कारगिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कारगील या पानावरून पुनर्निर्देशित)
कारगील
ആലപ്പുഴ
भारतामधील शहर


कारगील is located in जम्मू आणि काश्मीर
कारगील
कारगील
कारगीलचे जम्मू आणि काश्मीरमधील स्थान
कारगील is located in भारत
कारगील
कारगील
कारगीलचे भारतमधील स्थान

गुणक: 34°33′N 76°8′E / 34.550°N 76.133°E / 34.550; 76.133

देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
जिल्हा कारगिल
समुद्रसपाटीपासुन उंची ८,७८० फूट (२,६८० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,४३,३८८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे.

श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले. हे युद्ध एकूण ६० दिवस चालले. युद्धात ३०,००० भारतीय सैनिकांनी लढाई केली. ५५७ सैनिक मृत्युमुखी पडले, १३६३ जखमी झाले.

कारगील युद्धात भारताच्या बोफोर्ससहित ३०० तोफांचा वापर झाला. अडीच लाख तोफगोळे, बॉंब आणि ऱाॅकेट्स डागले. रोज ३०० तोफांमधून ५००० गोळे, माॅर्टर बॉंब आणि राॅकेट्स डागले जात होते. शत्रूचे ८०% सैनिक मारले गेले. एकट्या टायगर हिलवर ताबा मिळविण्यासाठी ९,००० तोफगोळ्यांचा मारा झाला. मीडियम रेंजच्या ज्या बोफोर्सच्या तोफांचे आयुष्य ४० वर्षे असल्याचे सांगितले जात होते, त्या तोफांपैकी १८ तोफा २५ दिवसात निकामी झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात एकाचवेळी एवढे फायरिंग झाले.

लढाईआधीच्या पहिल्या तीन आठवड्याच्या अभ्यासाकरिता भारतीय हवाई सेनेच्या ३०० विमानांनी ६,५०० उड्डाणे केली. प्रत्यक्ष युद्धात मिग-२१, मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० ही विमाने आणि एमआय-१७ हे हेलिकाॅप्टर यांचा सहभाग होता. एकूण विमानांमध्ये १२०० लढाऊ विमाने होती. सर्वात जास्त काम वेस्टर्न कमांडच्या विमानांनी केले. त्यांनी ६,५०० टन दारूगोळा, पाणी आणि अन्य मालाची वाहतूक केली.

कॅप्टन बत्राने ७ जुलै १९९९ रोजी कारगीलजवळचे जे शिखर काबीज केले त्याला हल्ली बत्रा टाॅप म्हणतात.

कारगील युद्धाची दिनदर्शिका[संपादन]

  • ३ मे १९९९ - एका गुरे चरणाऱ्या धनगराने (ताशी नामग्यालने) कारगीलमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसल्याची बातमी सैन्याला कळवली.
  • ५ ते १५ मे - भारतीय सैन्याने सर्वेक्षण केले. ते करणाऱ्यांपैकी कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाला.
  • २५ मे - हवाई दलाला हल्ला करण्याचा आदेश. २६ मे रोजी हल्ले सुरू.
  • १३ जून - सैन्याने तोलोलिंग शिखर काबीज केले. हे श्रीनगर-लेह मार्गावरचे महत्त्वाचे ठिकाण आहे.
  • १५ जून - पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेत पोहोचले, त्यांना राष्ट्रपती बिल क्लिंटनने पाकिस्तानी सैनिकांना कारगीलमधून मागे हटवण्यास सांगितले.
  • २९ जून - भारतीय सैन्याने टायगर हिलजवळच्या दोन चौक्या जिंकल्या.
  • ४ जुलै - टायगर हिलवर भारतीय सैन्याचा ताबा. इथपासून भारतीय सैन्याच्या विजयाची सुरुवात झाली.
  • १४ जुलै - भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' यशस्वी झाल्याची घोषणा केली.
  • २६ जुलै १९९९ - पाकिस्तानने पराभव मान्य केला.

कारगील युद्धानंतर[संपादन]

  • हिवाळ्यात कारगील आणि आसपासच्या प्रदेशातील चौक्यांतून आपआपले सैन्य मागे घेण्याचा उभयमान्य रिवाज होता, तो पाकिस्तानने मोडला. त्यामुळे पुन्हा कारगीलसारखे युद्ध होऊ नये म्हणून तेथे हल्ली हिवाळ्यातही भारतीय सैन्य तैनात असते. भूभागाच्या सतत निरीक्षणासाठी टेहळणी पथकांमध्ये दहा पटीने वाढ करण्यात आली..
  • इंटेलिजन्ट डिफेन्स स्टाफ व डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी यांची निर्मिती झाली. ट्राय सर्व्हिस कमांड आणि अणु कमांड हे नव्याने स्थापन झाले. शिवाय स्पेस सायबर आणि स्पेशल डिव्हिजन्स तयार केल्या. .
  • लेहमध्ये पहिल्या एव्हिएशन ब्रिगेडची स्थापना झाली. लडाखसाठी १४-कोअर ह्या पायदळाच्या स्पेशल विंभागाची निर्मिती.
  • हेलिकाॅप्टर तुकडीमध्ये सुधारणा.
  • विमाने उतरण्यासाठी आधुनिक हवाई क्षेत्रे उभारली.
  • न्योमा, फुकचे आणी दौलतबाग ओल्डी येथील धावपट्टया सक्रिय केल्या.
  • हवाई संरक्षण सेवेचे आधुनिकीकरण केले. वगैरे.

