Jump to content

ज्योतिबा मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिर वाडी रत्नागिरी कोल्हापूर
स्थानिक नाव
पर्यायी चित्र
दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिर वाडी रत्नागिरी कोल्हापूर
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिर वाडी रत्नागिरी कोल्हापूर
महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
नाव
भूगोल
गुणक 16°42′00″N 74°14′00″E / 16.70000°N 74.23333°E / 16.70000; 74.23333गुणक तळटिपा
देश भारत
राज्य/प्रांत महाराष्ट्र
जिल्हा कोल्हापूर
संस्कृती
इतिहास व प्रशासन

ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे.[] ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. ज्योतिबा हे ब्रम्हा विष्णू महेश, जमदग्नी ऋषी आणि १२ सुर्य यांचा तेजःपुंज अवतार आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्‍नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे.

इतिहास आणि माहात्म्य

[संपादन]

ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. "देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा, चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा".

ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा!

पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता.त्यांनी तपश्चर्या करून ब्रदिनाथांना संतुष्ट केले.ब्रदिनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याप्रमाणे चैत्र शुद्ध पष्ठीच्या मुहूर्तावर स्वता आठ वर्षांची बालमुर्ती होऊन ब्रदिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमुर्ती ब्रदिनाथांची प्राणज्योती । म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले.आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती,त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली,तेच जोतिबाचे रूप होय.श्री जोतिबाला गुलाल,दवणा,खोबरे व खारका प्रिय। त्याच्या दवण्याला गंध हा सत्त्व,रज,तम गुणयुक्त आहे. आजच्या ज्योतिबा मोठ्या मंदिराच्या जागी एक लहान मंदिर होते. ज्योतिबा मंदिर समुद्रसपाटीपासून ३१२४ फूट उंचीवर आहे आणि ते ज्योतिबाला समर्पित आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या वायव्येस १८ किमी अंतरावर आहे.[1] परंपरेनुसार, मूळ केदारेश्वर मंदिर कराडजवळील किवल गावातील नवजी सयाजी, ज्यांना केदार बाबा म्हणूनही ओळखले जाते, यांनी बांधले होते. १७३० मध्ये राणोजी शिंदे यांनी त्या जागी सध्याचे ज्योतिबा मंदिर बांधले. हे मंदिर केदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारागिरांनी बांधले होते जे त्यांच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध होते (हेमाडपंती). शास्त्रांनुसार बारीक काळ्या बेसाल्ट दगडांचा वापर करण्यात आला होता. केदार कारागीर (आचार्य) हे आचार्यांचे वंशज असल्याचे मानले जात होते ज्यांनी ८ व्या शतकात आदि शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली, नंतर त्यांना केदारांचे म्हणून ओळखले जाऊ लागले. केदार कारागिरांनी मार्तंड भैर (जेजुरी खंडोबा मंदिर), तुळजापूरचे तुळजा भवानी मंदिर आणि हरिश्चंद्रगडाचे केदारेश्वर मंदिर देखील बांधले. ज्योतिबा येथील मंदिर ५७ फूट x ३७ फूट x ७७ फूट उंच आहे ज्यामध्ये शिखराचा समावेश आहे. केदारेश्वराचे दुसरे मंदिर ४९ फूट x २२ फूट x ८९ फूट उंच आहे. हे मंदिर १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले होते. रामलिंगचे तिसरे मंदिर त्याच्या घुमटासह १३ फूट x १३ फूट x ४० फूट उंच आहे. हे मंदिर १७८० च्या सुमारास मालजी निलम पन्हाळकर यांनी बांधले होते. [2] मंदिराचा आतील भाग प्राचीन आहे. परिसरात इतर मंदिरे आणि प्रकाश बुरुज आहेत.

कथा/आख्यायिका

[संपादन]

ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता महालक्ष्मी अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्‍नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून महालक्ष्मी अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.

ज्योतिबाच्या मंदिराची रचना

[संपादन]

देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त किवळ गावच्या नावजी साळुंखे पाटलांनी (संत नावजीनाथ) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.


ज्योतिबाची मूर्ती

[संपादन]

ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चंपक बनातील यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्‍नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.

