अनंत भालेराव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंत काशिनाथ भालेराव (जन्म : १४ नोव्हेंबर १९१९- - २६ ऑक्टोबर १९९१) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक, संपादक. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अनंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सत्याग्रहातही सहभाग घेतला. याबद्दल सक्तमजुरीच्या आणि तुरुंगावासाच्या शिक्षाही भोगल्या. स्वातंत्र्योत्तर काळात औरंगाबादहून प्रसिद्ध होत असलेल्या दैनिक मराठवाडातून त्यांनी सातत्याने समाजहिताची, विकासाची भूमिका घेत लेखन केले. विकासासाठी जनतेने केलेल्या आंदोलनांत आणि पत्रकार आणि साहित्यिकांची एक पिढी घडवण्यात भालेराव यांनी भूमिका बजावली.

जन्म आणि शिक्षण[संपादन]

अनंतराव भालेराव यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे झाला. त्यांचे वडील काशीनाथराव वारकरी होते. त्यामुळे बालपणापासूनच अनंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर वारकरी संप्रदायाचा आणि ज्ञानेश्वर- तुकारामांच्या साहित्याचा संस्कार झाला. अनंत भालेराव यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण वैजापूर आणि गंगापूर येथे आणि हायस्कूलचे शिक्षण औरंगाबाद येथे तत्कालीन निझाम सरकारच्या शाळेत उर्दू माध्यमातून झाले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग[संपादन]

अनंतराव मॅट्रिकनंतर इंटरच्या पहिल्या वर्गात असताना १९३८मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीसाठी सत्याग्रह सुरू केला. अनंतरावांनी पहिले सत्याग्रही म्हणून आपले नाव नोंदवले. नोव्हेंबर १९३८ मध्ये त्यांनी वैजापूर येथे आयुष्यात पहिल्यांदा सत्याग्रहात भाग घेतला. त्याबद्दल त्यांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यानंतर त्यांना उर्दू शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे नागपूरला जाऊन ते इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. सेलू येथील नूतन विद्यालयात त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरू केले. १९४१ मध्ये सुशीलाबाईंशी ते विवाहबद्ध झाले. १९४२ मध्ये चले जाव आंदोलन सुरू झाल्यानंतर १९४४मध्ये शिक्षकी पेशा सोडून हैद्राबाद स्टेट काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अनंतरावांनी पूर्णवेळ कामास प्रारंभ केला. १९४७ पर्यंत त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

१९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद संस्थानातही स्वातंत्र्यचळवळीला वेग आला. निझामाच्या राजवटीची पाठराखण करीत असलेल्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला तेंव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. अनंतराव या लढ्यात मराठवाड्यातील एक अग्रणी होते. १९४७ मध्ये पाटनूरचा जंगल सत्याग्रह आणि त्यानंतरच्या घटनांमध्ये अनंतराव सक्रीय होते. लढ्यासंदर्भातील एका प्रकरणात मुंबई प्रांतात त्यांना १९४८ मध्ये ठाणे तुरुंगात दीड महिना स्थानबद्ध करण्यात आले. सप्टेंबर १९४८ च्या पोलिस कारवाईनंतर हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.

त्यानंतरही १९५३ ते १९५६ याकाळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि पुढे १९७७ मध्ये आणबीणीच्या काळात अनंतरावांनी पत्रकार म्हणून आणि सक्रिय कार्यकर्ता या नात्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

पत्रकारिता[संपादन]

आ.कृ. वाघमारे यांनी १९३८मध्ये मराठवाडा हे साप्ताहिक सुरू केले. हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्यचळवळीला पोषक भूमिका घेतल्याने या पाक्षिकाला संस्थानात छपाई आणि वितरणात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे त्यासंबंधीची कामे ब्रिटिश अंमलाखालील मुंबईतून व अन्य शहरांतून चालवावी लागली. १९४८ मध्ये मुबईत अनंतरावांनी या साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणून काम पाहिले. हैद्राबाद संस्थान विलीन झाल्यानंतर साप्ताहिकाचे कार्यालय हैद्राबादला स्थलांतरित झाले. हैदराबादेत सहा वर्षे अनंतराव पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. प्रांतांच्या भाषावार फेररचनेत मराठवाड्याचा भूभाग महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर साप्ताहिकाचे कार्यालय १९५६ मध्ये औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्यात आले. वाघमारे यांनी एक एप्रिल १९५३ ला मराठवाडाचे संपादकपद अनंतराव भालेराव यांच्याकडे सोपवले. १ ऑक्टोबर १९६८ पासून मराठवाडा औरंगाबादहून दैनिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. पूर्णा, जायकवाडी ही धरणे व्हावीत यासाठी जनमत तयार करण्यात या वर्तमानपत्राने भूमिका बजावली. या दैनिकाने पुरोगामी आणि विकासात्मक पत्रकारिता करतानाच लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने मंच उपलब्ध करून दिला. १९७४ मध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी झालेल्या आंदोलनाला मराठवाडाच्या माध्यमातून अनंतरावांनी सक्रिय पाठिंबा दिला. भारतात १९७५ पासून घोषित झालेल्या आणीबाणीच्या काळात सत्याग्रह केल्याबद्दल त्यांना अटकही करण्यात आली.

साहित्य आणि सन्मान[संपादन]

अनंतरावांनी साहित्य चळवळीतही सहभाग घेतला. साहित्य परिषदेत त्यांनी पदे भूषविली. मराठवाडा दैनिकाच्या माध्यमातून नव्या जाणिवांचे प्रवाह साहित्यात आणणाऱ्या साहित्यिकांच्या एका पिढीला त्यांनी प्रोत्साहन दिले. औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेची स्वतःची इमारत तयार होण्यासही त्यांनी प्रयत्न केले.

अनंतरावांची बरीच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अनंतरावांना फाय फाउंडेशनचा पुरस्कार, अत्रे प्रतिष्ठानचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले होते.

अनंतरावांच्या नावाने लेखक, कलावंत, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात येतो.

अनंत भालेराव यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • आलो याचि कारणासी (लेखसंग्रह)
  • कावड (लेखसंग्रह)
  • पळस गेला कोकणा (प्रवासवर्णन)
  • पेटलेले दिवस (स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी)
  • मांदियाळी (व्यक्तिचित्रण)
  • समग्र अनंत भालेराव (दोन खंड); संपादक - पत्रकार निशिकांत भालेराव
  • हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा

अनंत भालेराव यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]

'अनंत भालेराव स्मृति पुरस्कार' मिळालेल्या व्यक्ती[संपादन]