चौल-रेवदंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.

पौराणिक नाव[संपादन]

दोन्ही स्थळांची पौराणिक नावे अनुक्रमे चंपावती आणि रेवती. चंपक म्हणजे चाफा, तर अशी चाफ्याची झाडे असलेला भाग तो चंपावती. याला आधार म्हणून आजही गावात जागोजागी असलेली चाफ्याची झाडे दाखवली जातात. काहींच्या मते इथे वापरल्या जाणाऱ्या ‘चंपा’ नावाच्या मासे पकडण्याच्या जाळीवरून किंवा चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले, तर रेवदंड्याचे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाच्या रेवती नावाच्या पत्‍नीच्या नावावरून पडले.

चौलची पर्यायी नावे[संपादन]

खौल, चंपावतीनगर, चावोल, चिमोलो, चिवल, चिवील, चेऊल, चेमुल, चेमुली, चौले, जयमूर, तिमुल, शिऊल, सिबोर, सिमुल, सेमुल्ल, सैमुर या नावांनीही चौल ओळखले जाते. इतिहासाचा प्रदीर्घ कालखंड, त्यातच बंदर असल्याने संपर्कात आलेल्या अनेक देशी-परदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या साऱ्यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती, लिपी, उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही नावांची जंत्री जन्माला आली.

चौलचा इतिहास[संपादन]

चौलचा अगदी प्राचीन उल्लेख ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी’ या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रवासवर्णनात येतो. चौलजवळच्या वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी या काळाचे चौलशी असलेल्या नाते दाखवते, पण चौलच्या प्राचीन बंदराविषयी कुठलेच पुरावे मिळत नव्हते. तेव्हा याच्याच शोधात पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे चौलमध्ये वेगवेगळ्या भागांत उत्खनन करण्यात आले आणि त्‍यातून हे प्राचीन बंदर प्रकाशात आले. दोन हजार वर्षांपूर्वीच्या या प्राचीन बंदरातून इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश आणि अगदी चीन असा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता. चौल हे त्यावेळी जगाच्या नकाशावर भरभराटीला आलेले नगर होते

उत्खननात चौलच्च्या प्राचीन बंदराचे अवशेष, ‘जेटी’ची भिंत, सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, रिंगवेल (नळीची विहीर), सातवाहनकालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ ‘अ‍ॅम्फेरा’ आणि असे बरेच काही सापडले. जमिनीखाली काळाचे अनेक थर डोक्यावर घेत गाडली गेलेली प्राचीन संस्कृतीच यामुळे प्रकाशात आली. डेक्कन कॉलेजचे डॉ. विश्वास गोगटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उत्खननामध्ये डॉ. अभिजित दांडेकर, डॉ. श्रीकांत प्रधान, शिवेंद्र काडगावकर, सचिन जोशी, रुक्सना नानजी आणि विक्रम मराठे आदी अभ्यासकांनी यात भाग घेतला होता. या उत्खननामुळे चौलला त्याची खरी ओळख मिळाली.

चौलमधील भेट देण्यासारखी स्थळे[संपादन]

  • रामेश्वर मंदिर : रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. मंदिराचे छत उतरत्या कौलांचे बनले आहे. देवळाच्या पुढ्यात नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करणी आहे. कोकणातील मंदिर वास्तुशैलीचा हा उत्तम नुमना म्हणता येईल. मूळ मंदिराची निर्मिती कधी-कोणी केली याची माहिती मिळत नाही, पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात.

या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली पर्जन्य, वायू आणि अग्नी अशा नावांची तीन कुंडे आहेत. दुष्काळ पडला, पाऊस आटला की, ‘पर्जन्य’, वारा पडला-गदगदू लागले की ‘वायू’ आणि थंडी-गारठा वाढला की, उर्वरित ‘अग्नी’ कुंड उघडायचे. गावातील त्या-त्या गोष्टींची उणीव ही कुंडे भरून काढतात, अशी मान्यता आहे. पर्जन्यकुंड १७३१, १८७६ आणि १९४१ मध्ये उघडल्याच्या नोंदी आणि त्या-त्यावेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते.

