नारायण श्रीपाद राजहंस
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| नारायण श्रीपाद राजहंस | |
|---|---|
नाटकात स्त्री-भूमिकेतील वेशभूषेत नारायण राजहंस (इ.स. १९२४) |
|
| आयुष्य | |
| जन्म | जून २६, इ.स. १८८८ |
| जन्म स्थान | नागठाणे, पलुस तालुका सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
| मृत्यू | इ.स. १९६७ |
| व्यक्तिगत माहिती | |
| धर्म | हिंदू |
| नागरिकत्व | भारतीय |
| देश | |
| भाषा | मराठी |
| पारिवारिक माहिती | |
| वडील | श्रीपाद राजहंस |
| जोडीदार | गोहर कर्नाटकी |
| संगीत कारकीर्द | |
| पेशा | गायकी, अभिनय, गायन (संगीत नाटके) |
| कारकिर्दीचा काळ | इ.स. १९०५ - इ.स. १९५५ |
| गौरव | |
| विशेष उपाधी | बालगंधर्व |
| पुरस्कार | पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार |
नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (२६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र - इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अपवादानेच अभिनय करीत असतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.[१]
अनुक्रमणिका |
[संपादन] जन्म
नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म जून २६, इ.स. १८८८ रोजी सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यात नागठाणे या गावी झाला.
[संपादन] जीवनपट
बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.[२]
बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत इ.स. १९०५ साली आरंभली. मात्र तिचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या इ.स. १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी इ.स. १९१३ मध्ये बालगंधर्वांनी, गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. मात्र इ.स. १९२१ मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे नारायणराव राजहंस हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. मात्र त्यापुढच्या काळात या संस्थेची आर्थिक स्थिती चढउताराचीच राहिली. नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते. प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली.
बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली.
भाऊराव कोल्हटकरांच्या इ.स. १९०१ मधील निधनानंतर जेंव्हा संगीत नाटक परंपरेला उतरती कळा आली, त्यानंतर बालगंधर्वांनी या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्त्वाचे कार्य केले. इ.स. १९२९ सालच्या ४२ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
स्त्री भूमिकांसाठी महिला कलाकारांची गरज निर्माण झाल्यानंतर एप्रिल इ.स. १९३८ मध्ये गोहर कर्नाटकी यांचा गंधर्व नाटक मंडळीत समावेश झाला. इ.स. १९४० मध्ये नारायणरावांच्या पत्नीचा मृत्यू झाला. गोहरबाईंनी त्यानंतर कंपनीचा कारभार सांभाळण्यातही सहभाग दिला. इ.स. १९५१ मध्ये नारायणरावांनी गोहरबाईंशी कायदेशीर रीतीने विवाह केला.
त्यांनी संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला सह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. त्यांची संगीत शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. इ.स. १९५५ रोजी त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली.
[संपादन] निधन
इ.स. १९६७ मध्ये बालगंधर्वांचे निधन झाले.
[संपादन] बालगंधर्व रंगमंदिर
इ.स. १९६८ साली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांचे स्मृतीमंदिर तयार केले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी केले. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्याहस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते.[३]
[संपादन] पुरस्कार
- बालगंधर्वांचा संगीत इ.स. १९५५ साली संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला.
- भारत सरकारनी बालगंधर्वाना इ.स. १९६४ साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले.[४]
[संपादन] चरित्र
- मोहन नाडकर्णी (इ.स. २००२). बालगंधर्व: द नॉनपॅरेल थेस्पियन. नॅशनल बुक ट्रस्ट, पृ. ७७. (इंग्लिश मजकूर)
[संपादन] चित्रपट
- बालगंधर्वांच्या जीवनावर श्रीमती हेमंती बॅनर्जी यांनी माहितीपट बनवलेला आहे. या माहितीपटास इ.स. २००२ साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.[५]
- बालगंधर्वांच्या जीवनप्रवासावर नितिन चंद्रकांत देसाई यांनी ' बालगंधर्व ' या चित्रपटाची निर्मिती इ.स. २०११ साली केली. या बालगंधर्वांची भूमिका अभिनेते सुबोध भावे यांनी साकारली आहे.
[संपादन] संदर्भ
- ↑ सौमित्र पोटे (७ मे, इ.स. २०११). तो 'राजहंस' एक!. महाराष्ट्र टाइम्स. (मराठी मजकूर)
- ↑ डॉक्युमेंटिंग अ फरगॉटन लीजंड (गतस्मृतीत गेलेल्या कलावंताविषयी दस्तऐवजीकरण). द हिंदू (६ एप्रिल, इ.स. २००१). (इंग्लिश मजकूर)
- ↑ बालगंधर्व परिवार साजरा करणार मनोरंजनाची चार दशके. महाराष्ट्र टाइम्स (२२ जून, इ.स. २००८). (मराठी मजकूर)
- ↑ १९६४ पद्मभूषण अवॉर्डीज (इ.स. १९६४ पद्मभूषण पुरस्कारविजेते). (इंग्लिश मजकूर)
- ↑ बिहाइंड द कॅमेरा, बाय चॉइस (कॅमेर्यामागे, स्वेच्छेने). द टेलिग्राफ (१३ नोव्हेंबर, इ.स. २००२). (मराठी मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
- बालगंधर्व यांनी गायलेली गाणी. आठवणीतली गाणी.कॉम. (मराठी मजकूर)
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||