आयुर्विमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयुर्विमा ही एखाद्या संस्था किंवा व्यक्तीने कोणा एका व्यक्तीच्या मृत्युपश्चात आर्थिक भरपाई देण्याचे वचन आहे.

विमा काढलेल्‍या व्यक्तीच्या मृत्यूमधुन उद्भवणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी हे संरक्षण म्हणून वापरले जाते. याने विमा काढलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास (क्वचितप्रसंगी नोकरदाराला ) व्यक्तीच्या मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य मिळते. आयुर्विमा अंतर्गत व्यक्ती विशिष्ट वर्षे जगेल असे वचन देण्यात येते व असे न झाल्यास म्‍हणजेच विमा केलेली व्यक्ती निर्दिष्‍ट वेळेच्या आत मरण पावल्यास मृत व्यक्तीच्या वारसास विशिष्‍ट रक्कम मिळते.

इतिहास[संपादन]

विमा व्यवसायाची सुरुवात लंडनमधल्या लाईट कॉफी हाऊसमधील व्यापाऱ्यांनी केली. या हाऊसमध्ये एकत्रित येणाऱ्या व्यापाऱ्यांनी जहाज वाहतुकीत असणारे धोके आणि मालाचे नुकसान यांवर भागीदारी करून कोणाचेही आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न केला.

भारतात विमा व्यवसायाची सुरुवात ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स को. लिमिटेड या कंपनीने केली. पण भारताची पहिली विमा कंपनी १८७० मध्ये मुंबईत ‘बॉम्बे म्युचुअल अश्युरंन्स सोसायटी लिमिटेड’ नावाने स्थापन झाली. त्यानंतर भारत इन्शुरन्स कंपनी १८९६ मध्ये दिल्लीत इम्पेरीअल इंपेरीअर ऑफ इंडिया १८९७ मध्ये मुंबईत, युनायटेड इंडिया चेन्नईत, नशनल इंडियन आणि हिंदुस्थान को – ऑपरेटिव्ह कलकत्ता आदि विमा कंपन्या आल्या.पुढे लाहोरमध्ये ‘को ऑपरेटिव्ह एश्युरन्स’ मुंबईत ‘बॉम्बे लाईफ’ ‘द इंडियन’ ‘न्यु इंडिया’ ‘द ज्युपिटर’ आणि दिल्लीत ‘द लक्ष्मी’ या कंपन्या आल्या.

१९५६ मध्ये विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण होऊन १ सप्टेंबर, १९५६ रोजी ‘लाईफ इन्शुरन्स कोऑपरेशन ऑफ इंडिया’ (एलआयसी) स्थापन झाले. परंतु ३१ ऑगस्ट २००७ पासून सोळा नवीन कंपन्यांना विमा व्यवसायाची परवानगी देण्यात आली. कार्याच्या दृष्टीकोनातून विमा संभाव्यतेच्या सिद्धांतावर आधारलेली अशी सहकारी व्यवस्था आहे की ज्यामध्ये सर्वांच्या सहयोगाने नुकसान भरपाई निमित्ताने एक धनसंचय निर्माण केला जातो आणि अनेक व्यक्तींच्या जोखमीचे वितरण सर्व समुदायामध्ये केले जाते.

प्रकार[संपादन]

मुदती विमा[संपादन]

मुदत विमा हा जीवन विम्याचा सर्वात सोपा आणि सरळ प्रकार आहे. मुदत विमा घेतल्यास आपल्या कुटुंबाला सर्वात स्वस्त दरात आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होते. मुदत विम्या घेतल्यास, तुम्ही तुलनेने कमी प्रीमियम दराने मोठ्या प्रमाणावर जीवन विमा (विमा रक्कम) मिळवू शकता.

टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात. पॉलिसीच्या कालावधीत विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नामांकित (nominee) व्यक्तीला लाभाची रक्कम दिली जाते. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे.

पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्स मधील मुख्य फरक आहे.

