ज्योतिबा मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्योतिबा मंदिर कोल्हापूर
स्थानिक नाव
पर्यायी चित्र
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
ज्योतिबा मंदिर कोल्हापूर
महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
नाव
भूगोल
गुणक 16°42′00″N 74°14′00″E / 16.70000°N 74.23333°E / 16.70000; 74.23333गुणक तळटिपा
देश भारत
राज्य/प्रांत महाराष्ट्र
जिल्हा कोल्हापूर
संस्कृती
इतिहास व प्रशासन

ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे.[१] ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.

भौगोलिक स्थान[संपादन]

कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्‍नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे.

इतिहास आणि माहात्म्य[संपादन]

ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. ‘देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा
चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा’

ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते.

कथा/आख्यायिका[संपादन]

ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्‍नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.

ज्योतिबाच्या मंदिराची रचना[संपादन]

देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त किवळ गावच्या नावजी साळुंखे पाटलांनी (संत नावजीनाथ) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.

ज्योतिबा

ज्योतिबाची मूर्ती[संपादन]

ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्‍नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.

उत्सव[संपादन]

ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजासाहित्य व मेवामिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासन काठ्या असतात.

पहिला सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र निनाम(पाडळी) गावाचा आहे. गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्य रेश्मी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान ,सूती तोरण्या, आणि बसण्यावर सुर्वण पादुका, असा साज असतो. या सासनकाठीला १८ देवसेवक आहेत, तीर्थक्षेत्र निनाम (पाडळी )गावाचे गावाचे भक्त १२० कीलो मीटर हून जास्त अंतर म्हणजे ते वाडी रत्‍नागिरी येथे ४ दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलुन नेतात.परतीचा प्रवास मिळून हा प्रवास ८ दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असतांना सासन काठीचे वजन ३०० किलोहून जास्त असते.(सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे,धन,हारतुरे इत्यादी) सासणकाठी म्हणजे ४५ ते ५० फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असतात. काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात. या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोडय़ाची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काठय़ा पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठय़ा नाचवत असतात. निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळय़ात या रंगबिरंगी काठय़ांची शोभा अवर्णनीय असते. या वेळी भाविक चांगभलेचा गजर करीत असतात. इतर काही महत्त्वाच्या मानाच्या शासनकाठ्या मध्ये मौजे विहे(पाटण),नावजीबाब किवळ,हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी , कोल्हापूर छत्रपती या काठ्यांचा समावेश होतो.मानाच्या अठरा व एकूण शहाण्णव सासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात.पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो.

श्री ज्योतिबाची महाराष्ट्रातील अन्य देऊळे[संपादन]

  • श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव (ता.वाळवा)
  • श्री तीर्थक्षेत्र ज्योतिबा मंदिर पाडळी (ता.जि.सातारा) सासनकाठी क्र.१
  • श्री तीर्थक्षेत्र कुसवडे जोतिबा मंदिर कुसवडे ता जि सातारा
  • श्री ज्योतिबा मंदिर जळव
  • किवळ (ता. कराड )
  • रेठरे बुद्रुक (ता. कराड )
  • विहे (ता. पाटण )
  • कुमठे (कोरेगाव)
  • मुळगाव (ता. पाटण.) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत
  • गुंधा(वडगाव)(ता.बीड जि.बीड) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत.
  • तसेच संपूर्ण महाराष्ट्राभर गावोगावी श्री ज्योतिबाची अनेक मंदिरे आहेत.

चित्रदालन[संपादन]

हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  • १) बॉम्बे गॅझिटियर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट
  • २) Temples of Maharashtra - G. K. Kanhere
  • ३) कुलदैवत - महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग प्रकाशन - १९७४

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ Gaikwad, Priyanka. "कोल्हापूरचा ज्योतिबा |" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2023-04-05. 2022-04-14 रोजी पाहिले.