अलीम वकील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. अलीम वकील उर्फ अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील (७ फेब्रुवारी, इ.स. १९४५: पाचोरा, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र ) हे मराठीतून इस्लामी तत्त्वज्ञान आणि सूफी तत्त्वज्ञान आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत. डॉ. वकील हे सूफी पंथाचे विशेष अभ्यासक म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. संगमनेर महाविद्यालय, संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. अलीम वकील हे प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. रावसाहेब कसबे, साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांचे समकालीन आहेत. २००५ साली संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. अलीम वकील यांच्या नावावर वैचारिक लेखनाची आणि सूफी संप्रदायावरील १६ पुस्तके आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि लोकप्रशासनाचे या विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. ते बाराव्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली आहे.[१]

शैक्षणिक कारकीर्द[संपादन]

  • एस. एस. सी. : १९६० पाचोरा
  • बी. ए. : १९६५, प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जळगाव
  • एम. ए. : १९६७, प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जळगाव
  • पीएचडी : १९७६, पुणे विद्यापीठ, पुणे.

लेखन[संपादन]

  1. रिलेशन बिटवीन लेजिस्लेचर ॲन्ड ॲडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्र फ्रॉम १९७८
  2. हिंदू-मुस्लिम टेन्शन कलकत्ता मिनर्वा (१९८१)
  3. हिंदू मुस्लिम दंगली (१९८२)
  4. आधुनिक राजकीय विश्लेषण (१९८३)
  5. स्वातंत्र्यलढा आणि भारतीय मुस्लिम (अनुवाद) (१९८२)
  6. रिजर्वेशन पाॅलिसी ॲन्ड शेड्यूल्ड कास्ट इन इंडिया (१९८५)
  7. महात्मा आणि बोधिसत्त्व (१९९०)
  8. महात्मा गांधी-आंबेडकर डिस्प्यूट- ॲन ॲनॅलिटिकल स्टडी (१९९१)
  9. मुहंमद यांचे विवाह आणि देवी कार्य (अनुवाद)
  • मौलाना आझाद
  1. सुफी संप्रदायाचे अंतरंग (२०००)[२]
  2. मौलाना आजाद (२००५)
  3. एकाच पथावरील दोन पंथ: सुफी आणि भक्ती (२०१२)
  4. भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदा २०१२
  5. राजकीय समाजशास्त्र २०१५
  6. सुफींची आदमगिरी (आगामी)

पुरस्कार[संपादन]

  • १९६५ साली पुणे विद्यापीठात अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल पारितोषिक
  • २०० साली सातारच्या आंबेडकर अकादमीचा राम जोशी पुरस्कार सुफी संप्रदायाचे अंतरग या पुस्तकाला)
  • सुफी संप्रदायाचे अंतरंग या पुस्तकाला पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन पुरस्कार
  • २००२ साली महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे गोयंका पुरस्कार (सुफी संप्रदायाचे अंतरंग या पुस्तकाला)
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा परांजपे पुरस्कार (मौलाना आझाद या पुस्तकाला)
  • २००६ साली मराठवाडा साहित्य परिषदेचे चिटणीस पुरस्कार (मौलाना आझाद या पुस्तकाला)
  • २०१४ साली पुरोगामी साहित्यातील योगदानाबद्दल सुगावा पुरस्कार
  • २०१९ सालच्या

सन्मान[संपादन]

  • अध्यक्ष- १४व्या महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे पद (१९९३)
  • सदस्य- महाराष्ट्र साहित्य अकादमी
  • सदस्य- बालभारती
  • तज्ज्ञ समिती सदस्य- नागरिक शास्त्र आणि लोकप्रशासन
  • तज्ज्ञ समिती सदस्य- राज्यशास्त्र
  • राज्यशास्त्रावरील अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये सहभाग
  • अनेक संपादित ग्रंथांमध्ये लेखन
  • एकूण १० विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाखाली पीएचडी प्रदान
  • अध्यक्ष- १२वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पुणे (२०१९)[३]

योगदान[संपादन]

