आडकोजी महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव सर्वांनाच माहीत आहे. महाराष्ट्रात तुकडोजी महाराज जेवढे सर्वपरिचित होते तसे त्यांचे गुरू आडकोजी महाराज. ते आणि तुकडोजी महाराज ही जशी गुरुशिष्यांची जोडी तशीच जनार्दनस्वामी आणि एकनाथ यांची जोडी. श्रीगोविंदप्रभु (गुंडम राऊळ) आणि श्रीचक्रधरस्वामी यांच्या बाबतीत असंच म्हणता येईल. गुरूचा नाम निर्देश केला की शिष्याचं नाव आठवतंनी शिष्याचा नामनिर्देश केला गुरूचं. संत आडकोजी महाराज यांचा जन्म आर्वी येथील इंग्रजकालीन लोखंडी पुलाजवळ कसबा येथे कासार कुळात १४ नोव्हेंबर १८२१ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव फिसके होते. आर्वी येथे संत मायबाईचा प्रसिद्ध मठ आहे. या संत मायबाईच आडकोजी महाराजांच्या आध्यात्मिक गुरू होत्या. आडकोजी महाराजांचा जन्म आर्वी येथेच कासारपुऱ्यातील फिसके कुटुंबात झाला.

आडकोजी बालपणापासूनच काहीशा कलंदर वृत्तीचे होते. त्यांनी विवाह केला पण प्रापंचिक जीवनात त्यांनी कधी रस वाटलाच नाही. मौनातच चिन्तन करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. चाळीसाव्या वर्षापासून तर ते जणू पूर्ण विदेहीच झाले. वस्त्राचेही भान त्यांना नसे. एवढंच नव्हे तर खाण्यापिण्याचंही भान नसे त्यांचे भक्त त्यांची काळजी घेत पण त्यांना आपल्या भक्तांपासूनदेखील कशाचीच अपेक्षा नसे.

त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिका व चमत्कार-कथा प्रचलित आहेत. त्यांनी जे केलं ते लोकहितासाठी केलं. आपण काही चमत्कार करतो, असं त्यांनी कधीही म्हटलं नाही कारण त्यामुळं अंधश्रद्धानी बुवाबाजी वाढते.

राष्ट्रसंतांचं मूळ नाव होतं माणिक. पण आडकोजींमुळे त्यांचं तुकड्या असं नामकरण झालं. तुकडय़ादास गुरू का प्यारा असं स्वतः तुकडोजी महाराजींनीच म्हटलं आहे.

आडकोजी महाराज विदर्भातले व राष्ट्रसंतही विदर्भातलेच. आडकोजी महाराजांचं मूळ गाव आर्वी. पुढे ते वरखेडला आले. राष्ट्रसंतांच्या लहानपणीच त्यांची भेट आडकोजींशी झाली व तुकडोजींनी आडकोजींच शिष्यत्व स्वीकारलं. राष्ट्रसंतांची आडकोजींवर अनन्य श्रद्धा होती.

त्यांची हीच प्रवृत्ती त्यांचे शिष्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यामध्येही आपल्याला आढळते. राष्ट्रसंतांनी तर भाबडय़ा भक्तीला व अंधश्रद्धाना कडाडून विरोध केला व समाजाला सद्सद्विवेक बुद्धीचं महत्त्व पटवून दिलं.

ते कासार जातीचे होते. खरं तर संतांना कुठ जात असते का? ते तर सर्वांचेच असतात. सर्व जाती-धर्म त्यांना सारख्याच असतात. कारण ते मानवतावादी असतात. इथं जातीचा उल्लेख यासाठी केला की महाराष्ट्रात सर्वच जातीधर्माच्या संतांनी भक्तीचा प्रसार केला व आध्यात्मिक प्रबोधन केलं. त्यात जातिधर्माचा अडसर कुठंच आला नाही.

आडकोजी महाराजांचा जन्म कार्तिक पौर्णिमेस झाला, त्याचप्रमाणं एका शतकानंतर त्यांनी याच दिवशी महासमाधी घेतली. संत ज्ञानेश्‍वर यांच्यानंतर संजीवन समाधी घेणारे आडकोजी महाराज हे दुसरेच संत. संत गुलाबराव महाराजाचे त्यांच्या विषयीचे आदरयुक्त उद्गार असे आहेत.

पापे करूनी झाली । कलियुगी नरभृतांची वाढ खुजी ।वास्तवजन ताराया । झाले संत आडकुजी ।।