गुराखी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुराखी साहित्य संमेलन हे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कंधार येथील गुराखीगडावर प्रतिवर्षी २६ ते २९ जानेवारी या दरम्यान भरवले जाते

पोतराज, तमाशा कलावंत, वाघ्या-मुरळी, वारू, अस्वलवाले, माकडवाले, पांगूळ, चुडबुडकेवाले, राईंदर, देवकरीणमाता, देवकर (तृतीयपंथी), मनकवडे, बहुरूपी, नंदीबैलवाले, वराहपालक, मसणजोगी, नाथगोसावी, फकीर, वासुदेव, कोळी, वैदू, गोंदणवाल्या बाया, जाते उपटणाऱ्या माउल्या, बाळ सतूष म्हणणाऱ्या माया, खेळवाले, दशावतारी अशा अनेक भटक्या-उपेक्षितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांची कला, त्यांची व्यथा, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुराखी संमेलनाला सुरुवात झाली.

‘नाहीरे’ वर्गातल्या उपेक्षित दलित-पददलित, अस्पृश्य म्हणून फेटाळलेल्या, विटाळलेल्या, बहिष्कृत, मायमाउल्यांच्या कष्टाच्या रक्त-घामातून हे गुराखी साहित्य जन्माला येते.. कुठलाही भपकेबाजपणा, जाहिरातबाजी न करता उत्स्फूर्तपणे हे साहित्य निसर्गाशी एकरूप होत जन्म घेते.

संमेलनाचे व्यासपीठ[संपादन]

गुराखी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अस्वल, मोर, कुत्रा, मरनागी, ससे, खेकडे, पानकोंबडी, साप, मुंगूस, धोतरा, जाई-गुलाब, जुई, नागफणा, गोबी, अक्कल खार, खईसकुत्री, नाग-नागीण, साप-मुंगूस, आग्याबोंड, चमकोरा, बेशरमी, करअली, रुचकी हे सर्व असते.

कोबी, कांदे, वांगे, बिस्ता, रुचक, रानावनातील वेली, मधमाशांची पोळी यांनी मंडप सजवला जातो. तोंडाला मुंगस (?) बांधलेला गुराखी या पीठावर बसलेला असतो. विविध वाद्ये, शंखध्वनी, वाजंत्री व टाळमृदंगाच्या नादात, मसणजोग्याच्या ढणमण्याच्या व शिंगाडयाच्या रणभेदी रणगीतांनी संमेलनाचे उद्घाटन होते. गारगोटीच्या चममकीने लव्हाळी पेटवून दीप प्रज्वलन केले जाते. एका मडक्यात पुस्तक-पाटी ठेवलेली असते. ती ज्ञानहंडी फोडून संमेलन सुरू होते. या संमेलनात मोर-लांडोर, मरनांगी-मसणनजोगी, कुत्रा-कुत्री, कबुतर-कबुतरीण, खडोळी-खडोळीण, घोरपड-घोरपडीण, धत्तुरा-जाई, नागफणा-गोबी, गाटवकाटे- राशिनी गवरी, अक्कल-खईसकुत्री, पानकोंबडा-कोंबडी तर साप-मुंगूस असे आंतरजातीय विवाह लावले जातात.

त्या वेळी केशवराव धोंडगे यांनी रचलेली अधर्म अनीती सनातनी वर्ण विष जाळू चला।/>
मायमुक्ती करण्या मृत्युजंयी होऊ चला। />
अंधरुढ्या, विषमता, अस्पृश्यता जाळू चला />
क्रांतिदेवी साकारून आता मुक्त होऊ चला।/>

अशी मंगलाष्टके म्हटली जातात. दळणकांडण, उखाणे, गुलई गीते, शोकगीते वगैरेंची स्पर्धा घेतली जाते.

व्याख्या[संपादन]

गुराखी साहित्य संमेनलनाचे प्रणेते केशवराव धोंडगे यांनी गुराखी साहित्याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत.

