चार्वाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


चार्वाक हे एक प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन होते. चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक हे नाव चारु (गोड) आणि वाक् (वाणी) या शब्दांच्या संधीपासून तयार झाले आहे असे मानले जाते.

चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. चार्वाक ही एक ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नास्तिक मताची प्रवर्तक असलेली, कोणी चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक/ ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतिप्रणीत विचार) असे आहे. परंपरा ..शंकर..पुरंदर.. बृहस्पती.. अशी धरली जाई. कौटिलीय अर्थशास्त्रात लोकायत हे आन्वीक्षिकी म्हणजे तर्कविद्येचा भाग असल्याचे म्हटले आहे. पण या नास्तिक मताचा प्रवर्तक म्हणून, चार्वाक नावाची कोणी व्यक्ती खरोखरच होऊन गेली, याला इतिहासात पुरावा नाही.[१][२]

चार्वाक ही व्यक्ती काल्पनिक होती, एकच होती का त्या विशिष्ट जीवनवादी तत्त्वज्ञानाच्या पुरस्कर्त्यांकरिता वापरलेली उपाधी होती, या बाबत तज्ज्ञांत वेगवेगळी मते आहेत. असे असले तरी हे चार्वाक जडवादी व भौतिकवादी अशा लोकायत नावाच्या अवैदिक तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते या बाबत दुमत नाही. तत्कालीन इतर धर्मीय तत्त्वचिंतकांनी त्यांच्या या अनीश्वरवादी विरोधकांवर उपभोगवादी असल्याचा शिक्का मारून त्यांना टीकेचे लक्ष्य बनवले. महाभारतात चार्वाक नावाच्या कौरवांच्या बाजूने असलेल्या एका व्यक्तीचा उल्लेख आढळतो, पण तिथे लोकायत तत्त्वज्ञानाची कोणतीही चर्चा किंवा त्या व्यक्तिरेखेचा कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाशी संबध असल्याची नोंद आढळून येत नाही. काही काळाने चार्वाकाचे दोन प्रकारचे अनुयायी बनले. त्यातील एका बाजूचे अनुयायी आस्तिक विचाराचे समर्थन करत होते.

तत्त्वज्ञान[संपादन]

ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत. अक्ष म्हणजे इन्द्रिय; त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे जे इंद्रियांना अनुभवता येते ते. "शब्द" आणि "अनुमान" याला मर्यादा आहेत. यामुळे आत्मा, ईश्वर आणि स्वर्ग या गोष्टींना या तत्त्वज्ञानात स्थान नाही. चार्वाक मताप्रमाणाे, जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्वात आहे असे समजले जाते. चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते.

आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. निर्माण झालेल्या ध्वनीमुळे आधी शांतता होती असे वाटते; शांतता असे काही नसते.[३]

चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणती आहे असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्‌!‘ हा त्याचा मुख्य सिद्धान्त आहे. हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात आणि आकार धारण करतात आणि हे विश्व साकारते. ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते. अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की, देह किंवा आकार नष्ट होतात, चैतन्यही नाश पावते. हाच मृत्यू. चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही. तो देहात येतो, देहातून जातो, ही कल्पना वेडगळपणाची आहे, असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते. या मताला आधुनिक विज्ञानाने पुष्टी दिली नाही. चैतन्य हे जड भौतिक पदार्थांपासून तयार होते हे आधुनिक विज्ञानाने अजून सिद्ध केलेले नाही.

या दर्शनात अर्थ आणि काम हेच पुरुषार्थ म्हटले आहेत. धर्म आणि मोक्ष या संकल्पना नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. पण असा हा चार्वाकवादातल्या ’ऋणं कृत्वा घृतं पिबेत्‌, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः’.. या वाक्यामुळे काहीसे हेटाळले गेले.

चार्वाक आणि त्याचे तत्त्वज्ञान यांवरील पुस्तके[संपादन]

  • आस्तिकशिरोमणी चार्वाक (लेखक - डाॅ. आ.ह. साळुंखे)
  • चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान (लेखक - प्रा. सदाशिव आठवले, प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, पहिली आवृत्ती १९५८, दुसरी आवृत्ती १९८०)
  • चार्वाक (लेखक - विद्याधर पुंडलिक)
  • बौद्ध धर्म दर्शन एवं चार्वाक दर्शन (लेखक - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर)
कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।
एतैरेव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि ।।

शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.

पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे. म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. लोकायत तत्त्वज्ञानानुसार महाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज,वायू ही चार तत्त्वे; यांच्या संयोगांस शरीर, इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते. चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष. प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही. त्यामुळे परलोक अस्तित्वात नाही. अर्थ व काम हेच पुरुषार्थ आहेत. वेदवाङ्मय हा धूर्तांचा प्रलाप आहे.

आत्मा नाही, त्यामुळे अर्थात पुनर्जन्म नाही. श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे म्हणणे. परलोक मानत नसल्याने, कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही. तरी ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो, हे त्यांचे मत आहे.

प्रत्यक्ष या एकाच प्रमाणाद्वारे परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिद्धान्त चार्वाकांनी मांडला. ज्ञानेंद्रियांच्या आधारे होणारे ज्ञान हे मुख्य प्रत्यक्ष प्रमाण. निसर्गातील गोष्टींचा परस्परांशी संबंध असतो. जसे धूर आणि अग्नी, पाऊस आणि मृद्‌गंध. अशा रितीने एकमेकांशी संबंधित गोष्टींचे ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणानुसार झाले नाही तरी अनुमानाने ओळखता येते, हे अनुमानप्रमाण. ज्याला पदार्थाचे सत्य ज्ञान झाले आहे अशा खरे बोलणाऱ्या माणसाने पाहिलेले व सांगितलेले ज्ञान हे शब्दप्रमाण. अशी चार्वाकांनी या तीन प्रमाणांची मांडणी केली होती.

इतर ज्ञानप्रमाणांच्या मर्यादा विशद करताना हे दर्शन म्हणते- शब्द हे प्रमाण नव्हे. कारण, हे शब्द कुणीतरी उच्चारलेले असतात. त्यांचे नंतर संकलन होते. उच्चारणाऱ्यांची पात्रता काय, हा वादग्रस्त विषय होय. अपौरुषेय वेदांतले शब्द प्रमाण मानले, तर हाती काय येते ? जर्भरी, तुर्भरी असे निरर्थक शब्द वेदांमध्ये आढळतात. शिवाय स्वयंबहिणीने आपल्या भावाला कामपूर्तीसाठी गळ घातली, अशा अर्थाचे मंत्र वेदांमध्ये आहेत, असे हे शब्द प्रमाण धरायचे, हे वेडेपणाचे लक्षण की पांडित्याचे ? म्हणून वेदप्रामाण्य कुचकामाचे ठरते. अनुमान हेही तसेच. कशाचा तरी अनुभव घेऊन कुणीतरी काही अंदाज बांधतो- धूर असेल तेथे विस्तव असतोच, हा स्वयंपाकगृहातील अनुभव घेऊन, डोंगरावर धूर आहे त्याअर्थी तेथे आग आहे, असा अंदाज करता येईल. पण याला कित्येक मर्यादा पडतात. प्रत्येक व्यक्तिगणिक अनुमान वेगळे असू शकते. प्रत्येक प्रसंगात ते उपयुक्त ठरेलच असे नाही, म्हणून अनुमान प्रमाण या दर्शनाने अंशतः बाद ठरविले आहे.[२]

तर्क व प्रमाणांच्या आधारे धर्मशास्त्रांची कठोर चिकित्सा चार्वाकांनी केली. लौकिक अनुमान व अलौकिक अनुमान असे अनुमानाचे दोन भाग करून अलौकिक अनुमान चार्वाकांनी नाकारले आहे. लौकिक अनुमानाचेही व्यावहारिक व तात्त्विक असे दोन भाग करून तात्त्विक अनुमानाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.

देहाहून वेगळा असा आत्मा नसतो. पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, ईश्वर, मोक्ष इत्यादी अलौकिक गोष्टींचे अनुमान त्यानी नाकारले आहे. वरील गोष्टीं नाकारल्यामुळे धर्मशास्त्रांनी उभारलेला अलौकिकाचा सारा पसाराच अर्थहीन होतो.

अनुमानामुळेही पूर्ण सत्य कळत नाही. अनुमानाने मिळणारे ज्ञान हे व्यवहारोपयोगी असते, ते पूर्ण सत्याचा बोध करून देत नाही. त्यामुळे अनुमानाच्याही मर्यादा ओळखल्या पाहिजेत. ऋषी, मुनी, धर्मसंस्थापक, प्रेषित इत्यादींनी केलेली अनुमाने ही पूर्ण सत्य आहेत असे मानल्यामुळे आपले खऱ्या सत्याचे ज्ञान अपुरेच राहते. धर्मशास्त्रे सर्वश्रेष्ठ व स्वयंभू मानल्यामुळे ती, खोटेपणा आत्मविसंगती व पुनरुक्ती या दोषांनी काळवंडली आहेत, असे चार्वाक म्हणतात.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी मोक्ष हा परमपुरुषार्थ सर्वश्रेष्ठ मानला जातो. जन्ममरणाच्या फेऱ्यांतून आणि दुःखातून सुटका असे मोक्षाचे वर्णन केले जाते. चार्वाकांनी हा मोक्ष नाकारून ‘पारतंत्र्य म्हणजे बंध आणि स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष’ ही संकल्पना मांडली.

चार्वाक अर्थ आणि काम असे दोनच पुरुषार्थ मानीत होते. पण धर्म नाकारताना पारलौकिकाचे फळ देणारे साधन म्हणून तो नाकारला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शिस्त आणि व्यवस्था हे महत्त्वाचे आहेतच पण त्यासाठी समाजाचे नियमन करणारी दंडनीती चार्वाकांनी ग्राह्य मानली आहे. धर्म- परलोकात सुख देणारा, पुण्यकृत्य- परलोकात सुख देणारे, पाप- परलोकात दुःख देणारे ही धर्माची संकल्पना चार्वाकांनी नाकारली. पण त्यांनी मानवी मूल्ये नाकारली नाहीत.

य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील अपरिमित हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतीचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. ऐतिहासिकदृष्ट्या येणारी वंशशुद्धी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टीका केली. वंशशुद्धी ही वस्तुस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानतात.

चार्वाकांनी ऋणाविषयी बेजबाबदारपणा मान्य केला नाही. समाजाला नियंत्रित करण्यासाठी दंडनीती नावाच्या स्वतंत्र विद्येचा पुरस्कार त्यांनी केला. चांगली कृत्ये, न्याय प्रशासन व कल्याणकारी शासन यांचा त्यानी आग्रह धरला होता.

यज्ञाच्या अग्नीत तूप जाळून अलौकिकाच्या अभिलाषा करण्यापेक्षा ते तूप पिऊन शरीर व मन धष्टपुष्ट व समर्थ करा असा लौकिक जीवनाबाबतचा सम्यक अर्थ त्यांनी सांगितला. प्रस्थापित हितसंबंधांवर आधारलेला धर्म नाकारून विधायक मार्ग दाखवून देण्याचे कार्य चार्वाकांनी केले. ऋणाला भिण्याचे कारण नाही आणि तूप पिण्यातही काही पाप नाही. संकटांनी खचून-पिचून जाऊ नका, कर्तबगारीने संकटांवर मात करा व स्वतःच्या कष्टाचा आस्वाद स्वतःच घ्या हा या तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र सर्वांनाच सारखा आहे. [४]

वेदांच्या परंपरेतल्या, यज्ञयाग, पूजाअर्चा, अग्निहोत्र, श्राद्ध, स्वर्ग-नरक, कर्म- कर्मफळ, पूर्वजन्म- पुनर्जन्म, मोक्ष या सर्व कल्पना व कर्मकांड ही लोकांना लुबाडण्यासाठी, बनेल हितसंबंधीयांनी निर्माण केलेले भ्रमजाल आहे. पातिव्रत्य हे मूल्य नसून स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे, जुलमी पुरुषांचे एक हत्यार आहे. वर्णाश्रम व जातिभेद हे अशास्त्रीय आहेत. या विचारांची विधायक बाजू अशी- स्वतःची बुद्धी हेच खरे प्रमाण आहे. हे ऐहिक जीवनच खरे आहे. शेती, व्यापार, गोपालन, प्रशासन आणि उपयुक्त शास्त्रांचे अध्यापन अशा साधनांनी काम करून द्रव्य मिळवावे आणि सर्व सुखोपभोग मिळवून नीतीने जगावे. स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे.

इतर धर्मीय तत्त्वज्ञानांची टीका[संपादन]

लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद, परलोकदेव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद. सर्व धर्म चेतनावादावर अवलंबून आहेत व लोकायतने त्यावर तोफ डागली म्हणून सर्व धर्मीयांनी चार्वाक मतावर कठोर टीकाच केली वेदप्रामाण्य नाकारल्यामुळे वैदिक धर्माने त्यांना नास्तिक ठरवले व तर ऐहिक सुखांचा आनंद घेणे सुचविण्यामुळे जैन, बुद्ध इत्यादी धर्माच्या तत्त्ववेत्त्यांनीही त्यांची कठोर निंदा केली.

मुळात, नवव्या शतकातील न्यासमंजिरीत एक वचन असे आहे :

यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्तिमृत्युरगोचर:।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

" यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्ति मृत्युरगोचर:" यात कोठेही भोगवाद नाही.

तत्कालीन टीकाकारांनी विरोधकावर टीका करावयाची म्हणून त्याचा विपर्यास करून "यावज्जीवं सुखं जीवेत्‌ ऋणं कृत्वा धृतं पिबेत्" हे वचन विद्यारण्य़स्वामींनी सोळाव्या शतकातील सर्वदर्शन संग्रहात भोगवादी लक्षण म्हणून दिले.

यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

व्यक्ती एक का अनेक[संपादन]

चार्वाक म्हणजे चारू अर्थात गोड, मनाला रुचेल तेच आणि वाक्‌ म्हणजे सांगणारा असा अर्थ सांगता येतो.

चार्वाक ही काही एकच व्यक्ती होती का एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या जीवनवादी तत्त्वज्ञानाचे नाव, आणि अशा तत्त्वज्ञाची बाजू घेणाऱ्यांना चार्वाक म्हणून संबोधले जात असे याबाबत तज्ज्ञांत एकमत नाही. नास्तिक तत्त्वज्ञान मानणारे ते सर्व लोकायतिक किंवा चार्वाक म्हणून ओळखले जात. यात ब्राह्मण आहेत, राक्षस आहेत, दैत्य आहेत, ऋषिमुनी आहेत, इतकेच काय पण कधी कधी देवही आहेत. थोडक्यात नास्तिकांची ही उपाधी आहे.

लोकायत या दर्शनाचा महत्त्वपूर्ण प्रणेता असलेल्या चार्वाकाने वेदप्रामाण्य, ईश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्माचा सिद्धान्त, यज्ञादी कर्मकांडाची उपयुक्तता हे सर्व एकाच वेळी नाकारले. केवळ 'प्रत्यक्ष' प्रमाण मानले. चार्वाक हा प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी होता.

लोकायत म्हणजे इहलोकविषयक प्रणाली. लोक म्हणजे इहलोक आणि आयत म्हणजे आधार. दुसराही एक अर्थ आहे. लोक म्हणजे सामान्य जन. या समाजाला जे व्यवहारात दिसते ते लोकायतिक, प्रत्यक्षवाद लोकायतिकाचा आधार होता तर प्रामाण्यवाद आस्तिकांचा पाया होता. लोकायतिकालाच पुढे चार्वाकदर्शन असे नाव मिळाले. (अश्रद्ध, पाखंडी, वितंडा ही आणखी काही नावे.)

चार्वी[संपादन]

१.३.४७ या पाणिनीय सूत्रावरील ‘वदते चार्वी लोकायते’ या काशिकावृत्तीनुसार व चार्वी ही अनार्य वेस्सवना (कुबेराची पत्नी) होती.

देवांचा गुरू बृहस्पती[संपादन]

बृहस्पतीचे जे चरित्र काही प्राचीन ग्रंथात विस्ताराने वर्णन केल्याचे आढळते, त्यावरून बृहस्पती हा कट्टर ईश्वरवादी, मोक्षवादी होता असे सिद्ध होते.[२]

तरीपण देवांचा गुरू बृहस्पती हा पहिला चार्वाक असल्याचे मानले जाते. वेगवेगळ्या कालखंडात अनेक ग्रंथांतून याचा उल्लेख आहे. मैत्रायणी उपनिषदामध्ये एक कथा आहे. असुरांचा गुरू शुक्र याला देवेन्द्राने कपटाने आश्रमातून दूर नेले आणि हा बृहस्पती शुक्र नावाने तिथे असुरांचा गुरू बनला. तिथे दहा वर्षे राहून असुर विद्यार्थ्यांना विपरीत तत्त्वे शिकवली आणि या तत्त्वांच्या आचरणाने असुरांचा नाश ओढवला. हे तत्त्वज्ञान पुढे तर्कशुद्ध रितीने मांडले गेले आणि बार्हस्पत्य किंवा लोकायत दर्शन म्हणून ओळखले जाऊ लागले असा प्रवाद आहे

अजित केशकंबली[संपादन]

अजित केशकंबली हाही एक प्रख्यात चार्वाक म्हणून ओळखला जातो. अजित हे त्याचे खरे नाव, पण मानवी केसांचे कांबळे अंगावर घेऊन फिरायचा म्हणून केशकंबली हे नाव त्याला मिळाले. हा बुद्धापेक्षा वडील होता आणि एक चांगला आचार्यही होता. त्याने लोकायत मताची फेरमांडणी करून आपला वेगळा पंथ निर्माण केला. अजित केशकंबलीच्या उच्छेदवादातूनच लोकायत अर्थशास्त्र निघाले, आणि त्याचा विकास कौटिल्यासारख्या आचार्यांनी केला . तसेच बौद्ध आणि जैन धर्माची निर्मितीवरही या विचारांचा प्रभाव होता असे काहींचे मत आहे.{{पान क्र. १२ व १५ : भगवान बुद्ध (उत्तरार्ध): प्रकरण सातवे :आत्मवाद - ले. श्री. धर्मानंद कोसंबी -नवभारत ग्रंथमाला (१७) - प्रकाशक : सुविचार प्रकाशन मंडळ लि. , नागपुर व पुणे - इ.स. १९४१ }} अजित आणि त्याच्या पाच नास्तिक सहकाऱ्यांनी बौद्धापूर्वीच ब्राह्मण धर्माविरुद्ध टीकेची झोड उठवली होती. पण पुढे बुद्धाचे प्रखर व्यक्तिमत्त्व, आर्जवी स्वभाव, वक्तृत्व आणि संघटनकौशल्य यापुढे अजित मागे पडला आणि विस्मृतीत गेला. मात्र बौद्ध आणि जैन वाङ्मयातून त्याची निंदा झालेली आहे.

चार्वाकवादाच्या इतिहासात अजित केशकंबली (Ajit Keshkambali अजित केशकम्बली) हा एक फार मोठा माणूस आहे. ह्याची ऐतिहासिकता वादातीत आहे. ह्याचे आणि ह्यांच्या मतांचे उल्लेख इ. स. पूर्वीच्या सहाव्या शतकापासूनच्या तर इ. स.च्या आठव्या शतकापर्यंतच्या साहित्यांत अनेक ठिकाणी आले आहेत. मात्र अजित केशकंबली संबंधीची सगळी माहिती बौद्ध आणि जैन वाङ्मयांतूनच मिळते. ब्राह्मणी वाङ्मयात हा आढळत नाही. जैन सूत्रांत ह्याची मते फारच विकृत स्वरूपात मांडली आहेत. अजितवाद्यांचे "मारा, झोडा, जाळा" असे संदेश आहेत असा जैन ग्रंथकारांचा अभिप्राय दिसतो. रॉकहिलने उद्धृत केलेल्या चिनी आणि तिबेटी माहितीत अजित केशकंबली आणि त्याच्या काळातील इतर नास्तिक ह्यांची मते उलटीसुलटी सांगून बराच गोंधळ केलेला आहे. ह्याचे नाव अजित. कांबळे अंगावर टाकून हा फिरायचा म्हणून केशकम्बल झाला. हे कांबळे म्हणे माणसाच्या केसांचे असे. हे दुर्गंधियुक्त कांबळे उन्हाळ्यात शरीर अधिक गरम करते आणि थंडीत अधिक गार पडते; आणि एकूण दुःखकारक होते म्हणून त्याज्य; त्याचप्रमाणे अजिताची मतेही टाकाऊ. (अजितो ही तस्स नामम्। केसकंबलं धारेतीति केसम्बलो। ... केसकम्बलो, भिक्खवे, सीतकाले सीतो, उन्हकाले उन्हो अप्पग्धोच दुःखसं फस्सोच दुब्बणोच दुग्गंधो चेति। - सुमंगलविलासिनी पृ. १४४) बुद्धाचा उदय झाला तेव्हा हा ख्यातनाम आचार्य होता. दीघनिकाय वगैरे मधील हकीगतींवरून हा एक भटक्या पंडित असून ह्याच्याभोवती कांबळी पांघरणाऱ्या शिष्यांचा घोळका असे, असे दिसते. (Barua - History of Pre-Buddhist Philosophy पृ. २८८) कांबळे ही अजित केशकम्बलीच्या साध्या राहणीची साक्ष आहे. त्याची तत्कालीन प्रसिद्धी लक्षात घेता आपल्या पंथाचे नेतृत्व तो करीत होता असे दिसते. मतप्रचारासाठी आणि संघटनेसाठी तो भटकत असावा. ए. के. वॉर्डर तर अजित केशकंबलीनेच लोकायतमताची सुव्यवस्थित मांडणी करून इ. स. पूर्व ५०० च्या सुमारास संघटित पंथ निर्माण केला असे मानतात. पालीसूत्रांत ह्याच्याबरोबरीने इतर पाच नास्तिक विचारवंतांचा उल्लेख येतो, परंतु त्यांची मते पाहता अजित केशकंबली हाच सर्वांत अधिक सूक्ष्म आणि तर्कशुद्ध विचार करणारा पंडित वाटतो. अजित केशकंबली कदाचित संगीताचा उपासकही असावा. (शांतरक्षिताच्या तत्त्वसंग्रहात ह्याला कंबलाश्वतर म्हटले आहे. आणि निःशङर्गदेवप्रणीत संगीतरत्नाकरामध्ये एक संगीतज्ञ कंबलाश्वतर येतो)

अजित पृथ्वी, आप, तेज, वायु ही चार भूते मानतो (पाच नाही). तो आत्मा मानीत नाही. पुनर्जन्म मानीत नाही. तो पुण्यपाप जाणीत नाही आणि त्याप्रमाणे मिळणारी फळेही तो ओळखीत नाही. अर्थातच वेदादि ग्रंथप्रणीत दानादि कर्मे आणि यज्ञादि विधी त्याला मंजूर नाहीत. चार्वाकीय भूतचैतन्याधिष्ठित जीवशास्त्र आणि इहलोकपर जीवनतत्त्वज्ञान अजिताच्या मनात अंतर्भूत आहे. सगळा चार्वाकवाद बुद्धकाळी सांगितला गेला आणि तो अजित केशकंबलीनेच सांगितला.

प्राचीन सूत्रांत नमूद झालेली अजिताची मते फारच थोडी आहेत. परंतु तेवढ्यावरूनही अजित केशकंबलीची शास्त्रशुद्ध विचारपद्धती आणि त्याची बुद्धिनिष्ठा ह्याची चांगली कल्पना येते. बुद्धाच्या पूर्वीच अजिताने ब्राह्मण धर्माविरुद्ध बंड पुकारले. त्याची चळवळ बुद्धापेक्षाही अधिक पायाशुद्ध आणि कदाचित अधिक प्रामाणिकही होती. पण त्याचे नाव लोपले. इतके की ब्राह्मणी वाङ्मयांत त्याचा मागमूसही लागत नाही. बौद्ध वाङ्मयांत मात्र त्याच्या निंदेची परंपरा आहे, कारण खुद्ध बुद्धाचाच मुळी तो प्रतिस्पर्धी. (संदर्भ - चार्वाक : इतिहास आणि तत्त्वज्ञान, प्रा. सदाशिव आठवले)

वाङ्मयातून उल्लेख[संपादन]

याचा एक परिणाम म्हणजे चार्वाक मताचा एकही अधिकृत ग्रंथ वा त्यावरील टीका आतापर्यंत मिळत नव्हत्या. बृहस्पतीसूत्र व जयराशीभट्टाचा तत्त्वोपप्लवसिंह हे अलीकडे उपलब्ध झालेले ग्रंथ एवढेच अपवाद. लोकायत मताचा शोध टीकाकारांनी केलेल्या टीकेवरून घ्यावा लागतो.

यती "कृष्णमिश्र" यांनी लिहिलेल्या प्रबोधचंद्रोदय या नाटकात अगदी सोप्या पद्धतीने या दर्शनाचे विवेचन केले आहे.[५] प्राचीन संस्कृत, पाली आणि प्राकृत वाङ्मयातून अनेक पात्रांच्या तोंडी चार्वाक विचार घातलेले आढळतात. प्रल्हादाचा पुत्र विरोचनाचा छांदोग्योपनिषदात तसेच भागवत, नारद पुराण, गणेश पुराण वगैरेंमध्ये उल्लेख आहे. तो इहवादी, ऐहिक सुखे भोगणे हाच पुरुषार्थ असल्याचे मानणारा होता. त्याचा पुत्र बळी आणि नातु बाणासुर हेही चार्वाकवादी होते.

प्रदेशी (पालीमध्ये पायसि) हे बौद्ध आणि जैन ग्रंथांतील पात्र. मृत्यूनंतर स्वर्गात किंवा नरकात गेलात की तिकडून दूतांकरवी तेथील माहिती कळवा असे त्याने पापी तसेच पुण्यवान लोकांना सांगितले होते, पण तिकडून एकही दूत आला नाही म्हणजे स्वर्गही नाही आणि नरकही नाही असे त्याने अनुमान काढले. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांना रांजणात बंद करून ठेवले. ते मरताच रांजण उघडून पाहिले. पण त्यातून प्राण बाहेर पडताना ‘दिसला’ नाही. तसेच गुन्हेगारांचे मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर वजन केले पण वजन कमी न होता त्यात वाढ झाली म्हणजे जीव किंवा आत्मा वेगळा नसतो असे त्याने जाहीर केले. रामायणाच्या अयोध्याकांडात रामाला वनवासात जाण्यापासून परावृत्त करू पाहणारा जाबाली; महाभारताच्या शांतिपर्वामध्ये प्राण किंवा जीव पंचमहाभूतांपासून वेगळे नसल्याचे सांगणारा भारद्वाज मुनी; सर्व माणसे ब्रह्मदेवानेच निर्माण केलेली असल्याने त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ क्रम लावण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन करणारा भृगुऋषी हे सर्व थोडेफार चार्वाकवादीच होते. चार्वाकांची ही यादी आणखी वाढू शकेल.

चार्वाकांची बरीच दर्शने लुप्त झालेली आहेत. आस्तिक दर्शनांतून त्यांचे बरेच उल्लेख आढळतात. हाच त्यांच्याबद्दलचा पुरावा. जयराशी भट्ट हा एक चार्वाक इ. स.च्या सातव्या-आठव्या शतकांत होऊन गेला. ‘तत्त्वोपप्लव सिंह’ हा त्याचा ग्रंथ. वैदिक, बौद्ध आणि जैन यांच्यावर त्याने सडकून टीका केलेली आहे. चार्वाकवाद्यांचा हा एकमेव प्राचीन ग्रंथ उपलब्ध असावा. चौदाव्या-पंधराव्या शतकांच्या सुमारास मध्वाचार्य, गुणरत्न या पंडितांचे ‘सर्व दर्शन संग्रह’, ‘षड्दर्शन संग्रह’ तयार झाले. या ग्रंथांतून निरनिराळ्या दर्शनांचे साररूपात संकलन करण्यात आले आहे. या ठिकाणी चार्वाकदर्शनाची जुन्या भारतीय सूत्र पद्धतीने अठ्ठावीस सूत्रांद्वारे ओळख करून दिलेली आहे.

सर्वदर्शनसंग्रहातील उद्धरणे[संपादन]

विकिक्वोट
विकिक्वोट
चार्वाक हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

माधवाचार्यांच्या चौदाव्या शतकातील "सर्वदर्शनसंग्रहा"मध्ये लोकायताविषयी पुढील उतारा आला आहे :

तदेतत्सर्वं बहस्पतिनाप्युक्तम्‌ -
तर हे सर्व बृहस्पतीनेही म्हटले आहे
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥१॥
स्वर्ग नाही, मोक्ष नाही, पारलौकिक असा आत्माही नाही, वर्ण, आश्रम आदींची कर्मकांडे फळ देणारी नाहीच नाहीत.
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌ ।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृनिर्मिता ॥२॥
अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड (साधूंची क्रिया), शरिराला राख फासणे - बुद्धी आणि पौरुष नसलेल्यांच्या उपजीविकेसाठी विधात्याने (या सर्व गोष्टी) निमाण केल्या आहेत.
पशुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥३॥
ज्योतिष्टोम यज्ञात मारलेले जनावर जर स्वर्गात जाते, तर यजमान स्वतःच्या पित्यालाच का मारत नाही?
मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम्‌ ।
निर्वाणस्य प्रदीपस्य स्नेहः प्रज्वलयेच्छिखाम्‌ ॥४॥
मेलेल्या जिवांची तृप्ती जर श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल, तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.
गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम्‌ ।
गेहस्थकृतश्राद्धेन पथि तृप्तिरवारिता ॥५॥
येथे प्रवासाला जाणाऱ्या जिवंत‍ लोकांसाठी शिदोरी बनवणे व्यर्थ म्हणावे - घरच्याघरी केलेल्या श्राद्धाने आयतीच रस्त्यात तृप्ती होईल.
स्वर्गस्थिता यदा तृप्तिं गच्छेयुस्तत्र दानतः ।
प्रासादस्योपरिस्थानामत्र कस्मान्न दीयते ॥६॥
दानामुळे स्वर्गात असलेल्यांची तिथल्या तिथे तृप्ती होत असेल, तर इमारतीत वरच्या भागात राहाणाऱ्यांसाठी अन्न येथे (खाली) अन्न का देत नाहीत?
यावज्जीवेत्सुखं जीवेदृणं कृत्वा घृतं पिबेत्‌ ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥७॥
जोपर्यंत जगावे, सुखाने जगावे, कर्ज घेऊन तूप प्यावे. राख झालेल्या देहाचे पुन्हा येणे कुठचे?
यदि गच्छेत्परं लोकं देहादेव विनिर्गतः ।
कस्माद्भूयो न चायाति बन्धुस्नेहसमाकुलः ॥८॥
देहच सोडून गेलेला जर परलोकात जात असेल, तर नातलगांच्या जिव्हाळ्यामुळे तो वारंवार परत का येत नाही?
ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहिस्त्विह ।
मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित्‌ ॥९॥
तर उपजीविकेसाठी ब्राह्मणांनी उपाय सांगून दिले आहेत, नाहीतर येथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापि अस्तित्वात नसती.
त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम्‌ ॥१०॥
वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत. जर्भरी, तुर्फरी, वगैरे (निरर्थक) बोल पंडितांकडून ऐकल्याचे आठवतच असेल.
अश्वस्यात्र ही शिश्नं तु पत्नीग्राह्यं प्रकीर्तितम्‌ ।
भण्डैस्तद्वत्परं चैव ग्राह्यजातं प्रकीर्तितम्‌ ।
मांसानां खादनं तद्वन्निशाचरसमीरितम्‌ ॥११॥
(अश्वमेध यज्ञात) पत्नीने घोड्याचे शिश्न घ्यावे हे माहीतच आहे. (आणखी) याहून वेगळ्या गोष्टी घ्याव्यात असे भंडांनी सांगितलेलेही प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे मांस खाण्याचे विधीही निशाचरांनी निर्माण केले आहेत.