सर्व विमा योजनांत्‌ शुद्ध असलेलि मुदती विमा ( टर्म योजना ) ही जोखमीला विमाछत्र देते आणि जोखिम म्‍हणजे मृत्यू. येथे एकरकमी अदायगी ही केवळ निवडलेल्‍या कालावधीत मृत्‍यू झाल्‍यास देय असते. इन्‍शुअर व्यक्ती निवडलेल्‍या कालावधीच्या समाप्‍तीपर्यंत जिवंत राहिल्‍यास, काहीही देय बनत नाही. या प्रकाराच्या योजनांमध्ये फक्त संरक्षण हा घटक असतो आणि पॉलिसीबरोबर मुदतपूर्तीनंतर फायदा मिळत नाही. उदाहरणार्थ, विशिष्ट घटना घडल्यासच (मृत्यू) योजनाधारकाला या योजनेखाली पैसे दिले जातात. दुर्दैवाने, अशी वेळ आली तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाना मोठे आर्थिक संरक्षण मिळते. टर्म इशुरन्स योजना सामान्यपणे कमी खर्चाच्या असतात. ऑनलाइन खरेदी केल्यास टर्म इन्शुरन्स योजना आणखी कमी खर्चात मिळतात.

मुदती विमायोजना या निव्वळ विमा योजना आहेत, म्हणजे, त्यांची रचना व किंमत अशा तऱ्हेने ठरवण्यात येते की खूप महत्त्वाची घटना घडल्यावर संबंधित व्यक्तीला पैसे देता यावेत म्हणून जणू काही योजनाधारक, एक गट म्हणून, त्यांचे हप्ते एकत्र करतात. यामुळेच अशी घटना घडल्यावर जो फायदा मिळू शकतो त्याच्या तुलनेत हे संरक्षण पुरवण्यासाठी प्रत्येक योजनाधारकाला येणारा खर्च अगदी बेताचा असतो. यात बचतीचा घटक नसल्याने जीवन विमा कंपनीला फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही.

सामान्यपणे कमी उत्पन्न, मोठ्या आथिर्क जबाबदाऱ्या, आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणारा जोडीदार आणि मुले आणि विमा काढण्याजोगे चांगले आरोग्य या कारणांनी टर्म विमा निवडला जातो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास घरकर्ज व मुलांचे शिक्षण अशा जबाबदाऱ्यांपासून कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी टर्म योजना आदर्श ठरते. टर्म विमा खरेदी करण्याची आदर्श वेळ म्हणजे जेव्हा व्यक्तीवर कर्ज असते आणि ते ठरावीक कालावधीनंतर संपेल अशी अपेक्षा असते. त्याचप्रमाणे, वाहनकर्ज, अल्पावधी कर्ज इत्यादीपासून संरक्षण मिळवण्यासाठीही टर्म योजना घेता येते.

मुदती विमा ( टर्म योजना ) ही नावाप्रमाणेच, ठरावीक 'टर्म'साठी किंवा मुदतीसाठी असते. व्यक्तीची पसंती किंवा विमा संरक्षण मिळवण्याची गरज यावर अवलंबून ही मुदत ५ वर्षांपासून ते ३० वर्षांपर्यंत असू शकते.

एन्‍डॉमेंट विमा[संपादन]

मुदतीदरम्यान मृत्यू झाल्‍यास किंवा मुदतीच्या मुदतपूर्तीनंतर विमा केलेल्‍या व्‍यक्तीस एकरकमी रक्कम मिळते.

होल लाइफ विमा[संपादन]

इन्‍शुअर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, होल लाइफ इन्‍शुरन्‍स जोखमीमध्ये त्याला विमाछत्र मिळते, मग तो कधीही होवो. याचा ‍अर्थ जीवनभर चालणाऱ्या लाइफ इन्‍शुरन्‍स अंतर्गत कोणतीही निश्चित मुदत नसते. बहुतांश पॉलिसी, पॉलिसी धारकास लाभांश प्रदान करतात ज्याची सेवानिवृत्तीसाठी मदत होते.

