पद्मसिंह बाजीराव पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ.पद्मसिंह बाजीराव पाटील

कार्यकाळ
२००९ – २०१४

जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार
कार्यकाळ
२००२ – २००४

उर्जा व जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार
कार्यकाळ
१९९९ – २००२

विरोधी पक्ष उपनेता
कार्यकाळ
१९९५ – १९९९

गृह, ऊर्जा, पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास
कार्यकाळ
१९९४ – १९९५

ऊर्जा, पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास
कार्यकाळ
१९८९ – १९९४

उपसभापती, विधानसभा
कार्यकाळ
१९८६ – १९८८

उर्जा व उत्पादन शुल्क मंत्री
कार्यकाळ
१९८० – १९७८

विधानसभा आमदार
कार्यकाळ
१९७८ – २००९

जन्म १ जून १९४०
पत्नी स्व.डॉ.चंद्रकला पाटील
अपत्ये राणाजगजितसिंह पाटील, पृथ्वीराज पाटील (इंग्रजी सॉलिसिटर)
निवास धाराशिव
धर्म हिंदू

डॉ.पद्मसिंह बाजीराव पाटील. हे एक उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारणी असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार व माजी मंत्री आहेत.

दुष्काळी धाराशिव जिल्ह्यात सर्वात जास्त कोल्हापुरी बंधारे डॉ.पद्मसिंह पाटील यांनी बांधले. त्यातून जिल्ह्यातील बहुतांश जमीन ही सिंचनाखाली आणली. त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील हे देखील एक राजकारणी असून तुळजापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत.

पद्मसिंह पाटील यांनी भूषवलेली महत्वाची पदे[संपादन]

  • १९७५ ते १९७८ - धाराशिव जिल्हा परिषद सदस्य
  • १९७५ ते १९७८- सभापती, बांधकाम समिती, धाराशिव जिल्हा परिषद
  • १९७८ ते २००९ - विधानसभा आमदार
  • १९७८ ते १९८०- ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री
  • १९८६ ते १९८८- उपसभापती, विधानसभा
  • १९८९ ते १९९४ - ऊर्जा, पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास
  • १९९४ ते १९९५- गृह, ऊर्जा, पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास
  • १९९५ ते १९९९ - विरोधी पक्ष उपनेता
  • १९९९ ते २००२ - ऊर्जा व जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार
  • २००२ ते २००४ - जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार
  • २००९ - लोकसभा खासदार

गेल्या ४५ वर्षांपासून जिल्ह्यात पाटील घराण्याचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायत, विविध सोसायट्या यावर पाटील घराण्याचा दबदबा राहिलेला आहे. आज देखील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पॅनेलने विजय प्राप्त केलेले आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यांचे नातू श्री.मल्हार पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.

सामाजिक कार्य[संपादन]

प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या धाराशिव जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे सतत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असते. सातत्याने वाट्याला येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे इथला शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर १ वर्ष उशिराने जिल्हा स्वतंत्र झाला. एकत्रित जिल्हा असताना नेतृत्व लातूरकडे होते, त्यामुळे धाराशिवकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर चळवळीचे केंद्र, शेतकरी आंदोलनाची जन्मभूमी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम यात उल्लेखनीय कार्य केलेल्या धाराशिव जिल्ह्याचा नावलौकिक आता सर्वच क्षेत्रात निर्माण होत आहे. अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागील ४ दशकांपासून अनेक बदल होत आहेत. जिल्ह्यात एक ही मोठी नदी नसताना, भौगोलिक रचनेमुळे सातत्याने वाट्याला येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला डावलून मोठ्या परिश्रमाने जिल्ह्याचे रूप आकाराला आले आहे. त्यात डॉ.पद्मसिंह पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे.

