Jump to content

नावजी बलकवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नावजी बलकवडे हे छत्रपती राजारामाच्या काळातील मराठ्यांचे एक सरदार होते.

बारा मावळातील सर्व किल्ले मोगलांनी जिंकून घेतले होते. शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार नावजी बलकवडे यांनी इ.स. १६९२च्या श्रावण महिन्यात ऐन पावसात लोहगड जिंकून घेतला. १ जुलै १६९३ च्या रात्री चारशे मावळ्यांनिशी सिंहगडासारखा अभेद्य किल्ला पुन्हा जिंकून घेतला. या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती राजाराम यांना जिंजीहून ३ एप्रिल १६९४ला पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रात लिहिले, तुम्ही सिंहगडचे कार्यसिद्धीसमयी धारेस चढोन तलवारीची शर्थ केली. पूर्वी सुभेदार तानाजी मालुसऱ्यांनी जीव देऊन किल्ला संपादिला. त्याचप्रमाणे तुम्हीही प्राणाची बाजी लावून किल्ला सर केलात. याचबरोबर नावजींना पदाती सपृ सहस्री हा किताब देऊन सात हजार पायदळांचे सेनापती पद बहाल करण्यात आले. अशा प्रकारे नावजी बलकवडे यांच्या बाबतीत गड घेऊनी सिंह आला.

यानंतर तीन वर्षांनी म्हणजे इ.स. १६९६मध्ये मोगल सरदार मन्सूरखान बेग जुन्‍नरकर याने फितुरीने जिंकून घेतलेला कोरीगड हा घाट माथ्यावरील किल्ला नावजींनी मोठ्या पराक्रमाने जिंकला.