डॉ. अलीम वकील यांच्या लेखनातून मराठीत सूफी संप्रदायाचा सुस्पष्ट परिचय झाला आहे. त्यांच्या मांडणीतून ते भक्ती-चळवळ आणि सूफी चळवळ या दोन्ही चळवळींचे स्वरूप स्पष्ट करतात. भारतात आठव्या शतकातील शंकराचार्याच्या प्रबोधनानंतर भक्ती-चळवळीला समांतर रीतीने याच शतकात इस्लाम धर्मावर आधारित सूफींचे नवे विचार मांडले गेले. या दोन्ही चळवळींचे विशिष्ट संप्रदायात झालेले रूपांतर, सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत समांतर रेषेत दोन्ही चळवळीनी केलेले विचारमंथन डॉ. वकील मांडतात. त्यांच्या मते, दोन्हींचे ईश्वरावरील आत्यंतिक प्रेम व श्रद्धा आणि ईश्वरी अवस्थेत विलीन होणे हे उद्दिष्ट होते. उभय संप्रदायांचा उगम, विकास व संघटन यांची अतिशय व्यासंगपूर्ण व तुलनात्मक मांडणी केली आहे.

भक्ती व सूफी संप्रदायांचा तौलनिक अभ्यास असल्यामुळे डॉ. अलीम यांनी दोन्ही संप्रदायांची पूर्वपीठिका, उद्दिष्टे व त्यातील श्रेष्ठ संतांचा व सूफींच्या कार्याचा परामर्श घेतला आहे. हे दोन्ही संप्रदाय वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात अस्तित्वात आले असले तरी त्यांच्या विचारांचे आकलन सारखेच होते. फक्त त्यांचे मार्ग वेगळे होते, असे ते दाखवून देतात.

डॉ. अलीम यांनी भक्ती चळवळ आणि सूफी संप्रदायातील गूढवादी व गहन तत्त्वज्ञानाचे विश्लेषण प्रभावी शब्दात केले आहे. हिंदू संस्कृतीतील कर्ममार्ग, ज्ञानमार्गभक्तीमार्ग यांचा ऊहापोह केला आहे. सातव्या आणि आठव्या शतकात बौद्ध धर्मजैन धर्म यांना उतरती कळा लागली आणि हिंदू धर्मात ज्ञानमार्ग व कर्ममार्ग हे मुक्तीसाठी पुरेसे नसल्यामुळे त्या काळातील विचारवंतांना ही पोकळी भरून काढण्यासाठी नवी दिशा हवी होती, ती सूफी चळवळ आणि भक्ती चळवळ या दोन मार्गांच्या माध्यमातून मिळाली, अशी मांडणी ते त्यांच्या ‘एका पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी’ या ग्रंथात करतात. हा ग्रंथ मराठी आध्यात्मिक साहित्यात मोलाची भर घालणारा आहे.[४]

या ग्रंथात डॉ. अलीम यांनी सूफी संप्रदायाचे विवेचन करताना विविध सूफी पंथ व आदर्शभूत तसेच श्रेष्ठ सूफी संतांची माहिती दिली आहे. ‘विविध सूफी संप्रदाय’ व ‘काही सूफी संत’ या दोन प्रकरणांतून सूफी संप्रदायाचा उगम, त्याची उद्दिष्टे, संघटना व श्रेष्ठ संतांचे योगदान यांची अतिशय तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. अशी माहिती यापूर्वी देणाऱ्या स्पेनचे प्रकांडपंडित शेख मुहियुद्दीन इब्नुल अरबी (सन १२४१) व शेख अब्दुल करीम इब्न, इब्राहिम-ई-जिली यांच्या कार्याची सविस्तर चर्चा डॉ. वकील यांनी केली आहे. संतशिरोमणी जुन्नून अल् मिसरी, बायनीद बुस्तामी, अबुसईद इब्न अबि’ल खैर, हसन मन्सूर अल् हज्जाज, इमाम गज़ाली, रूमी, उमर खय्याम, शेख सादी, हाफीज, जामी हे पुरुष संत तसेच राबिया बसरी, बीबी हाफ़िजा व बीबी फातिमा खुद्रिया यांच्यासारख्या महिला सूफी संत, यांचीही माहिती ते देतात.

