सावळाराम महाराज म्हात्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सावळाराम धागोजी म्हात्रे
जन्म: १३ जुलै १९२७ (1927-07-13)
कोपर, डोंबिवली, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: १८ फेब्रुवारी, १९९२ (वय ६४)
कोपर, डोंबिवली, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र: धर्मपरंपरा
धर्म: हिंदू
प्रभाव: वारकरी संप्रदाय
वडील: धागोजी म्हात्रे
आई: सखुबाई म्हात्रे
पत्नी: सतुलाबाई सावळाराम म्हात्रे
अपत्ये: वासुदेव महाराज म्हात्रे

म्हात्रे सावळाराम धागोजी हे एक महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि समाजप्रबोधक होते


१३ जुलै १९२७ - १८ फेब्रुवारी १९९२

महाराजांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील कोपर येथे, एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात १३ जुलै १९२७ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव धागोजी म्हात्रे आणि आईचे सखुबाई होते. घरातील गरिबीमुळे त्यांचे शिक्षण झाले नाही. लहानपणी त्यांनी गुराख्याचे काम केले. नंतर चरितार्थासाठी शिधावाटप दुकानात नोकरी केली. सोबत त्यांनी दुधाचा जोडधंदा केला. त्यांच्या पत्नीचे नाव सतुलाबाई.

सावळाराम यांची ओढ भगवद्भक्तीकडे असल्याने त्यांनी १९६४ पासून आळंदी-पंढरीची वारी करण्यास सुरुवात केली. वारकरी संप्रदायातील ग्रंथ म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी, भागवत व गाथा आदींचे त्यांनी पठण केले. मौनव्रत, नामस्मरण आदित्यादी उपाय करून देखील त्यांच्या मनाचे समाधान होईना. शेवटी ते पनवेल तालुक्यात तळोजे निवासी सद्गुरू वामनबाबा महाराजांकडे गेले. त्यांच्या कृपेने त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीगुरूंच्या आज्ञेने व मार्गदर्शनाने कीर्तन-सेवेचा आरंभ झाला. अज्ञानी, मागासलेल्या, अंधश्रद्धेत चाचपडणाऱ्या समाजाला ज्ञानाचे अंजन घालून जागे केले. अनाचार, दुष्टरूढी, व्यसनाधीनता, कलहप्रियता यांवर त्यांनी कोरडे ओढले. त्यांनी श्रीमंत लोकांकडून मोठ्या देणग्या मिळवून आळंदी-पंढरीच्या वारकऱ्यांसाठी, विशेषतः आगरी समाजासाठी धर्मशाळा बांधल्या. तसेच जेथे शिक्षणाची सोय नव्हती, तेथे शाळा देखील काढल्या.

सद्गुरू वामनबाबांच्या १९५८ मधील निर्वाणानंतर सावळारामबुवांची जबाबदारी वाढली. सप्ताह, पारायणे, अनुष्ठाने यांद्वारे जनसंपर्क व प्रबोधन सुरूच होते, याशिवाय त्यांनी काही कीर्तनकार देखील तयार केले. त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण, मराठा, आगरी, कोळी सहित विविध जाती पंथाचे लोक आहेत. त्यांचा शिष्यवर्ग विशेषकरून पनवेल तालुक्यात, नाशिकमध्ये इगतपुरी भागात, मुंबईत खार, वांद्रे या ठिकाणी आहे. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू डोंबिवली येथे आहे. महाराजांनी ह.भ.प. विष्णू धोंडू म्हात्रे, गंगाराम राधा ठाकूर, चरू बामा म्हात्रे, सुपुत्र ह.भ.प. वासुदेव महाराज यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवून वयाच्या पासष्टाव्या वर्षी १८ फेब्रुवारी १९९२ रोजी वैकुंठगमन केले.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "म्हात्रे, सावळाराम धागोजी". महाराष्ट्र नायक. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.