उपवास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उपवास अल्प आहार

प्रस्तावना[संपादन]

धार्मिक आशय- उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी आहे.उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणै: सह| उपवास:स विद्न्येयः सर्वभोग विवर्जित:||अन्नपाणी वर्ज्य करून राहणे म्हणजे उपवास होय. सामान्यपणे उपवास याचा अर्थ हलका व मित आहार घेणे असा होतो.बृहदारण्यक उपनिषदात ईश्वराप्रत जाण्याचे जे विविध उपाय सांगितले आहेत त्यापैकी उपवास हाही एक आहे असे मानले जाते.उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे असे गौतम धर्मसूत्रात सांगितले आहे.यज्ञ कर्माला उपयुक्त असे धान्य शिजवून त्याचा अल्पाहार घेणे असा उपवास याचा अर्थ काठक गृह्यसूत्रात सांगितला आहे.तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास हा श्रेष्ठ असे महाभारत या ग्रंथात सांगितले आहे. आषाढी एकादशी,महाशिवरात्री, हरितालिका, रामनवमी अशा विविध व्रतांमधेही उपवासाचे स्थान महत्त्वाचे आहे.[१]

सामाजिक आशय- प्राचीन काली कधीतरी अन्नाचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असावे आणि त्यातून धार्मिक उपवासाची कल्पना पुढे आली असावी.त्यामुळे उपवास काळात होणारा शारीरिक व मानसिक त्रास म्हणजे तपच होय असे मानले गेले.[२] कमी दर्जाचे अन्न-धान्य भक्षण करून राहणे याला उपवास म्हणतात. रोज आपण जे अन्न-धान्य खातो, त्याच्या सतत वापराने, त्या विशीष्ट धान्याच्या पुरवठ्यावर ताण पडतो. तो ताण कमी करण्यासाठी, एका विशीष्ट दिवशी वऱ्याचे तांदुळ, भगर वा तत्सम किंवा फळफळावळे या उपवस्तु खाण्यात येतात. अनेक वर्षापुर्वी, अवर्षण व सतत नापिकी यामुळे राज्याच्या कोठारातील अपुरा धान्य-साठा, जनतेस वर्षभर पुरविण्यासाठी शोधण्यात आलेला हा उपाय आज भारतात चांगलाच रुजला आहे. हिंदु धर्मात याला देवादिकांशी जोडण्यात आले आहे. जैन धर्माने उपवासाला विशेष महत्त्व दिले. त्यांनी सरसकट सर्वांनाच उपवासा करण्याचा धार्मिक आदेश दिल्याने समाजाच्या सर्व सत्रात उपवास संल्प्ना पोचली असे दिसते.[३] साधारणतः उपवास म्हणजे खाण्याशी संबंधित क्रिया, हे समीकरण असल्यामुळे उपवासाचा संबंध केवळ शरीराच्या आरोग्याशी आहे असा समज होतो. परंतु उपवास हा माणसे व त्यांच्या स्वतःच्यात असलेल्या अस्तित्वाशी व अंतरात्म्याशी जोडणारा एक विधी आहे. उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वात मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही, जो मनाला बरोबर घेऊन शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो. [४]

फायदे[संपादन]

उपवासाची बटाटा कचोरी

आयुर्वेद असे सांगते की लंघन (उपवास) हा श‍रीराला निरोगी करतो. उपवासामुळे श‍रीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो. ज्याप्रमाणे, आपण रजेच्या दिवशी वेळ असल्यामुळे घराची साफसफाइ करतो त्याप्रमाणे, या कमी ताणाच्या वेळेत श‍रीरही साफसफाइ करते व दोष बाहेर काढून टाकते. आपल्या श‍रीरात या साठी यंत्रणा आहे. सबब, आठवड्यातुन एकदा उपवास, हा शरीर शुद्धीकारक व आपल्यास हितकारक आहे.मिताहार(अल्प आहार),शर्करायुक्त कंदमूळे खाणे(बटाटे,रताळे),दूध अथवा दुधापासुन केलेले पदार्थ,ईश्वरभक्ति,चांगले विचार,भजन,कीर्तन,कमी वा चांगलेच बोलणे,सत्संग ईत्यादि या गोष्टी उपवास काळात करण्याचा उपयोग होतो.

निषिद्ध[संपादन]

उपवासादरम्यान भरपुर थंड पाणी पिणे, दिवसा झोप, मैथुन,उच्च शारीरिक कष्टाची कामे,हिरव्या भाज्या खाणे, कुसंगती,वाईट विचार,शिव्या-शापयुक्त बोलणे,पोटभर खाणे ईत्यादि टाळावे.

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  4. ^ तांबे, बालाजी (१२ जुलै २०१९). "मोठी एकादशी मोठ्ठा उपवास". सकाळ फॅमिली डॉक्टर: ३.