  • एकवीरा देवीचे मंदिर : एकवीरा भगवती देवीचे मंदिरही बरेच जुने आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावरील तुळईवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७६ (इसवी सन १७५२) मध्ये केल्याचा एक संस्कृत लेख आहे.
  • राजकोट : हा चौलचा भुईकोट विजापूरच्या आदिलशाहीने बांधलेला किल्ला होता. पुढे तो चौलच्या राजवटींबरोबर सत्ताबदल अनुभवत मराठ्यांकडे आला. पण पुढे-पुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठ्यांच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ लागल्याने पेशव्यांच्या आरमाराचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरूंग लावून हा राजकोट पाडला. या राजकोटाची तटबंदी, येथील शिबंदीची घरे, महाल-वाडे यांचे अवशेष आजही दिसतात.
  • हमामखाना : हमामखाना म्हणजे मुसलमानी सत्ताधीशांनी बांधलेले शाही स्नानगृह होय. कमानींची रचना, भिंतीतच काढलेल्या खोल्या आणि या साऱ्यांवर असलेल्या चुन्यातील नक्षीकामाने या वास्तूला कलात्मक चेहरा आला आहे. या साऱ्यांतून फिरणारे पाण्याचे पाट, कारंजी, हौद तर ती शाही श्रीमंतीच पुढे आणतात. आज येथे पाण्याचा पुरवठा होत नसला तरी त्या सौंदर्यशाली रचना बघण्यासाठी हा हमामखान आजही भेट देण्यासारखा आहे.
  • कलावंतिणींचा वाडा : मुसलमान राजवटील ही वास्तू चौलच्या सराई भागात आज उद्ध्वस्त अवस्थेत उभी आहे. या इमारतीच्या कमानी, सज्जे व घुमटाकार छतावरून हा कलावंतिणींच्या वाडा एकेकाळी किती सुंदर असेल याची कल्पना करता येते.
  • राजाभाऊ राईलकरांची वाडी : राजाभाऊ राईलकरांनी पाऊण एकर जमिनीमध्ये ही शेकडो जातींची फुलझाडे, फळझाडे, वेली आणि वृक्ष लावून ही जिवंत वनस्पतींची वाडी तयार केली आहे. यामध्ये आंबा, नारळ, पोफळी, फणस, रातांबा अशी कोकणची झाडे तर आहेतच, पण त्या जोडीला असंख्य दुर्मिळ, औषधी आणि काही परदेशी वनस्पती आहेत. एकेक झाड पाहताना हा खजिना उलगडत जातो. कवठी चाफा, बकुळ, सीतेचा अशोक, सोनटक्का, अशी फुलझाडे त्यांचा सुगंध आणि सौंदर्य उधळत पुढे येतात. वनस्पतींच्या दालनात अनंतमूळ, चित्रक, तुळस, ब्राह्मी, महाळुंग, वैजयंती, शतावरीसारख्या वनस्पती औषधी वनस्पती आहेत. जायफळ, दालचिनी, मिरीचा वेल आणि ‘ऑल स्पायसेस’सारख्या मसाले पदार्थाच्या वनस्पती आणि अननस, कॉफी, चॉकलेटमध्ये वापरला जाणारा कोकोे, साबूदाणा यासारख्या वनस्पती या वाडीत आहेत. वनस्पतींच्या या दुनियेत आफ्रिकेतील ‘अ‍ॅव्हाकॅडो’ किंवा ‘बटरफ्रूट’, तसेच अमेरिकेतील ‘पॅशन फ्रूट’सारखी विदेशी झाडेही दडून बसलेली असतात. हा सारा संग्रह विलक्षण आणि त्यातही जिवंत आहे. राईलकरांनी तोे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवला आणि आता त्यांच्यामागे त्यांची मुले शैलेश आणि संतोष या ठेव्याचे वनस्पती संग्रहालय करण्याच्या खटपटीत आहेत.