यमाईदेवी

[संपादन]
जोतिबा वाडी रत्‍नागिरी वरील, चाफेबनातील श्री यमाई देवी

मूळमाया यमाई देवीच्या पदस्पर्शाने जोतिबा परिसर पावन झाला असून पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंदासुर राक्षसाची समोरासमोर भेट झाली. तब्बल सात दिवस सात रात्री त्यांचे निकराचे युद्ध झाले; परंतु पूर्ण शक्ती पणास लावून सुद्धा औंदासुर तसूभर देखील मागे हटत नव्हता. दिव्यस्मरण करताच औंदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे नाथांस उमगल्यावर त्यांनी तिला "ये माई'' ये - (यावे)  माई - (आई), अशी आर्त साद घातली. तेव्हापासून तिचे नाव "यमाई" असे रूढ झाले. जोतिबांनी घातलेली साद ऐकताच शिवशक्तीस्वरुपिनी पार्वती अर्थात आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाईदेवीचा अवतार धारण केला. श्री यमाई देवीने औंदासुराचा वध करून केदारनाथांचा दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाईदेवी औंधासुराचा निःपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाली म्हणून या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने महाभयंकर दानवाचा वध केला. या विजयाने आनंदित होऊन सर्व देवगण आणि भक्तगणांनी देवीचा विजयोत्सव साजरा केला. आजही औंध गावी यमाई देवीच्या विजयाप्रीत्यर्थ पौष पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. देवींच्या या अलौकिक पराक्रमावर प्रसन्न होऊन केदारनाथांनी औंध क्षेत्री यमाई देवींचा पट्टाभिषेक करून देवींना औंधच्या गादीवर बसवले.

केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी अंबाबाई महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्‍नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला; परंतु या भव्य दिव्य सोहळ्याच्या गडबडीत महालक्ष्मी अंबाबाई यमाई देवींना राज्याभिषेकास आमंत्रण देण्यास विसरल्या. याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली. त्वरित केदारनाथांनी औंध गावी प्रस्थान करून यमाई देवींचा रुसवा काढला. देवींच्या भेटीसाठी केदारनाथ दरवर्षी वाडी रत्‍नागिरी ते औंध असा भक्तगणांसोबत पायी प्रवास करायचे. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवींस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाल्या, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्‍नागिरी येथे चाफे वनात प्रकट होईन. त्याप्रमाणे यमाईदेवी चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपक वनात प्रकट झाल्या. यमाई चाफेबनात प्रकट झाल्याची वार्ता ऐकताच आनंदित झालेल्या केदारनाथांनी देवींच्या आगमनानाप्रीत्यर्थ गुरुमाता रेणुका अर्थात आई यमाई आणि ऋषी जमदग्नी यांचा भव्य असा विवाह सोहळा आयोजित केला; जो आज चैत्र यात्रेचा सोहळा म्हणून जगभरात सुप्रसिद्ध आहे. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजम्यासह यमाईदेवीस भेटण्यास गेले. कृत युगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्र्हम सनातन ज्योतिस्वरुपाकडे रेणुका व आपले मीलन घडवण्याची इच्छा वरतून मागितली होती. ते नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. याप्रकारे जमदग्नी व यमाईचे पुनर्मीलन घडवून आणले. आजही चैत्र यात्रेदिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजम्यासह यमाई देवीच्या भेटीस जाते. विवाहाचा मानाचा आहेर यमाईस अर्पण करून केदारनाथ सदरेवर बसतात आणि यमाई देवी अर्थात माता रेणुका आणि देवांच्या शिक्केकट्यारीत वास असलेल्या क्रोधांशरूपी ऋषी जमदग्नींचा विवाह सोहळा दरवर्षी थाटात पार पडतो.

श्री यमाई देवी मुळस्थान औंध (मुळपीठ)

यमाई देवीचे मुळस्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. जोतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य जोतिबा डोंगरावर असते. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई जोतीबा भेट दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेदिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाईदेवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ-पीठ वाहण्याची पुर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दांपत्य मंदिरासमोर दगडांच्या व खापरांच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे चौदा चौक कड्या व सात समुद्ररूपी विश्‍वाचे प्रतीक. "आम्ही नवजीवनाची सुरुवात तुझ्या दारातून करतो, तेव्हा आमचा संसार सुखी कर' असे साकडे घालून भाविक देवीस मीठ-पीठ अर्पण करतात. यमाईदेवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने, माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण देतात. बहीण भावाचे, अर्धपशूचे, कृष्ण व दुधाचे माठ घेऊन जाणाऱ्या गवळणी, रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी शिल्पे आहेत.

