"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३६: ओळ ३६:
* पुण्याचे गणेश भांगरे यांनी मेघदूतावर आधारित ’आषाढस्य प्रथम दिवसे’ ही ९० मिनिटांची नृत्यनाटिका बसवली केली आहे. या नाटिकेत ४० कलावंत काम करतात.
* पुण्याचे गणेश भांगरे यांनी मेघदूतावर आधारित ’आषाढस्य प्रथम दिवसे’ ही ९० मिनिटांची नृत्यनाटिका बसवली केली आहे. या नाटिकेत ४० कलावंत काम करतात.
* चिरंजीत, गिरिजाकुमार माथुर, हंसकुमार तिवारी आदी अनेक हिंदी लेखकांनी रेडियोवर मेघदूतावर आधारित संगीतिका सादर केल्या आहेत. उदयशंकर भट्ट हे रंगमंचावर मेघदूत नावाची एकांकिका करीत.
* चिरंजीत, गिरिजाकुमार माथुर, हंसकुमार तिवारी आदी अनेक हिंदी लेखकांनी रेडियोवर मेघदूतावर आधारित संगीतिका सादर केल्या आहेत. उदयशंकर भट्ट हे रंगमंचावर मेघदूत नावाची एकांकिका करीत.
* पुण्यातील निखिल शेटे यांनी मेघदूताचा नवा अवतार रंगभूमीवर आणला आहे. याचा संगीत दिग्दर्शक जयदीप वैद्य यांनी मेघदूतासाठी डफ, [[पखवाज]], [[मृदंग]], [[व्हायोलीन]], [[सतार]], [[सरोद]], [[सारंगी]] आणि जेंबे अशा आठ वाद्यांचा उपयोग केला आहे.


==समश्लोकी अनुवादाचे नमुने==
==समश्लोकी अनुवादाचे नमुने==

१९:४०, ४ जून २०१७ ची आवृत्ती

मेघदूत हे कवी कालिदासाने लिहिलेले संस्कृत भाषेतील खंडकाव्य आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे.

मेघदूत काव्याची १११ कडवी आहेत, काव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन विभागांत विभागलेले आहे.


कथासूत्र

मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्षेश्वराचा एक सेवक होता. नेमून दिलेल्या कामात अापल्या पत्‍नीच्या नादाने हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरि' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्‍नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून अाल्या. त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून अापल्या पत्‍नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले.

प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणार्‍या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात अाली अाहे.[१]

कालिदास जयंती

कालिदासाचा जन्म नेमका कोणत्या दिवशी झाली ते माहीत नाही. परंतु ’मेघदूत’ काव्याची सुरुवात ज्या ’आषाढस्य प्रथमदिवसे’ या शब्दांनी होतो त्याची आठवण म्हणून कालिदासाचा जन्म आषाढ शुद्ध प्रतिपदेला झाला असे मानले जाते. त्यामुळे, कालिदासाची जयंती आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते. या दिवशी कालिदासाच्या वाङ्मयावर आधारलेले कार्यक्रम होतात.

मेघदूतावरील प्रसिद्ध टीकाग्रंथकार

मेघदूतावर सुमारे ९० भाष्ये आहेत. ही भाष्ये १७-१८व्या शतकांतील पंडितांनी किंवा त्याहूनही प्राचीनकालीन पंडितांनी लिहिली आहेत. परंतु पुण्यातल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेमध्ये केवळ आठ भाष्ये उपलब्ध आहेत.

  • केदारनाथ शर्मांची विद्योतिनी टीका (हिंदी)
  • आचार्य चंद्रतीर्थ महाराजांची कात्यायनी टीका (संस्कृत)
  • चरित्र वर्धनाचार्यांची चारित्रवर्धिनी टीका (संस्कृत)
  • ब्रह्मशंकर शास्त्री यांची भावबोधिनी टीका (संस्कृत)
  • मल्लिनाथाची संजीवनी टीका (रामचंद्र गणेश बोरवणकर यांनी या टीकाग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे.)
  • वल्लभदेव (महाविद्यालयीन अभ्यासासाठी या टीकाग्रंथाचा इंग्रजी अनुवाद R..R. Deshpande व T.K. Tope यांनी केला आहे.)


अन्य टीकाग्रंथकार

  • कृष्णपति, कृष्णमाचारियर,. जगद्धर, जतीन्द्रविमल चौधरी, दक्षिणावर्तनाथ, दिनकर मिश्र, परमेश्वर, पूर्णसरस्वती, भरतमल्लिक, महिमसंघगणि, विजयसूरिगणि, सुमतिविजय, हरगोविंद आणि ’सारोद्धारिण” लिहिणारा एक अज्ञात लेखक वगैरे.

मेघदूताचे अनुवाद

अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भावानुवाद केले आहेत - त्यापैकी कुसुमाग्रज (१९६१) व वसंत पटवर्धन (१९८१) ही नावे महत्त्वाची आहेत..

नाट्यरूप मेघदूत

  • पुण्याचे गणेश भांगरे यांनी मेघदूतावर आधारित ’आषाढस्य प्रथम दिवसे’ ही ९० मिनिटांची नृत्यनाटिका बसवली केली आहे. या नाटिकेत ४० कलावंत काम करतात.
  • चिरंजीत, गिरिजाकुमार माथुर, हंसकुमार तिवारी आदी अनेक हिंदी लेखकांनी रेडियोवर मेघदूतावर आधारित संगीतिका सादर केल्या आहेत. उदयशंकर भट्ट हे रंगमंचावर मेघदूत नावाची एकांकिका करीत.
  • पुण्यातील निखिल शेटे यांनी मेघदूताचा नवा अवतार रंगभूमीवर आणला आहे. याचा संगीत दिग्दर्शक जयदीप वैद्य यांनी मेघदूतासाठी डफ, पखवाज, मृदंग, व्हायोलीन, सतार, सरोद, सारंगी आणि जेंबे अशा आठ वाद्यांचा उपयोग केला आहे.

