विकिपीडिया:मासिक सदर/२०१९०८०५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोहिमाची लढाई दुसर्‍या महायुद्धादरम्यान जपानी सैन्य, आझाद हिंद फौज व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये लढली गेली होती. एप्रिल ४ ते जून २२, इ.स. १९४४ दरम्यान आधुनिक भारताच्या नागालँड राज्यातील कोहिमा शहराच्या सीमेवर लढली गेलेली ही लढाई जपानच्या उ गो मोहिमेचा सर्वोच्चबिंदू होता. या लढाईची तुलना अनेकदा स्टालिनग्राडच्या वेढ्याशी करण्यात येते.

तीन टप्प्यांत लढल्या गेलेल्या या लढाईच्या सुरुवातीस एप्रिलच्या पूर्वार्धात जपानने कोहिमा रिज ही जागा जिंकून इंफाळकडे जाणारा रस्ता ताब्यात घेतला. १६-एप्रिल १८च्या दरम्यान ब्रिटिश व भारतीय सैन्यांची कुमक आडवाटेने कोहिमाला पोचली व त्यांनी जपान्यांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. या प्रतिहल्ल्यानंतर जपानी सैन्याने कोहिमा रिज सोडली पण कोहिमा-इंफाळ रस्ता त्यांच्याच ताब्यात राहिला. मेच्या मध्यापासून जून २२ पर्यंत ब्रिटिश आणि भारतीय सैन्याने हळूहळू माघार घेणार्‍या जपानी सैन्याला मागे रेटत रस्ता काबीज केला. तिकडून इंफाळकडूनही चालून आलेल्या दोस्त सैन्याशी त्यांनी मैल दगड १०९ येथे संधान बांधले व इंफाळला पडलेला वेढा मोडून काढला.

इ.स. १९४४च्या सुरुवातीस युनायटेड किंग्डमने भारतातून म्यानमार (तेव्हाचा ब्रह्मदेश) आणि तेथून आग्नेय आशियामध्ये ठाण मांडून बसलेल्या जपान्यांना हुसकावण्यासाठीची तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी ईशान्य भारतातील मिझोरम प्रदेशातील इंफाळ शहरात आपले इंडियन फोर्थ कोअर हे सैन्यदल जमवले होते. याला काटशह देण्यासाठी जपानने उ-गो मोहीम या नावाखाली प्रतिआक्रमण करण्याचे ठरवले. जपानच्या पंधराव्या सैन्यदलाच्या मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुची याने या मोहिमेला अधिक मोठे करण्याचे ठरवले. मुतागुचीच्या आराखड्याप्रमाणे जपानी सैन्य फक्त चौथ्या कोअरला अडवण्यासाठी नाही तर ब्रिटिश भारतावर आक्रमण करण्यासाठीच चालून जाणार होते. यात ईशान्य भारतातून घुसून थेट भारताच्या मध्यापर्यंत धडक मारण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही होते. दीड-दोनशे वर्षे भारतात ठाण मांडलेल्या ब्रिटिशांना असे सहजासहजी हुसकावणे शक्य नाही हा विरोधी युक्तिवाद त्याने नाकारला. प्रकरण युद्धमंत्री हिदेकी तोजोपर्यंत गेल्यावर तोजोनेही हा युक्तिवाद फेटाळून लावला व मुतागुचीला भारतावर आक्रमण करण्यास मुभा दिली.

मुतागुचीच्या व्यूहरचनेनुसार जपानच्या ३१वी डिव्हिजनने कोहिमावर हल्ला करून इंफाळला ब्रिटिश भारतापासून तोडायचे आणि मग खुद्द इंफाळवर हल्ला करीत चौथ्या कोअरला नेस्तनाबूद करीत भारतात घुसायचे ही योजना होती. ५८वी, १२४वी, १३८वी रेजिमेंट आणि ३१वा डोंगरी तोफखाना इतकी शिबंदी घेऊन ३१व्या डिव्हिजनने कोहिमा घेतल्यावर पुढे दिमापूरवर चाल करून जाणे अपेक्षित होते. दिमापूर हातात आल्यास तेथील लोहमार्ग आणि ब्रह्मपुत्रा खोर्‍यावर ताबा मिळवणे व ब्रिटिशांची रसद तोडणे हा डाव त्यात होता.

३१व्या डिव्हिजनचा मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल कोतोकू सातो या व्यूहरचनेवर नाखूष होता. या हल्ल्याच्या योजनेत त्याला सुरुवातीपासून सामील केले गेलेले नव्हते आणि त्याच्या मते जपानी सैन्याला कोहिमा पटकन जिंकणे सोपे नव्हते. आपल्या मुख्य सैन्यापासून इतक्या लांबवर चाल करून जाण्यात रसदपुरवठा कायम ठेवणे हे जिकिरीचे काम होते. सातोने आपल्या सहकार्‍यांजवळ जपानी सैन्याची उपासमार होणार असे भाकीत वर्तवले होते. इतर सेनाधिकार्‍यांप्रमाणे सातोच्या मते मुतागुचीही रेम्या डोक्याचा होता. १९३०च्या दशकात जपानी सैन्यात पडलेल्या फुटीदरम्यान सातो आणि मुतागुची परस्परविरुद्ध उभे राहिलेले होते आणि त्यामुळ सातोला मुतागुचीवर किंवा त्याच्या डावपेचांवर विश्वास नव्हता.

मार्च १५, इ.स. १९४४ रोजी जपानच्या ३१व्या डिव्हीजनने होमालिन गावाजवळ चिंदविन नदी ओलांडली व भारतावरील आक्रमणाला सुरुवात केली. अंदाजे शंभर किमी (६०मैल) रुंदीची आघाडी सांभाळत हे सैन्य म्यानमारच्या घनदाट जंगलातून वाटचाल करू लागले. डोंगराळ प्रदेश, नद्या-नाले व गर्द झाडी असलेल्या अवघड वाटेवरही जपानी सैन्य जोमाने कूच करीत होते. डाव्या आघाडीवरील ५८वी रेजिमेंट इतरांच्या पुढे होती. त्यांची गाठ ब्रिटिश भारतीय सैन्याची सर्वप्रथम इंफाळच्या उत्तरेस मार्च २०च्या सुमारास पडली.

पुढे वाचा... कोहिमाची लढाई