महेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महेश्वर हे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठी वसलेले शहर आहे. पुर्वी येथे अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी होती.

पौराणिक उल्लेख[संपादन]

महेश्वर हे पुराणकाळापासून प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. पुराणातील कार्तवीर्य अर्जुन या सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय राजाची राजधानी म्हणून महेश्वरचे उल्लेख सापडतात. कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन या नावानेही रामायण तसेच महाभारतात ओळखला गेला आहे. एका पुराणकथेनुसार, सहस्रार्जुन राजा आपल्या ५०० राण्यासह नदीकाठी फिरायला गेला. राण्यांना क्रीडा करण्याची लहर आली. आता क्रीडेसाठी मोठी जागा पाहिजे म्हणून सहस्रार्जुनाने आपल्या हजार बाहुनी नर्मदेचा प्रवाह रोखला. त्याचवेळी आकाशमार्गे जाणाऱ्या रावणाने नदीचे कोरडे पात्र पहिले आणि शिवभक्त रावणाने नदीच्या पात्रात शिवलिंग स्थापन करून पूजा सुरू केली. तेवढ्यात सहस्र्बाहुच्या राण्यांची क्रीडा संपली आणि राजाने नर्मदेचा प्रवाह सोडला आणि नदीतून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात रावणाचे शिवलिंग वाहून गेले. संतापलेल्या रावणाने सहस्रार्जुनाशी युद्ध आरंभले. आपल्या हजार बाहूनी युद्ध करणाऱ्या कार्तवीर्य अर्जुनाने रावणाचा सहज पराभव केला आणि त्याला जमिनीवर लोळवून त्याच्या प्रत्येक डोक्यावर एक एक दिवा ठेवला. हे कमी होते म्हणून की काय कार्तवीर्य अर्जुनाने रावणाला पकडून आपल्या मुलाच्या पाळण्याच्या खांबाला बांधून ठेवले.

या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही महेश्वरच्या सहस्राबाहू मंदिरात ११ दिवे लावण्याची प्रथा आहे.

महेश्वरचे पुरातन नाव माहिष्मती असे होते. महाभारतातील उल्लेखानुसार माहिष्मती नगरीतील स्त्रियांना आर्यावर्तातील इतर स्त्रियांप्रमाणे विवाह बंधनाचे जोखड नव्हते. त्या कुठल्याही पुरुषाशी संबंध ठेवण्यास मुक्त असत.[१]. त्याची कथा अशी आहे. पुरातन काळी नील नावाचा निषाद राजा या नगरीत राज्य करत होता. त्याची कन्या इतकी सुंदर होती की खुद्द अग्निदेव तिच्या प्रेमात पडला. ब्राह्मणाचे रूप घेतलेल्या अग्नीच्या प्रेमात राजकन्या पडली. त्यांच्या चोरून होणारी भेटीगाठींची माहिती नील राजाला मिळताच तो भयंकर क्रुद्ध झाला.आपल्या कन्येला नादी लावणाऱ्या ब्राह्मणाला राजाने शिक्षा सुनावताच त्या ब्राह्मणाने आपले अग्नी रूप धारण केले. अक्राळविक्राळ अग्नीला पाहून राजा घाबरला आणि दयेची क्षमा याचना करू लागला. धर्म आणि ज्ञान यांच्या मूळ रूप असणाऱ्या अग्नी देवतेला आपण शिक्षा करू शकत नाही हे त्याने काबुल केले. शांत झालेल्या अग्नीने त्याला संतुष्ट होऊन वर मागण्यास सांगितले. राजाने कुठल्याही परकीय आक्रमणापासून संरक्षण मागितले. अग्नीने वर दिला पण एका अटीवर, या नगरीतील कुणालाही निखळ प्रेमातून जीवनाचा आनंद घेण्यास परवानगी असावी हे राजाने मान्य करावे.

अनेक शतके नंतर युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा सहदेवाने माहिष्मती नगरीचे रक्षण स्वयं अग्निदेवता करत आहेत हे जाणून इथे युद्ध करणे टाळले. अग्नीची पूजा करून सहदेव सौराष्ट्राकडे निघून गेला.

शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा वादविवाद महेश्वर येथेच संपन्न झाला.

उद्योगधंदा[संपादन]

पाचव्या शतकापासून महेश्वर वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. रेघा, चौकटी याने बनलेल्या माहेश्वरी साड्या पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. रेहवा सोसायटी ही होळकरांच्या वंशजांनी स्थापन केलेली संस्था पारंपारिक विणकाम कलेला उत्तेजन देते.

अनेक चित्रपटांचे चित्रीकरण महेश्वरच्या सुरेख घाटांवर झालेले आहे. आदी शंकराचार्य या पहिल्या संस्कृत चित्रपटाचे चित्रीकरण या भागात झाले आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या पॅडमॅन या अक्षयकुमार अभिनित चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण महेश्वर येथे झाले.

राणी अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आणि नर्मदेकाठी बांधलेले महेश्वराचे मंदिर यामुळे अनेक पर्यटक महेश्वरला भेट देत असतात.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.sacred-texts.com/hin/m02/m02030.htm