श्री जोतिबांचे दर्शन घेतल्यानंतर चाफेबनातील यमाई देवींचे दर्शन करण्याचा दंडकच येथे आहे. यमाईच्या दर्शनाविना जोतिबाची वारी पूर्ण होत नाही; अशी मान्यता भाविकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते.

यात्रा - उत्सव

[संपादन]

श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील यात्रा व उत्सव! परंतु सर्वात आश्यर्याची बाब म्हणजे यातील एकही यात्रा श्री ज्योतिबादेवांस समर्पित किंवा खास त्यांच्यासाठी भरवली जात नाही. ब्रह्म, विष्णू, महेश, ऋषी जमदग्नी यांचा क्रोधांश आणि कोटी सूर्याचे तेज धारण केलेला तेजःपुंज अवतार असलेला ज्योतिबा अवतार हा मुळात बटु स्वरूप असून शिवरूपी वैराग्य धारण केले असल्याने ते मोहमायेपासून आलिप्त आहेत. त्यामुळे अगदी नारळ वाढवण्याचा व कौल लावण्याचा मान देखील हा तिथल्या क्षेत्रपाल दैवत श्री कालभैरवांना दिला असून मुख्य यात्रा व इतर यात्रांचा मान देखील ज्योतीबांनी त्यांच्या परिवार देवतांना दिला आहे.   

चैत्र यात्रा ( मुख्य यात्रा ) :- श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर प्रमुख चार यात्रा पार पडतात. त्यातील मुख्य व सर्वाधिक लोकप्रिय असलेली चैत्र यात्रा ही श्री यमाई देवीस समर्पित आहे. ही यात्रा यमाई म्हणजेच रेणुका आणि कट्यारस्वरूपी ऋषी जमदग्नी यांच्या विवाहाप्रित्यर्थ भरवली जाते. चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिल मध्ये जोतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे सहा-सात लाख भाविक या यात्रेसाठी येतात. या वेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहभान हरपून, 'चां S S ग भलं' च्या एकच जयघोषात जोतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एकच जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे 'उत्सव दृश्य' अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रींचा शासकीय महाभिषेक पहाटे ५ ते ६ या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा ७ ते ८ या वेळेत होते. तसेच सकाळी १० ते १२ या वेळेत धुपारतीसह पंचारती होते. दुपारी एकच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या हलगी, पिपाणी, सनईच्या सुरांवर नाचविल्या जातात. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेला सुमारे तीस ते पन्नास फूट उंचीचा वजनदार वेळू! त्यावर तळामध्ये जोतिबाचे वाहन 'घोडा' बसवलेला असतो. जोतिबावर मनाच्या ९६ सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हात्ती, उंट, तोफागाडी, व भालदार, चोपदारांचा लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी पाचच्या सुमारास विधिपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री जोतिबाची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही जोतिबाची गुरुमाता अर्थात आई! याच दिवशी सूर्यास्तानंतर, यमाई देवी शिक्के-कट्यारशी (जमदग्नीशी) विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री जोतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य आतषबाजी करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजे पाखाळणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर पाच रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस 'पाखाळणी' असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळाले नाही ते पाखाळणीस येऊन पालखी व शिखरांवर गुलाल-खोबरे टाकून दर्शन घेऊन परतात. []

श्रावण षष्टी यात्रा :- श्रावण षष्टी यात्रा ही श्री चोपडाई देवीस समर्पित असून  श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबाने रत्नासुर राक्षसाचा वध केला. असुराच्या रक्तातील तामसिक गुणांमुळे  देवीच्या अंगाचा दाह होत होता, त्यामुळे केदारनाथसह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल आणि वल याने देवीची पूजा केली. तेव्हापासून श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री लिंबू, बेल आणि फुलांची विशेष पूजा केली जाते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवात फक्त धुपारती होते आणि हा रात्रीचा उत्सव असतो. संपूर्ण रात्र देवीचा जागर असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे धुपारतीने उत्सव संपतो.[]

खेटे यात्रा :- माघ महिन्यात पाच रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. ही यात्रा करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीस समर्पित असून देवीनेच या यात्रेचा प्रघात पाडला. या खेट्याचं वैशिष्ट्य असे आहे की, फक्त्त कोल्हापूरचेच भाविक हे खेटे घालतात. या बाबतची आख्यायिका अशी, पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयातकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली व केदारनाथला न जाण्याविषयी विनवणी केली. तेंव्हा केदारनाथाने जोतिबावर राहण्याचे मान्य केले. तेंव्हापासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरू आहे.[]


ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजासाहित्य व मेवामिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासन काठ्या असतात.

