करवा चौथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिवसभर करवा चौथ उपवासानंतर (विवाहित महिला) हिंदू विवाहित महिलांमध्ये वार्षिक परंपरेचा भाग म्हणून चाळणीतून चंद्र पाहत आहेत.
उपवास बसलेल्या महिला एकत्रितपणे वर्तुळात बसून, कर चौथ पूजा करताना, गाणे गात असताना फेरी सादर करत असतात (मंडळामध्ये आपली थाळी पार करत असतात)

करवा चौथ हे हिंदू व्रत आहे.[१] हे व्रत दिल्ली , हरियाणा , राजस्थान , पंजाब, उत्तर प्रदेश , जम्मू , हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या प्रांतात केले जाते .[२]

स्वरूप[संपादन]

आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुरोग्यासाठी आणि समृृृद्धीसाठी पूर्ण दिवस उपवास करतात.[३] संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहरा पाहतात. क्वचित अविवाहित स्त्रियाही आपल्या इच्छित पतीसाठी हे व्रत करतात. या दिवशी भगवान शंकर,देवी पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. त्याजोडीने दहा छोटे मातीचे घडे पाण्याने भरून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती आहे. या घड्यांना "करवा" असे म्हणतात.हे करवे नंतर आपल्या घरातील मुलींना आणि बहिणींना भेटवस्तूंसह दिले जातात. या दिवशी महिला एकत्र बसून या व्रताची कथा एकमेकींना सांगतात.काहीवेळा ब्राहण पुरोहित येऊन ही कथा सांगतात आणि त्याच्या मोबदल्यात पुरोहिताला दान दक्षिणा दिली जाते. विवाहित स्रियांना त्यांच्या पतीकडून भेटवस्तू दिली जाते. स्रिया आपल्या सासूचे आणि घरातील अन्य ज्येष्ठ स्रियांचे आशीर्वाद घेतात.[४]

व्रताची कथा[संपादन]

कोणे एके काळी एका नवविवाहित महिलेने आपल्या माहेरी असताना हे व्रत केले.ती सुस्वरूप अशी युवती होती.तिने कठोरपणे आपला उपवास पालन केला. तिच्या तपाने तिला दीर्घायुष्य मिळाले. भावांनी जवळच्या डोंगरावर अग्नी प्रज्वलित केला आणि तिला सांगितले की चंद्र उगवला आहे. व्रताची समाप्ती करताना चंद्राचे दर्शन घेण्यासाठी ती तिथे गेली पण तिला लक्षात आले की भावांनी आपल्याला फसविले आहे.तिचे व्रत मोडल्याने तिच्या पतीच्या निधनाची बातमी तिला समजली.ती बातमी कळताच ती आपल्या पतीच्या घरी निघाली.वाटेत तिला शिव पार्वती भेटले आणि त्यांनी तिला असे का घडले असावे हे कथन केले.पार्वतीने तिला आपल्या करंगळीच्या टोकातून थोडे रक्त दिले आणि आपल्या पतीच्या मुखावर शिंपडण्यास सांगितले.भविष्यकाळात तिने अगदी कठोरपणे हे व्रत पाळण्याचा सल्लाही देवीने तिला दिला. सासरी पोहोचल्यावर तिने पार्वतीने दिलेले रक्त पतीच्या मुखावर शिंपडले आणि तो पुनरूज्जीवित झाला.त्यानंतर या महिलेने निष्ठेने करवा चौथ व्रत पालन केले आणि तिला सुख समृृद्धी प्राप्त झाली अशी या व्रतामागील आख्यायिका आहे.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ GANGRADE, DR PRAKASH CHANDRA (2015-06-01). Hinduo Ke Vrat-Parv Evam Teej Tyohar (हिंदी भाषेत). V&S Publishers. ISBN 978-93-5057-358-7.
  2. ^ Melton, J. Gordon (2011). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 978-1-59884-205-0.
  3. ^ Kakar, Sudhir; Kakar, Katharina (2009). The Indians: Portrait of a People (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 978-0-14-306663-7.
  4. ^ a b Hindu Vrat Kathayen (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. 2003. ISBN 978-81-288-0375-8.