उत्तर भारतातील अली-उल् हुजवेरी, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती, ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी, फरीदुद्दीन गंजशकर, निजामुद्दीन अवलिया, बाबा फरीद, अमीर खुसरो या अग्रगण्य संतांनी आणि दक्षिण भारतातील बुऱ्हामुद्दीन गरीबशाह, मुन्ताजिबुद्दीन जरदरीबक्ष, जैनुद्दीन, ख्वाजा बन्दानवाज गेसूदराज, ख्वाजा अमीनुद्दीन आला या संतांनी केलेल्या कार्याची माहिती डॉ. वकील देतात.

सूफी तत्त्वप्रणालीची दोन वैशिष्टय़े[संपादन]

‘वहदतुल वजूद’ व ‘वहदतुल शुहूद’ या सूफींच्या तत्त्वप्रणालीची दोन महत्त्वपूर्ण वैशिष्टय़े डॉ. अलीम यांनी स्पष्ट केली आहेत. ही दोन्ही वैशिष्टय़े एका ईश्वरावर निष्ठा (तौहिद) आणि त्या अस्तित्वाची जाणीव यावर आधारित आहेत. वहदतुल वजूद म्हणजे ईश्वर एक असून त्याचे चराचर व्यापले आहे . त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येक सूफीला असली पाहिजे. डॉ. वकील दाखवून देतात की हे दोन्ही सिद्धान्त इब्नुल अरबी यांनी सर्वप्रथम मांडले. ईश्वराशी तादात्म्य पावण्यासाठी सूफी साधकाला अनेक आध्यात्मिक टप्पे (मकामात) पार पाडावे लागतात. हे टप्पे सूफी संतांच्या मते वेगळे असू शकतात. या टप्प्यांत ‘कुरआन’मधील ‘सुलूक’ (सद्वर्तन) व ‘हदीस’मधील एहसान (परोपकार) यावर भर देण्यात आला आहे. या वैशिष्टय़ांची तुलना डॉ. अलीम यांनी ‘तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीशी केली आहे.[५]

सूफी संप्रदायातील गुरू महात्म्य[संपादन]

भक्तीमार्गाप्रमाणे सूफी तरीक्यात गुरूला फार मोठे स्थान देण्यात आले आहे. सूफी तत्त्ववेत्ते बेकतशीस यांच्या मते माणसाचा जन्म दोनदा होतो- एकदा मातेकडून व दुसऱ्यांदा आपल्या गुरूकडून. अनुक्रमे पहिल्या प्रसवास ‘अंधाराचा प्रकाश’ म्हणतात, तर आध्यात्मिक गुरूचा शिष्य झाल्यावर ‘मार्गदर्शनाचा प्रकाश’ हे नाव दिले जाते. गुरू मिळाल्याशिवाय शिष्याला ईश्वरप्राप्ती होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर गुरूशिवाय माणूस पशू असतो. भारतात ख्वाजा मईनुद्दीन चिश्ती, ख्वाजा कुतबुद्दीन बख्तियार काकी, फरीदुद्दीन गंजशकर, निजामुद्दीन अवलिया, बाबा फरीद, बुऱ्हानुद्दीन गरीबशाह, मुन्तजिबुद्दीन जरजरीबक्ष व शेख जैनुद्दीन हे सर्वश्रेष्ठ सूफी आचार्य होऊन गेले.

अतिरिक्त[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लिम समाज कमी पडले : डॉ. आ. ह. साळुंखे". divyamarathi. 2019-01-06 रोजी पाहिले.
  2. ^ "BookGanga - Creation | Publication | Distribution". www.bookganga.com. 2019-01-06 रोजी पाहिले.
  3. ^ "मुस्लिम मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. अलीम वकील". Maharashtra Times. 2019-01-06 रोजी पाहिले.
  4. ^ दोन संप्रदायांच्या माहितीचा कोश : डॉ. दाऊद दळवी, http://www.loksatta.com/lokrang-news/rasagrahan-gazetteer-of-two-traditions-17886/
  5. ^ दोन संप्रदायांच्या माहितीचा कोश : डॉ. दाऊद दळवी, http://www.loksatta.com/lokrang-news/rasagrahan-gazetteer-of-two-traditions-17886/