रजनी करकरे देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रजनी करकरे देशपांडे
जन्म

२५ ऑगस्ट १९४३

मृत्यू_दिनांक = 2 सप्टेंबर 2017
तुरळ, कोंकण
निवासस्थान कोल्हापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए.
जोडीदार प्रमोद देशपांडे
संकेतस्थळ
http://www.hohk.org.in/


प्रस्तावना[संपादन]

रजनी करकरे या कोल्हापुरातील ‘हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड’ या संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत..[१]

बालपण[संपादन]

रजनी करकरे यांचा जन्म २५ ऑगस्ट १९४३ रोजी कोकणातील तुरळ या गावी झाला. त्या ४ वर्षाच्या असताना १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री पोलिओच्या आघाताला बळी पडल्या.कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी उपचार झाले, परंतु तोवर कमरेखालचा भाग पूर्णपणे लुळा पडला होता. त्याकाळी सुधारित कृत्रिम साधने नसल्याने कशाचा तरी आधार घेऊन उठणे, चालणे असे प्रयत्‍न ताईनी सुरू ठेवले.

औपचरिक शिक्षणासहित संगीत शिक्षण[संपादन]

प्राथमिक शिक्षणासाठी रजनीताईना शिकवण्यासाठी शिक्षक घरी जात असत. पुढे त्यांना थेट इ.३री मध्ये प्रवेश देण्यात आला. शाळेत स्वच्छता गृहांची व्यवस्था नसल्यामुळे ताईना दिवसभर गैरसोयीचे होत असे. इ.४थी मध्ये गणिताच्या परीक्षेत काही जमेना म्हणून शिक्षकांसमोर आत्मविश्वासाने गाणे गाऊन दाखवले. १९५८ मध्ये इ.७वी पासून ताईनी गाणे शिकायला सुरुवात केली. चौदा वर्षे अनेक गुरूंकडून त्यांनी विविध प्रकारच्या गायकीचे शिक्षण घेतले असले तरी नामदेवराव भोईटे हे त्यांचे मुख्य गुरू होत.

रजनी करकरे यांनी १९६७ सालापासून आकाशवाणीवर गायन सादर करण्यास सुरुवात केली. ताईनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, ठुमरी, सुगम संगीत या गायन प्रकारांचे शिक्षण कोणतीही परीक्षा न देता घेतले. बहिणीची मदत घेत कुबड्यांच्या आधाराने ताईनी ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्या मराठी विषय घेऊन बी.ए. झाल्या.

१९६९ ते ७५ च्या दरम्यान ग्रंथपाल म्हणून कार्य पाहत असताना त्यांना नसीमा हुरजूक यांचे भाऊ अजीजभाई भेटले. नसीमा हुरजूक यांची कहाणी ऐकून रजनी करकरे यांनी त्यांना काही पुस्तके वाचावयास दिली. त्यातून प्रेरणा घेत नसीमा हुरजूक यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

संस्थेची स्थापना[संपादन]

पुढे रजनी करकरे आणि नसीमा हुरजूक या दोघींनी मिळून अपंग माजी सैनिक बाबू काका दिवाण यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. अनेक दिव्यांना सामोरे जात त्या दोघी अपंगांसाठी कार्य करीत राहिल्या. संस्थास्नेही, विश्वस्त व सरकारकडून मिळालेला निधी तसेच स्वकमाईतून त्यांनी उचगाव येथे घरोंदा वसतिगृह, अपंग व सुदृढ यांना एकत्र शिक्षण देणारे समर्थ विद्यामंदिर व समर्थ विद्यालय या शाळा उभारल्या. या दोघींनी कदमवाडी येथे अपंगांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे काजू प्रक्रिया केंद्र स्थापन केले.

वैवाहिक जीवन[संपादन]

या दरम्यान १९८५ साली रजनीताई व प्रमोद देशपांडे [ऊर्फ पी.डी.] यांचा प्रेमविवाह झाला आणि अपंग व सुदृढ यांच्या विवाहाचा आदर्श सर्वांसमोर उभा राहिला. राजनीताईनी संस्थेमध्ये अपंगांसाठी विवाह मंडळदेखील चालवले. त्यातून अनेक अपंग जोडप्यांना सुखाचे वैवाहिक आयुष्य लाभले. पी.डी. सरांनी बँकेतील नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन रजनीताईंसोबत स्वतःलाही संस्थेच्या कार्यात वाहून घेतले.

गायन कौशल्यात स्वविकास[संपादन]

या सगळ्या प्रवासात रजनीताईंचे गाण्याचे कार्यक्रम सुरूच होते. आपल्या गोड स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या रजनीताईचा गाण्याचा कार्यक्रम ‘आनंदाचे डोही’ या नावाने महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध झाला. संस्थेकरितादेखील त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले. सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला. गायनावरचे अफाट प्रेम, श्रद्धा आणि नम्रता आणि सरावातले सातत्य यामुळे त्यांच्यातील गायिकेला अनेकांनी नावाजले.

कलांजलीची स्थापना[संपादन]

स्वतःला मिळालेल्या पुरस्कारांतून रजनी करकरे-देशपांडे व सुचित्रा मोर्डेकर यांनी ‘कलांजली’ ही सुगम संगीताचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. त्यांच्या या संस्थेला काही पुरस्कारही मिळाले. रजनी करकरे देशपांडे स्वतःच्या घरीही गाण्याची शिकवणी घेतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.loksatta.com/chaturang-news/creative-inspiring-powerful-stories-of-women-empowerment-article-10-973793/