विनायक जनार्दन करंदीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक (धुळे, सप्टेंबर १५, १८७२ - मार्च ३०, १९०९) हे मराठी भाषेतील कवी होते. यांनी एक मित्र या टोपणनावाने देखील लेखन केले. आधुनिक कविपंचकातील ते एक होते. (अन्य चार कवी ...)

त्यांच्या पत्‍नीचे नाव सरस्वतीबाई.

अलिबागजवळील नागाव हे त्यांचे मूळ गाव होते. विनायकांचे थोरले बंधू बळवंतराव ऊर्फ बाळाभाऊ हेही कविता करीत असत. 'रमाकांत नागावकर' या टोपणनावाने त्यांच्या कविता त्या काळी प्रकाशित होत असत. शालेय वयातच विनायकांना काव्यरचनेचा छंद जडला. Green's Fairy Tales या पुस्तकातील शंभराच्या आसपास गोष्टींचे काव्यबद्ध भाषांतर त्यांनी शाळेत असतानाच केले होते! याबरोबरच Gray या कवीच्या Elegy या काव्याचेही मराठीत भाषांतर त्यांनी केले होते. मात्र, आजघडीला यातील काहीही उपलब्ध नाही! विनायकांचा काव्यरचनेचा झपाटा विलक्षण असे. जलद गतीने ते काव्य रचत असल्याने शीघ्रकवी म्हणूनच ते ओळखले जात.

विनायकांचा जन्म व स्कूल फायनलपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावी म्हणजे धुळ्यालाच झाले. एक असा व्यवसाय त्यांनी केला नाही. आधी पोलीस खात्यात, पुढे मिशनमध्ये मास्तर म्हणून आणि शेवटी जहागीरदारांकडील कारभारी या नात्याने त्यांनी व्यवसायांतर केले. पोलीस खात्यात असताना काही किटाळ आले, त्या वेळी त्यांना फरारी व्हावे लागले. बहुधा तेथेच त्यांना साऱ्या संसाराची धुळधाण करणारी व्यसने जडली. त्यामुळे त्यांचे सारे आयुष्य खानदेशातच अस्थिरतेत व व्यसनविवशतेत व्यतीत झाले. फरारी असतानाचा काळ त्यांनी धार व देवास येथे काढला असे म्हणतात.

विनायकांनी विपुल कविता लिहिलेली आहे. राष्ट्रभक्तिपर कविता, प्रणयरम्य कविता, वीररसयुक्त कविता, हिरकणी, अहल्या, पन्ना, पद्मिनी, राणी दुर्गावती, संयोगिता, तारा यांच्यासारख्या वीरांगनांची मुक्तकंठाने प्रशंसा करणारी कविता वगैरे.

विनायकांच्या कविता काव्यरत्‍नावली, मनोरंजन,करमणूक या नियतकालिंकांमधून प्रकाशित होत. त्यांच्या कवितांचे पुस्तक मात्र त्यांच्या मृत्यूनंतर छापले गेले. दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ अनंततनय हे विनायकांच्या कवितासंग्रहाचे पहिले संपादक. त्यांनी अनेक नियतकालिकांमधून विखुररलेल्या एकूण ७३ कवितांचा संग्रह प्रकाशित केला. या पुस्तकाला वा.ब. पटवर्धन यांची प्रस्तावना होती. इ.स. १९४७ साली या पुस्तकाची ३री आवृत्ती निघाली. ४थ्या आवृत्तीत (१९५४, पुनर्मुद्रण १९६०) एकूण ८५ कविता असून त्या पुस्तकाला प्रा. भवानी शंकर पंडित यांची विवेचक प्रस्तावना आहे. त्यांनी विनायकांचा मराठीतील राष्ट्र्रीय कवितेचे पहिले व श्रेष्ठ उद्‌गाते असा गौरव केला आहे.

कवी विनायकांनी प्रभावती नावाचे एक नाटक लिहिले होते. प्रासादिक नाट्यकलाप्रवर्तक संगीत मंडळीने ते रंगभूमीवर आणण्याची तयारी केली होती, परंतु ज्वलंत राष्ट्रवादचा पुरस्कार करणारे असल्याने त्या नाटकाचा प्रयोग होऊ शकला नाही.