कारगील युद्ध स्मारक[संपादन]

कारगील युद्ध स्मारक हे भारतीय सैन्यदलाने द्रास शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर टायगर हिलच्या दिशेने उभारलेले स्मारक आहे. हे तोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी आहे. हे स्मारक श्रीनगर-लेह मार्गावर (`राष्ट्रीय महामार्ग क्र. १ डी'वर)आहे. स्मारकातील भिंतीवर कारगील युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांची आणि सैन्याधिकाऱ्यांची नावे कोरली आहेत. दरवर्षी या स्मारकात २६ जुलै हा दिवस कारगील हुतात्म्यांचा स्मरणदिवस म्हणून पाळला जातो.

कारगीलचे पर्यटन[संपादन]

कारगीलला पर्यटन स्थळाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. जेथे पाकिस्तानने बॉंंब फोडले होते तेथे आज एक कारगिल हाईट्स नावाचे हाॅटेल आहे. हाॅटेलात एक जुना बंकर ग्राहकांच्या विलोकनार्थ शाबूत ठेवला आहे. (असे बंकर पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीनंतर लडाखच्या प्रत्येक घरात बनले होते.) लोकांनी मागणी केल्यावरून 'लडाख हिल डेव्हलपमेन्ट काऊन्सिल' अस्तित्वात आले. त्यामुळे आता कारगीलमध्ये ४०हून अधिक हाॅटेले झाली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या घरांतही राहण्याची सोय होते. कारगीलला सन २०१६ या वर्षात ४२ हजार, २०१७मध्ये ६७ हजार तर २०१८ या एकाच वर्षात एक लाख सात हजार पर्यटकांनी भेट दिली.

कारगील युद्धाच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त[संपादन]

२६ जुलै २०१९ या दिवशी कारगील युद्धाला वीस वर्षे झाली. त्याच्या एक दिवस आधी जम्मू ॲन्ड कश्मिर रायफल्सच्या १३व्या बटालियनची एक बाईक रॅली उत्तराखंडातील दर्रापासून सुमारे १८५० किलोमीटरचा प्रवास करून २१ दिवसांनी लडाखमधील द्रासला पोचली. शेफ संजीव कपूर यांनी सैनिकांसाठी खास तिरंगी खीर बनवली होती. सर्व सैनिकांनी व अधिकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र भोजन केले. जवानांच्या हौतात्म्यावर भारतीय सेनेने ८.२४ मिनिटांची एक शाॅर्ट फिल्म जारी केली. त्याअगोदर कारगिल ट्रिबूट गीत गायले गेले व वाजवण्यात आले. गीताचे बोल होते, 'वीर जवानों, तुम्हें न भूलेगा तुम्हारा हिंदुस्तान!'

कारगीलविषयक पुस्तके[संपादन]

  • अनटोल्ड स्टोरीज ऑफ द वाॅर (इंग्रजी, लेखिका कारगीलच्या युद्धात सहभागी असलेल्या कॅप्टन मनोज रावत यांच्या पत्नी - रचना बिष्ट रावत)
  • एलओसी कारगिल (हिंदी चित्रपट, दिग्दर्शक जे.पी. दत्ता) (२००३)
  • कारगिल (भोजपुरी चित्रपट)
  • कारगिल (हेमन कर्णिक)
  • कारगिल आणि भारताची संरक्षणसिद्धता (पन्नालाल सुराणा)
  • कारगिल काय घडले कसे जिंकले (मिलिंद वेर्लेकर)
  • कारगिल विजय (नाटक, रमेश रोहोकले )
  • कारगिलचे परमवीर (कॅप्टन राजा लिमये)
  • कारगिलच्या युद्धकथा (बालसाहित्य, लेखक - दत्ता टोळ)
  • कारगिल विजय दिवस (भारतीय सैन्यदलाने बनवलेला लघुचित्रपट) (२६ जुलै २०१९ रोजी प्रकाशित झाला).
  • कारगील : अनपेक्षित धक्का ते विजय (अनुवादित, [[प्रशांत तळणीकर[[; मूळ इंग्रजी, Kargil : From Surprise to Victory - by General Ved Prakash Mullic)
  • कारगिल के परमवीर कॅप्टन विक्रम बत्रा (हिंदी, जी.एल. बत्रा)
  • काश्मीर से कारगिल तक (हिंदी, शुभंवदा पाण्डेय)
  • डोमेल ते कारगील (शशिकांत पित्रे)
  • द शेरशाह ऑफ कारगिल"- कॅप्टन विक्रम बत्रा यांचे चरित्र (हिंदी)

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत