राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रातले पहिले राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन मुंबईतील रवींद्र हॉलमध्ये १६ ऑक्टोबर २०१०ला झाले. कवयित्री नीरजा त्याच्या अध्यक्षा होत्या.

'दुसऱ्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे होते. १९ जानेवारीला २०१२ला दादरमधील राजा शिवाजी विद्यालयात हे संमेलन झाले. या संमेलनाचे उद्‌घाटन वसंत आबाजी डहाके यांनी केले. संमेलनाची प्रायोजक संस्था इंडियन एज्युकेशन सोसायटी होती.
या संमेलनात ’मराठी हा शालेय विषय स्कोअरिंग कसा होईल?' या विषयावर चर्चा झाली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या माजी अध्यक्षा उज्ज्वला पाटील या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या भाषणाने संमेलनाच्या सकाळच्या सत्राचा समारोप झाला.
दुपारी कवी संमेलन झाले. शिक्षकांसाठी यावेळी विविध स्पर्धाही झाल्या.
या संमेलनाच्या निमित्ताने, अशी संमेलने भविष्यकाळात भरवण्यासाठी, शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी आणि भाषा आणि साहित्य अध्यापनाच्या आशयसमृद्घीसाठी एक नवी शिक्षक साहित्य संमेलन संस्था निर्माण करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे हे दोघे या संस्थेचे मानद सचिव आहेत. अध्यक्षा नीरजा धुळेकर आहेत.

धुळे- शिक्षक भारतीतर्फे तिसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन १९ जानेवारी २०१३ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये झाले. नीरजा संमेलनाध्यक्ष होत्या..

चौथे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन रविवारी, १९ जानेवारी २०१४ रोजी बुलढाणा येथील गर्दे हॉलमध्ये आयोजित करण्यात आले.. संमेलनाच्या अध्यक्षपदी "निशाणी डावा अंगठा'कार रमेश इंगळे उत्रादकर होते.

५वे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन १४ फेब्रुवारी २०१५ला मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात झाले. फैयाज यांनी संमेलनाचे उद्‌घाटन केले. लोकशाहीर संभाजी भगत हे संमेलनाध्यक्ष होते.

भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानने शिक्षकांसाठी घेतलेले एक साहित्य संमेलन नाशिकमध्ये ११ सप्टेंबर २०१३ रोजी झाले. मराठी कवी विठ्ठल वाघ संमेलनाध्यक्ष होते.

महाराष्ट्रातील शिक्षकांचे पहिले साहित्य संमेलन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिक्षण विकास मंच आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व विकास परिषद यांच्या वतीने १४ व १५ एप्रिल २०१२ला पुण्यामध्ये झाले. हे संमेलन यापूर्वी होत असलेल्या राज्यव्यापी शिक्षक संमेलनापेक्षा वेगळे होते.

शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य व नागपूर शाखा यांच्यातर्फे पाचवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन १३ व १४ नोव्हेंबर २०१६ या काळात नागपूरला झाले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे या संमेलनाचे अध्यक्ष होते.




पहा : साहित्य संमेलने; शिक्षक साहित्य संमेलन