पहिला सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळी गावाचा आहे (छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी १८९६ साली हा मान पाडळी या गावला दिला). गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्य रेश्मी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान ,सूती तोरण्या, आणि बसण्यावर सुर्वण पादुका, असा साज असतो. या सासनकाठीला १८ देवसेवक आहेत, तीर्थक्षेत्र पाडळी गावाचे गावाचे भक्त १२० कीलो मीटर हून जास्त अंतर म्हणजे ते वाडी रत्‍नागिरी येथे ४ दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलुन नेतात.परतीचा प्रवास मिळून हा प्रवास ८ दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असतांना सासन काठीचे वजन ३०० किलोहून जास्त असते.(सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे,धन,हारतुरे इत्यादी) सासणकाठी म्हणजे ४५ ते ५० फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असतात. काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात. या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोडय़ाची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काठय़ा पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठय़ा नाचवत असतात. निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळय़ात या रंगबिरंगी काठय़ांची शोभा अवर्णनीय असते. या वेळी भाविक चांगभलेचा गजर करीत असतात. इतर काही महत्त्वाच्या मानाच्या शासनकाठ्या मध्ये मौजे विहे(पाटण),नावजीबाब किवळ,हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी , कोल्हापूर छत्रपती या काठ्यांचा समावेश होतो.मानाच्या अठरा व एकूण शहाण्णव सासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात.पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो.


श्री ज्योतिबाची महाराष्ट्रातील अन्य देवळे

[संपादन]

  • श्री ज्योतिबा मंदिर गिरजवडे (ता. शिराळा, जि. सांगली) येथे ज्योतीबाचे प्रसिद्ध ठिकाण असून, याला थोरला ज्योतिबा असे म्हणतात. प्रतीवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.
  • श्री ज्योतिबा मंदिर जळव
  • कापशी (ता. आष्टी, जिल्हा बीड) येथे मराठवाड्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे . प्रती चैत्रपौर्णिमेला यात्रा उत्सव साजरा केला जातो
  • तीर्थक्षेत्र पाडळी (ता.जि.सातारा) सासनकाठी क्र.१
  • विहे (ता. पाटण )
  • किवळ (ता. कराड )
  • श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव (ता.वाळवा)
  • श्री क्षेत्र निनाम (ता. जि. सातारा)
  • श्री तीर्थक्षेत्र कुसवडे जोतिबा मंदिर कुसवडे ता जि सातारा
  • रेठरे बुद्रुक (ता. कराड )
  • कुमठे (कोरेगाव)
  • मुळगाव (ता. पाटण.) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत
  • गुंधा(वडगाव)(ता.बीड जि.बीड) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत.
  • तसेच संपूर्ण महाराष्ट्राभर गावोगावी श्री ज्योतिबाची अनेक मंदिरे आहेत.

चित्रदालन

[संपादन]

हेसुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  • १) बॉम्बे गॅझिटियर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट
  • २) Temples of Maharashtra - G. K. Kanhere
  • ३) कुलदैवत - महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग प्रकाशन - १९७४

बाह्य दुवे

[संपादन]
  1. Gaikwad, Priyanka. "कोल्हापूरचा ज्योतिबा |" (इंग्रजी भाषेत). 2023-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-14 रोजी पाहिले.
  2. "Shree Jyotirling Devasthan". www.shreejyotiba.com. 2026-03-13 रोजी पाहिले.
  3. "Shree Jyotirling Devasthan". www.shreejyotiba.com. 2026-03-13 रोजी पाहिले.
  4. "Shree Jyotirling Devasthan". www.shreejyotiba.com. 2026-03-13 रोजी पाहिले.