सलीम मुल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सलीम सरदार मुल्ला हे एक बालसाहित्यकार आहेत. हे तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या गावाचे आहेत. घरी दखनी बोलली जायची. आई-वडील हिंदीचे शिक्षक. मराठीवरही त्यांचे तितकेच प्रेम. हिंदी,मराठी आणि दखनीच्या देवाणघेवाणीतून सलीम मुल्लांची भाषा लुभावणारी बनली. भाषेचा हा लहेजा त्यांना लहानपणीच वडलांकडून मिळाला. वडिलांच्या नोकरीची ठिकाणे कोल्हापूरच्या डोंगराळ परिसरातील, आणि नेहमी बदलणारी. अशा गावांमध्ये राहून माध्यमिक शाळेत शिकणारा सलीम निसर्गावर कविता, बालकथा लिहू लागला. निसर्ग वाचन करू लागला. किशोर वयात सलीम यांच्या हाती व्यंकटेश माडगूळकर, मारुती चित्तमपल्ली अशा निसर्गाशी एकरूप झालेल्या प्रथितयश लेखकांची पुस्तके पडली. माडगूळकरांचा निसर्गाकडे पाहण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन, चित्तमपल्लींचे थक्क करणारे निसर्गवाचन यामुळे सलीम यांचे निसर्गप्रेम आणखी दृढ होत गेले. अश्यावेळी वडिलांचे बालसाहित्यिक असलेले मित्र विठ्ठल कृष्णा सुतार यांनी सलीम मुल्ला यांना लिहिण्यासाठी प्रेरणा दिली.

सलीम मुल्ला यांनी २००२ साली ‘अवलिया’ हे ललित लेखनाचे पुस्तक लिहिले; चोखंदळ वाचकांनी त्याला दाद दिली.

पुढॆ सलीम यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या दळवीज आर्ट या संस्थेतून ‘इंटीरिअर डेकोरेटिव्ह डिझाईन’ शाखेची पदवी मिळवली. तिथेच सलीम शिक्षक म्हणून काम करू लागले. परंतु सुरुवातीपासून निसर्गाची आवड असल्याने त्यांनी वयाच्या ३३व्या वर्षी वन विभागात नोकरी मिळवली. निसर्गात भटकंती करताना आलेले वैशिष्टय़पूर्ण, कुतूहल वाढवणारे, नवलाईचे काहीसे चमत्कारिक अनुभव शब्दबद्ध करण्याचा त्यांना ध्यास लागला. आणि त्यांचे त्यांचे निसर्गाला कवेत घेणाऱ्या कविता, बालकथा, ललित लेख, वृत्तपत्रीय लेख असे विविधांगी लेखन सुरू झाले. स्वराज्य, बालविकास, रानवारा, आनंद या मासिकांतून त्यांनी लिखाण केले. तसंच लोकराज्य, तरुण भारत, सकाळ, पुढारी, मँचेस्टर मधूनही भरपूर लिखाण केले.

पत्रलेखनाचा छंद[संपादन]

मुल्ला शाळेत असतांना गो.नी. दांडेकर महागावाशेजारी असलेल्या सामनगड या ठिकाणी आले होते. लेखकाच्या भेटीसाठी शाळेची मुले घेऊन शिक्षक गोनीदांना भेटायला गेले. त्यात एक अपंग विद्यार्थी होता. तोही गडावर त्यांना भेटण्यासाठी आला होता. त्याचे त्यांना अप्रूप वाटले. गोनीदांनी त्याला पत्र पाठविले. त्यांचं पत्र वाचून सलीम यांनाही लेखकांना पत्रे लिहायची आवड निर्माण झाली.

एखाद्या लेखकाचे पुस्तक वाचले की सलीम त्यांना पत्र लिहायचा. आणि पत्राच्या उत्तराची वाट पाहत रहायचा. लेखकाच्या हस्ताक्षरातील पत्र सलीमला वेड लावून जायचे. पुढे हा त्याला छंदच जडला. पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट यासारख्या अनेक दिग्गज लेखकांच्या हस्ताक्षरातील हजारो पत्रांचा ठेवा त्यांच्या आजही संग्रही आहे.

सलीम मुल्ला यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अजबाईतून उतराई (बालकादंबरी)
  • अवलिया (ललित लेखसंग्रह)
  • ऋतुफेरा (ललित लेखसंग्रह)
  • जंगल खजिन्याचा शोध (बालकादंबरी)
  • पेणं आणि चिकोटी (बालकादंबरी)

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • सलीम मुल्ला यांना दिल्लीतील साहित्य अकादमीचा २०१९ सालचा 'युवा साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला आहे.