisis: Analyses, Responses, and Peacebuilding Avenues. Lexington Books. p. 8. ISBN 9781498585750.

साचा:मुघल साम्राज्य