[६]

लोकायत तत्त्वज्ञानाचा आधुनिक काळातील अभ्यास आणि विश्लेषण[संपादन]

अनेक पाश्चात्य तसेच भारतीय आणि महाराष्ट्रीय तत्त्ववेत्त्यांनी विविध उद्देशांनी चार्वाक आणि लोकायत तत्त्वज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. यांत आधुनिक बुद्धप्रामाण्यवादी, समतावादी आणि समाजवादी मंडळी आघाडीवर होती. देविप्रसाद (व त्यांचीच मते मराठीत लिहणारे) गाडगीळ, आठवले हे वामपंथी विद्वान. यांच्या लिखाणाचा उद्देश स्वच्छ होता व तो त्यांनी लपवून ठेवला असेही नाही.[५]

विंदा करंदीकरांच्या "अष्टदर्शन" या पुस्तकामध्ये त्यांनी भारतीय दर्शनांपैकी चार्वाक-दर्शनाला स्थान दिले आहे.

  • आ.ह. साळुंखे यांचे 'आस्तिकशिरोमणी चार्वाक'
  • लोकायत - स. रा. गाडगीळ - प्रकाशक लोकवाङ्मय गृह
  • लोकायत (इंग्रजी ) - देविप्रसाद चट्टोपाध्याय - मोतीलाला बनारसीदास (प्र.) -
  • सर्वदर्शनसंग्रह (सर्वधर्मसंग्रह नव्हे!) - माधवाचार्य - प्र. फोटोझिंको प्रेस पुणे, मध्यवर्ती इमारतीसमोर (शासकीय प्रकाशन)
  • चार्वाक - इतिहास आणि तत्त्वज्ञान - सदाशिव आठवले (प्राज्ञपाठशाळा - वाई)
  • वेध चार्वाकाचा - उदय कुमठेकर - अभय प्रकाशन नांदेड.अधोलेखन मजकूर
  • चार्वाकमंथन - संपादक: उदय कुमठेकर - परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग्, पुणे विद्यापीठ. (प्रस्तावना: मे. पुं रेगे)
  • चार्वाकवाद आणि अद्वैतवाद - डॉ. प्रदीप गोखले - टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रकाशन.
  • 'भारतीय जडवाद' हे .
  • मानवेन्द्रनाथ रॉय यांचे 'जडवाद' हे पुस्तक (बा.र. सुंठणकर यांनी अनुवाद केलेले) कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे प्रकाशित .
  • Studies on the Cārvāka/Lokāyata - Ramkrishna Bhattacharya - Anthem Press, Delhi [७]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-08-14. 2011-04-09 रोजी पाहिले.
  2. ^ a b c Google's cache of http://www.loksatta.com/daily/20060409/lm07.htm Archived 2016-03-13 at the Wayback Machine.. It is a snapshot of the page as it appeared on 17 Mar 2011 12:51:21 GMT.
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-07-06. 2011-04-09 रोजी पाहिले.
  4. ^ http://gipsy-prashant.blogspot.com/2009/12/blog-post_1696.html
  5. ^ a b http://mr.upakram.org/node/1993
  6. ^ स्रोत : "चार्वाकमंथन" परामर्श ग्रंथमाला, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, २००१.
  7. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2014-12-17. 2016-01-09 रोजी पाहिले.