गोविंद बल्लाळ देवल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोविंद बल्लाळ देवल
जन्म नाव गोविंद बल्लाळ देवल
जन्म नोव्हेंबर १३, १८५५
मृत्यू जून १४, १९१६
कार्यक्षेत्र नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक

गोविंद बल्लाळ देवल (नोव्हेंबर १३, १८५५ -जून १४, १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके - दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.


गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म कोकणातला, त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरुवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. देवल १९१३ साली गंधर्व नाटक मंडळीत गेले.