बरसीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणारे) हिरव्या चाऱ्याचे पीक असून त्याचे खोड ३०-६० सेंमी. उंच, सरळ वाढणारे अथवा आरोही (आधारावर चढणारे) व शाखायुक्त असते. पाने बहुसंख्य, दले तीन, आयताकृती अथवा कुंतराम (भाल्यासारखी) व काहीशी दातेरी उपपर्णे कुंतराम अथवा आराकृती (अरुंद लांबट) असून पानांच्या देठापासून अंशतः विलग असतात. स्तबक (फुलांचा झुबका) अवृंत (बिनदेठाचा) अथवा सवृंत (देठ असलेला), अंडाकृती. फुले पिवळसर-पांढरी शिंबा (शेंग) एकबीजी, आयत-लंबगोल याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजीमध्ये (शिंबावंत कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि पश्चिम व उत्तर भारतातील इतर प्रदेशांतील ओलिताखालील भागांत हे महत्वाचे चाऱ्याचे पीक आहे. ते मूळचे इजिप्तमधील असून त्या देशातील हे चाऱ्याचे मुख्य पीक आहे. सिरियात आणि इराणमध्येही त्याची लागवड होते. १९०४ साली या पिकाची ईजिप्तमधून भारतात आयात झाली व १९१६ पर्यंत त्याचा उत्तर भारतात झपाट्याने प्रसार झाला. दक्षिण भारतात ते फारसे लागवडीत नाही.

कोरड्या व थंड हवामानात हे पीक चांगले येते परंतु ज्या भागात हिवाळ्यात बर्फ पडते त्या भागातील हवामान त्याला मानवत नाही. तापमान वाढू लागताच त्याची वाढ कमी होते.

वाळूचे प्रमाण फार असलेल्या जमिनीखेरीज कोणत्याही जमिनीत हे पीक येते परंतु चांगल्या निचऱ्याच्या गाळवट जमिनीत चुना आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्यास त्याची वाढ चांगली होते. उसार (खार) जमिनीतही हे पीक वाढते, त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनी सुधारण्यासाठी हे पीक उपयुक्त आहे. या पिकाला पाणी भरपूर लागते व पाण्याअभावी ते वाळते.

हे शिंबावंत (शेंगा येणारे) पीक असल्यामुळे त्याच्या मुळांवरील गाठींतील सूक्ष्मजंतू हवेतील नायट्रोजन शोषून घेतात. त्यामुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढते. या दृष्टीनेही या पिकाची लागवड उपयुक्त आहे.

मेस्कावी आणि खड्रावी हे दोन ईजिप्शियन प्रकार उत्तर भारतात यशस्वी झाले आहेत. मेस्कावी प्रकाराची झाडे उंच वाढतात व त्यांपासून चाऱ्याखेरीज बियांचेही उत्पन्न मिळते.

लोखंडी नांगराने जमीन नांगरून, कुळवाच्या २-३ पाळ्या घालून एकसारखी नरम करून घेतात. दर हेक्टरी २०-२५ टन शेणखत आणि ४१४ किग्रॅ. सुपरफॉस्फेट जमिनीत मिसळून २.५ X २.५ मी. आकारचे  वाफे तयार करतात.

सप्टेंबरात तिसऱ्या आठवड्यात वाफ्यांत पाणी भरून त्यांत एक रात्र पाण्यात भिजविलेले बी मुठीने फोकतात. दर हेक्टरी २२.५ ते २७.५ किग्रॅ. बी लागते. बी पिवळे व चांगले भरलेले असावे. जमिनीत प्रथमच बरसीमचे पीक घ्यावयाचे असल्यास ऱ्हायझोबियम ट्रायफोली या सूक्ष्मजंतूंचे संवर्धन बियांना पेरणीपूर्वी लावणे आवश्यक असते. सूक्ष्मजंतूंचे संवर्धन न मिळाल्यास पूर्वी बरमीस लावलेल्या शेतातील पृष्ठभागापासून १५ सेंमी खोलीपर्यंतची माती आणून ती नवीन शेतात दर हेक्टरी १२०-१५० किग्रॅ. या प्रमाणात सारखी मिसळत असत.

पिकाला हिवाळ्यात दर ७-८ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ५-६ दिवसांनी पाणी देतात. पिकाच्या हंगामात एकूण १२ ते १५ वेळा पाणी द्यावे लागते.

बरसमी पिकास चिकोरी नावाचे तण उगवते. हे जनावरांना अपायकारक असते म्हणून बरसमीचे पीक लहान असताना चिकोरीची झाडे उपटून काढणे आवश्यक असते.