रमण प्रल्हाद रणदिवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रमण प्रल्हाद रणदिवे हे एक मराठी कवी आणि गझलकार आहेत. त्यांचा जन्म पुण्याचा. वडील प्रल्हाद शांतवन रणदिवे हे पोस्ट खात्यात नोकरी करत. वडलांचा संस्कृतचा चांगला व्यासंग होता. त्यांनी बायबलवर साडेपाच हजार मराठी कवितांचे भक्तिकाव्य लिहिले होते. रमणने आपल्या वडिलांकडूनच कवित्वाचा वारस घेतला.

रमण रणदिवे यांचे शिक्षण पुण्याच्या कॅम्प हायस्कूलमधून झाले. पुढे पं.यशवंतराव मराठे यांच्या कडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. इ.स. १९६५पासून रणदिव्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली. त्यांच्या कवितांमध्ये क्रूस आणि ख्रिस्ताचे वारंवार उल्लेख येतात. १९७० सालानंतर रमण रणदिवे जाणीवपूर्वक गझल लेखनाकडे वळले. त्यांच्या गझलांना कौशल इनामदार, राम कदम, भास्कर चंदावरकर, गिरीश जोशी, यशवंत देव आदींनी संगीतबद्ध केले आहे.

मराठी, हिंदी व उर्दू गझलांचे गाढे अभ्यासक, गझलतंत्राचे भाष्यकार व ज्येष्ठ गझलकार डॉ.राम पंडित यांनी तर ‘सुरेश भटांनंतरच्या गझल सृजन साहित्यातील महत्त्वाचा गझलकार’ म्हणून रमण रणदिवेंचा उल्लेख केलेला आहे. गझलसम्राट सुरेश भट यांनी ‘शब्दांची इज्जत कशी करावी,’ हे शिकविले. ‘देखण्या आणि उपऱ्या शब्दांच्या नादी लागू नये. आधी आयुष्याला भिडा मग गझल आपोआप येईल,’ हे सुरेश भटांचे बोल रमणने कायम काळासाठी स्मरणात ठेवले आहेत. मराठी गझलांचे आणखी एक मर्मज्ञ गझलकार सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे वास्तव्य पुण्यातच असल्या कारणाने रमण रणदिवेंना त्यांचा सहवास तर लाभला होताच; परंतु त्यांचे मौलिक मार्गदर्शनही मिळाले होते. सुप्रसिद्ध गीतकार शांता शेळके यांनी रमणला शब्दांच्या पुनरुक्तीतील प्रासादिकता आणि अर्थसघनता यांचे आकलन करून दिले. कवि शंकर वैद्य यांच्याकडूनही रमणने वेळोवेळी मार्गदर्शन घेतलेले आहे.

उत्तम आवाज, संगीताचे ज्ञान आणि संवादिनीवरून फिरणारा संगीतमय हात ही रणदिवेंची आणखी एक ओळख. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा वारसा पुढे चालवला आहे. थोरला मुलगा उत्तम तबलावादक आहे तर दुसरा मुलगा संवादिनी आणि व्हायलिन वादक आहे. त्यांचे घर म्हणजे संगीतघरच आहे. अनेक चित्रपटांसाठी रमण रणदिवे यांनी गीतलेखन केले आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत.

रमण रणदिवे यांचे काव्यसंग्रह[संपादन]

  • ऋतु फुलांचा
  • काहूर (२०१३)
  • चंद्रमेंदीच्या खुणा (२००२)
  • संप्रधार (२००८)
  • समर्पण (२०१४)

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

आठवणीतील गाणीमधील रमण रणदिवे यांच्या गझला[संपादन]

१. आज माझ्या अक्षरांना वचन (गायक सुरेश वाडकर)
२. जमेल तेव्हा जमेल त्याने (संगीत - सलील कुलकर्णी, स्वर - हृषीकेश रानडे, प्राजक्ता रानडे)

हे सुद्धा पहा[संपादन]