  • रामपहारी तांबडफुटीच्या लालभडक रंगाने, शुक्राच्या चांदणीने अक्षरबद्ध केलेले अमर साहित्य म्हणजे गुराखी साहित्य.
  • निसर्गाच्या कण्हण्याच्या हुंदक्याला साथ देणारे साहित्य म्हणजेच गुराखी साहित्य.
  • कापूस वेचताना, साळी कांडताना मुखातून बहरलेले अमर साहित्य, श्रमपालांची गौरवगाथा म्हणजेच हे गुराखी साहित्य.
  • मुक्या गुराढोरांची शेपटी धरून कैलासी उड्डाण मारणारी साहित्यसेवा म्हणजे गुराखी साहित्य.

सुरुवात[संपादन]

केशवराव धोंडगे यांनी २६ जानेवारी, इ.स. १९९२ पासून गुराखी साहित्य संमेलन सुरू केले. शेतकरी कामगार पक्षाचे भाई केशवराव धोंडगे या मौखिक साहित्य संमेलनाचे प्रणेते होत.[१] इ.स. १९९४मध्ये व इ.स. १९९५मध्ये आचारसंहितेमुळे व इ.स. २०११ मध्ये कडाक्याच्या थंडीमुळे संमेलन रद्द केले गेले होते.[२]

१४वे गुराखी साहित्य संमेलन २६ जानेवारी २००६ला झाले.

२०वे गुराखी साहित्य संमेलन २६ जानेवारी २०१२ला झाले. एरवी चार दिवसांचे असणारे हे संमेलन तीव्र थंडीमुळे एका दिवसाचेच झाले. शाहीर किसनराव दिघोळे हे संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे अध्यक्ष होते

२२ जानेवारी २०१४ला २२वे गुराखी साहित्य संमेलन झाले. ’उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते.

२६-२७ जानेवारी २०१९ रोजी २७ वे साहित्य संमेलन आयोजित केले गेले. गुराखी नटराज सवई गंधर्व गणेशराव वनसागर यांनी उद्घाटन केले. [३]

मिरवणूक[संपादन]

संमेलनाच्या पहिल्या दिवशी मिरवणुकीत गुराख्यांबरोबर उंट, रोही, साप, नंदी, गाढवे, माकडे, गाई, बैल आदी प्राणी सहभागी होतात. कामाईच्या मंदिरात अध्यक्ष व उद्घाटकांच्या हस्ते पूजा होते. त्यावेळी झाडावर शर्ट, टोपी, चड्ड़्या घातलेली माकडे उड्या मारत असतात. त्याचवेळी गण सुरू होतो. गण संपला की कामाईची पूजा बांधली जाते. दुसरीकडे वासुदेव, पोतराज, गोंधळी, फकीर जथ्याजथ्याने थांबलेले असतात. चुडबुडकेवाले, सापवाले, उंटवाले, कावडीवाले, मांग, गारुडी, मसणजोगी, ताशेवाले, आपापले ताशे, हलग्या वाजवितात. संबळवाले, पिपाण्या वाजविणारे आपापले वाद्य वाजवितात. त्यावेळेस मोर, लांडोर त्या ठिकाणी नृत्य करतात. कामाईच्या मंदिरातील पूजा संपल्यावर सर्व गुराखी दिंडीच्या रूपात गुराखीगडाकडे जातात. या दिंडीत सर्वांच्यासमोर मलखांबावर पहिलवान कसरती करत असतात. हा मलखांब बैलगाडीवर ठेवलेला असतो. त्याच्या मागे सनई, बाज्याच्या हलग्या कडाडतात. त्यांच्या मागून कावडीवाल्यांचा जथ्था असतो. त्यांच्या मागे पळसाच्या पानाच्या टोप्या डोक्यावर घातलेले गुराखी असतात. त्यांच्या मागे मसणजोगी, त्यांच्यामागे वासुदेव, नंतर गोंधळी, नंतर मांगगारूडी, नंतर पोतराज व नंतर फकिरांचा जथ्था आपापल्या वाजंत्र्यांसह वाजत-गाजत-नाचत चालत असतो. यांच्या मागे चुडबुडकेवाले, नंतर बासरीवादक, त्यांच्यानंतर गळ्यात मोठेमोठे साप अडकवलेले सापवाले असतात. त्यानंतर गाढवांवर लगडी ठेवून चालणारा कुंभारांचा समूह असतो. त्यांच्यामागे गाई, गाईंच्यानंतर रोही, नंतर उंटांचा लयबद्ध तांडा, पोपटवाले, माकडवाले, अस्वलवाले, पहिलवान, भविष्यवाले, गोंदणाऱ्या बाया, तमासगीर हे सर्व आपापल्या वेषभूषेत गुराखीगडाकडे जातात. ही मिरवणूक जवळजवळ अडीच मैल लांबीची असते.