जीवनभर चालणाऱ्या इन्‍शुरन्‍स उत्पादनांमध्‍ये दोन फरक आहेत

होल लाइफ प्युअर विमा

जेथे प्रीमियम इन्‍शुअर झालेल्‍या व्यक्तीच्या जीवनभरादरम्यान मृत्यूपर्यंत निरंतर देय असतात. ‍जोखिम कव्हरेज जीवनाच्या संपूर्ण कालावधीसाठी असते आणि लाइफ इन्‍शुअर रक्कम इन्‍शुअर झालेल्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही वेळी झाल्‍यास दिली जाते.

लिमिटेड पेमेंट होल लाइफ विमा

जिथे प्रीमियम मर्यादित आणि कमी कालावधीसाठी भरला जाते आणि इन्‍शुअरचा पर्याय मृत्यूपर्यंत किंवा तत्पूर्वीचा असतो. तथापि जोखिम कव्हरेज इन्‍शुअर झालेल्‍या व्‍यक्तीच्या जीवनभर असते.

मनी बॅक पॉलिसीं[संपादन]

पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, इन्‍शुअर व्यक्तीस नियमीत कालखंडानंतर विमाछत्राचा निश्चित भाग (टक्केवारी) प्राप्त होते. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान प्राप्त झालेले हे पैसे कर-मुक्त असतात. पॉलिसीची मुदत पूर्ण केल्यानंतर किंवा मुदतपूर्तीनंतर, इन्‍शुअर व्यक्तीस विमाराशी तसेच पॉलिसीच्या मुदतीसाठीचा बोनस प्राप्त होतो.

इन्‍शुअर केलेल्‍या व्‍यक्तीच्या मृत्यूनंतर, नॉमिनीस विमाराशी अधिक पॉलिसी सुरू असलेल्‍या वर्षांच्या संख्‍येसाठी बोनस प्राप्त होतो. (पॉलिसीच्या मुदतीदरम्यान इन्‍शुअर व्यक्तीला प्राप्त झालेले पैसे नॉमिनीला दिल्या गेलेल्‍या रकमेतून कपात केले जात नाहीत.)

मनी बॅक पॉलिसी नफा पॉलिसीसह एन्‍डॉमेंट असलेल्‍या पॉलिसीपेक्षा जास्‍त खर्चिक असतात. अनेक लोक प्राप्त होणारे पैसे सुट्टी घालविण्‍यासाठी वापण्‍याकरिता, घरांचे फर्निचर करण्‍याकर‍िता किंवा‍ ‍तीच रक्कम पुन्हा गुंतवण्‍यासाठीही वापरतात.

रायडर[संपादन]

विमा योजना खरेदी करताना त्याबरोबर मिळणारे रायडरचे पर्याय घेता येतात्. रायडर या वेगळ्या योजना नसून मूळ योजनेबरोबर खरेदी करता येतील, असे अधिक फायदा देणारे पर्याय असतात. रायडरमुळे मूळ योजनेमध्ये नाममात्र किंमतीत अधिक मूल्याची भर पडते. बाजारात उपलब्ध असलेल्या अधिक लोकप्रिय रायडरमध्ये अपघाती मृत्यू आणि अपंगत्व संरक्षण, गंभीर आजार संरक्षण, विमा रक्कम वाढवण्याची लवचिकता इ.चा समावेश होतो. या योजनेसाठी कर फायदेही मिळतात.

भारतातिल आयुर्विमा कंपन्या[संपादन]

भारतातिल विमा क्षेत्र इ.स. २००० मध्ये खासगी विमा कंपन्यांसाठी खुलं करण्यात आलं. आज भारतात २४ आयुर्विमा कंपन्या आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "irda". Archived from the original on 2021-10-17. 2012-03-01 रोजी पाहिले.