डॉ.पद्मसिंह बाजीराव पाटील १९७८ साली पहिल्यांदा मंत्री झाले. जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच जगण्याचा मुख्य आधार असल्याने त्यांनी सुरुवातीला शेतीविषयक पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. १९८८ साली त्यांच्याकडे पाटबंधारे खात्याचा कारभार आला असता त्यांनी अल्प सिंचन सुविधा असल्याने जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांनी ज्यावेळी पदभार स्विकारला त्यावेळी जिल्ह्यात ५८ सिंचन प्रकल्प होते व जिल्ह्यातील केवळ ३२,३१५ एकर ओलिताखाली होती, त्यापैकी २००० हेक्टर वर फळबाग होती. १० वर्षे त्यांच्याकडे पाटबंधारे खाते होते. डॉक्टर साहेबांनी आपल्या पदाचा वापर आपल्या भागातील शेतकरी बांधवांना करून देण्यासाठी पाटबंधारे विभागाचा सर्वात जास्त निधी हा धाराशिव जिल्ह्यासाठी वापरला. अनेकदा मंत्रिमंडळ बैठकीत इतर मंत्री केवळ धाराशिव जिल्ह्यालाच पाटबंधारे खात्याचा सर्वात जास्त निधी खर्च केला जात असल्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त करत होते.

साहेबांनी केलेल्या प्रचंड कामामुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची संख्या ५८ वरून थेट १,२४८ वर गेली तर जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात ४% हुन २१ % पर्यंत लक्षणीय वाढ होऊ शकली. सिंचन क्षमतेत वाढ झाल्याने ३६,०९,४३० एकर जमीन ओलिताखाली आली व फळबागा २००० हेक्टर हुन ३२,००० हेक्टरवर गेल्या. चांगला पाऊस झाला की, मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते व शेतकऱ्यांना सर्व शेती पिकांतून १००० कोटींहून अधिक रक्कम मिळते. उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने दुष्काळी म्हणून संबोधला जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात १६ साखर कारखाने झाले. समाधानकारक पर्जन्यमान असेल तेव्हा धाराशिव जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वात जास्त ऊस उत्पादन होते.

सिंचन वाढल्यावर जिल्ह्यात सर्वदूर वीजेचे व रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे ध्येय उराशी बाळगून त्या स्वप्नाचा रात्रंदिवस पाठपुरावा केला. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून २००४ साली कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाण्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली. भविष्यातील अनेक स्वप्नांची नांदी म्हणजे हा प्रकल्प होय. शेतीबरोबरच औद्योगिकीकरणाला गती देण्यासाठी दळणवळण सुविधा अत्यंत आवश्यक असल्याने पाठपुरावा सुरू केला. तब्बल २० किमी वळसा घालून रेल्वेमार्ग धाराशिव शहरा नजीक आणला. प्रचलित मार्ग सोडून एवढा मोठा वळसा घेऊन निर्माण झालेला हा रेल्वेमार्ग देशातील एकमेव उदाहरण आहे. स्वप्न वास्तवात आणण्यासाठी डॉ.साहेबांनी घेतलेले श्रम शब्दातीत आहेत.

धाराशिव शहराला पाणी मिळावे यासाठी उजनी धरणात आरक्षण मंजूर करून घेणे, ग्रामीण भागातून शिक्षणाचे धडे घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या सुविधा जिल्ह्यात मिळाव्या यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करणे असो की कृषी महाविद्यालय उभारणी असो याचे श्रेय विरोध देखील निर्विवादपणे डॉक्टर साहेबांनाच जाते.

धाराशिव-लातूर येथे झालेला भूकंप असो अथवा त्यानंतर उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती असोत मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सारं काही विसरून साहेबांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेले प्रयत्न आजही अनेकजण डोळ्यात पाणी साठवून सांगतात. मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्याच्या ललाटावरील दुष्काळी फेऱ्याचा शिक्का पुसून टाकण्यात साहेबांनी आपल्या हयातीची ४० वर्षे खर्ची घातली आहेत.

तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर उपचार[संपादन]

नवी मुंबई येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये देखील त्यांचे मोठे योगदान आहे. यामार्फत होत असलेली आरोग्य शिबिरे आजही अखंड चालू असतात. यातून आजपर्यंत हजारो रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी झाली. तसेच पुढील उपचारांसाठी अनेकांना मुंबई येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, शेकडो रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया पार पाडली.


संदर्भ[संपादन]