समश्लोकी अनुवादाचे नमुने

मूळ संस्कृत श्लोक (पूर्व मेघ-श्लोक ७वा, वृत्त -मंदाक्रांन्ता) पुढीलप्रमाणे -

संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियाया:।।
संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेशितस्य।।
गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां।।
बाह्योद्यानस्थितहरशिरश्चंद्रिकाधौतहर्म्या।।

गद्यार्थ- हे मेघा, संतप्तांचा, व्यथितांचा तू निवारा आहेस. स्वामींच्या शापामुळे मी माझ्या सखीचा विरह फार कष्टाने सहन करतो आहे. तेव्हा माझा निरोप तेवढा माझ्या प्रिय सखीला पोहोचवण्याची विनंती तुला करतो आहे. तुला यक्षांच्या अलकानगरीमध्ये जायचे आहे. तिच्यामधले महाल, वाडे, बाहेरच्या उद्यानात असलेल्या शंभूशीर्षांवरील चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत.

मराठी काव्यानुवाद- (वृत्त-मंदाक्रान्ता) -
१). संतप्तांचा अससि जलदा आसरा तूं, निरोप
कांतेला दे, विरह घडवी आमुचा स्वामि-कोप
यक्षेशाचें नगर अलका तेथ जा, सौध जेथ
बाह्योद्यानीं वसत हर तच्‍चंद्रिका द्योतवीत।।
(चिंतामणराव देशमुख)

२). तप्तांची तू कणव जलदा! प्रीती संदेश देई
स्वामीक्रोधें सखि विलग मी पोळतो येथ पाही
यक्षेशाच्या नगर अलके जा जिथें हर्म्यकेन्द्रे
बाह्य़ोद्यानी हर उजळूनी क्षालितो भालचंद्रे।।
(बा.भ. बोरकर)

३) संतप्तांना निरविशी xx क्षेम सांगे प्रियेस
दूरप्रान्ती विरहि पडलो क्रुद्ध होता धनेश
यक्षेशाचि नगरी अलका गांठली पाहिजेस
पाही तेथे धवलित उमानाथ चंद्रे निवास।।
(पंडित ग.नि. कात्रे)

४). निवारा तू जलद व्यथितां ने निरोप प्रियाते
स्वामीशापे सखिविरह मी साहतो फार कष्टे
जायाचे तूं नगरि अलका धाम यक्षेश्वरांचे
बाह्योद्यानी धवलि इमले चंद्रमाथी शिवाचे।।
(अ.ज. विद्वांस)

५) बाह्योद्यानी शिव-शशिकरें दीप्त ते हर्म्य जेथे
यक्षेशाची वसति अलका, जायचे जाण तेथे
तप्तां देशी उपशम तसा तू मदीयें निरोपे
जा मत्कान्तेप्रति विघटनें दूर मी स्वामिकोपे।।
(द. वें. केतकर)

६). शांता शेळके यांच्या (समश्लोकी नसलेल्या अनुवादाचा नमुना -
मूळ श्लोक -
यक्ष मेघाला म्हणतो –

गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं
रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः ।
सौदामन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोर्वीः
तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विक्लवास्ताः ।। ... मेघदूत.पूर्वमेघ.३७

अर्थ :- हे मेघा, रात्रीच्या वेळी अतिशय गडद असा काळोख पसरल्यामुळे शहरातील राजमार्ग दिसेनासे झाले असतील. अशावेळी आपल्या प्रियकरांच्या भेटीसाठी निघालेल्या कामोत्सुक स्त्रियांची पावलें अंधारात अडखळतील. तेव्हा मेघा, तूंच सोन्याच्या निकषावरील रेषेप्रमाणे चमचमणार्‍या तेजस्वी विद्युल्लतेच्या मदतीनें त्या स्त्रियांना मार्ग दाखव. मात्र त्या विलासिनी ललना भित्र्या आहेत हें लक्षात असूं दे, उगाच पाऊस पाडून आणि गर्जना करून त्यांना घाबरवूं नकोस.

शांता शेळके यांनी केलेला या श्लोकाचा अनुवाद –

प्रिय भेटीस्तव अभिसारोत्सुक रमणी जेव्हां निघतील रात्रीं
राजपथावर अडेल पाऊल निबिड तिमिर तो भरतां नेत्रीं
उजळ तयांची वाट विजेने कांचनरेषा जशि निकषावर
वर्षुन गर्जुन भिववूं नको पण, विलासिनी त्या जात्या कातर

७). याच श्लोकाचा रा.प. सबनीसांचा (समश्लोकी नसलेला) अनुवाद -

तेथें रात्रीं रमणगृहासी जातांना युवतींची
घनांधकारें दृष्टी कुंठित होतांच राजमार्गीं
वाट विजेने दावी, निकषीं सुवर्णरेखेसम जी;
करूं नको जलवृष्टि-गर्जना; सहजभीरु त्या पाहीं

संदर्भ

  1. ^ संपादक: प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांचे संपादकीय निवेदन (महाकवि श्रीकालिदासविरचित 'मेघदूत' (१९३५) भाषान्तरकार :रामचंद्र गणेश पाटील)

बाह्य दुवे

  • शोभना आगाशे. http://unmesh38.blogspot.in/2011/08/blog-post_07.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  • चित्रकार नाना जोशी. (इंग्रजी भाषेत) http://www.joshiartist.in/kalidas-meghaduta/. Missing or empty |title= (सहाय्य)