सहभाग[संपादन]

भटक्या आणि विमुक्त समाजातील शिकलगार, चुडबुडके जोशी,वासुदेव, गोलकर , गोंधळी, गोल्ला, मसणजोगी, फासेपारधी, वडार, तुडबुडके, फकीर, गारुडी, पोतराज, चाळणीवाले, मनकवडे अशा विविध समुदायांतील लोक या संमेलनात सहभागी होतात.

गुराखीपीठ[संपादन]

या संमेलनाच्या व्यासपीठाला गुराखीपीठ असे संबोधले जाते. मधमाशांचे पोळे, वाळुक, चिमणीचे खोपे, शिकाळे, मुंगुस(?), वांगी, गाजरे, बोरे, बिब्याच्या माळ्या, पपया, आंब्याची पाने, खारीक, खोबरे, कांद्याची पात आदी रानमेव्यांनी गुराखीपीठ सजविले जाते.[१] गुराखीपीठावर जागोजागी गुराखी ध्वज लावलेला असतो. या ध्वजावर श्रीकृष्ण आणि गुराखीराजा अशी अक्षरे असतात. गुराखीपीठावर दहीहंडी लोंबकळत ठेवलेली असतते. गुराखीपीठावर अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख पाहुणे, गुराखी कलावंत यांच्यासह शेळ्या, मेंढ्या, गाई-वासरे, मोर, कबुतरे, ससे, कोल्हे, माकडे, चिमण्या, राघू-मैना, खडोळी, अस्वले, तर गुराखीपीठाच्यावर चिमणीचे खोपे, शिकाळे, वाळके, काकढ्या, लचकन, गोफणी, चाबूक, बिब्यांच्या माळा, गुंजांच्या माळा, पपया, आंब्यांच्या पानांची तोरणे, खारीक-खोबऱ्याच्या-शंखाच्या माळा, गुराखीपीठाच्या डाव्या-उजव्या बाजूला बिब्याची भट्टी, हुडके इत्यादी साकारलेले असते. कार्यक्रमास वंदे मातरम या गीताने सुरुवात होते. जागतिक शांततेसाठी आकाशात कबुतरे सोडली जातात. नंतरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनकवडे यांच्याकडे असते. एक मनकवडा गुराखीपीठावर आपल्या दोन साथीदारांसह तर दुसरा समोरच्या प्रेक्षकातून हातांच्या बोटांद्वारे इशारे करतो. गुराखीपीठावरील मनकवडा सांकेतिक भाषेतले हे शब्द ओळखून त्याचा ध्वनीतून उल्लेख करतो. याच सूत्रसंचलनातून चकमक आणि गारगोटीतून विस्तव झाडून दीप प्रज्वलित केला जातो आणि वाद्ंयाच्या बेसुमार गजरात गुराखी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होते.

जनतेचा गौरव[संपादन]

केशवराव धोंडगे यांच्या गुराखी संमेलनाच्या या संकल्पनेला या भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे गौरवले आहे. मुंबई-पुण्यातूनही अनेकजण या संमेलनाला हजेरी लावण्यासाठी येतात.

पहा : मराठी साहित्य संमेलने

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; गुराखी साहित्य संमेलन नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ [१][मृत दुवा]
  3. ^ "२७ वे जागतिक गुराखी साहित्य संमेलन शनिवारी". बहुजननामा. 2019-12-20 रोजी पाहिले.