विनय वाईकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डाॅ. विनय वाईकर (१९४१ - २ जानेवारी, २०१३) हे गझल या विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे लेखक होते. त्यांनी अन्य पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे वास्तव्य नागपूरला असे. ते भूलतज्ज्ञ होते.

वाईकर हे भारतीय लष्कराच्या वैद्यक सेवेत दहा वर्षे होते. १९६३,१९६५ आणि १९७१ अशा तीन युद्धांचा अनुभव घेऊन ते मेजर या हुद्यावरून निवृत्त झाले. प्रभावी वक्ता, कथाकथनकार व कवी असलेल्या डॉ. वाईकरांच्या युद्धकथा आणि ललित लेखन प्रकाशित झाले आहे. मराठीसोबतच हिंदी, उर्दू आणि इंग्लिश भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी गझल या विषयाखेरीज युद्धकथा, दोन अंकी नाटके लिहिली व शिवाय वर्तमानपत्रांत विविधांगी विषयांवर ललित लेखन केले.

विदर्भातल्या अकोला शहरात इ.स. १८६४ साली सुरू झालेल्या बाबुजी देशमुख या नामांकित व्याख्यानमालेत विनय वाईकर यांचे भाषण झाले होते.

दूरचित्रवाणीवरील 'नाती' या मालिकेचे लेखन वाईकरांचे होते.

वाईकर हे प्रहार या संघटनेचे संस्थापक सदस्य होते.

पुस्तके[संपादन]

  • आईना-ए-गझल (कोश, सहलेखिका - डॉ. जरिना सानी)
  • कलाम - ए - गालिब
  • गझल दर्पण
  • गुलिस्तान-ए-गझल (उर्दू गझलांचा इतिहास)
  • ती अवचित येते तेव्हा (दोन अंकी संगीत नाटक)
  • परिस्थिती आटोक्यात आहे (मुक्त काव्य)
  • फौजी (कथासंग्रह)
  • रक्तरंग (कथासंग्रह)
  • लोखंडी पूल (एकांकिका)
  • हिटलरच्या देशात (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - सुजाता ओगले)

पुरस्कार[संपादन]

  • 'लोखंडी पूल' या एकांकिकेला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार
  • आईना-ए-गझल या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या उर्दू अकादमीचा पुरस्कार.,