कर्मयोगिन्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्रारंभ आणि अखेर[संपादन]

दि. १५ जून १९०९ प्रारंभ झाला.

दि. २६ मार्च १९१० साप्ताहिक बंद करण्यात आले.

मुखपृष्ठ[संपादन]

कर्मयोगिनच्या अंकावर कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहे असे चित्र आहे. 'माझे स्मरण कर आणि युद्ध कर' आणि 'योग: कर्मसु कौशल' ही दोन बोधवाक्ये मुखपृष्ठावर आहेत. [१]

उद्दिष्ट[संपादन]

श्री. अरविंद घोष यांची अलीपूरच्या कारावासातून दि. ६ मे १९०९ रोजी सुटका झाली आणि लगेचच म्हणजे दि. १५ जून रोजी त्यांनी 'कर्मयोगिन्' हे साप्ताहिक सुरू केले. राष्ट्रीय धर्म, साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यावर भाष्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे साप्ताहिक सुरू केले होते.

भूमिका[संपादन]

हे साप्ताहिक प्रकाशित करण्यामागची भूमिका श्री.अरविंद घोष यांच्या शब्दांत ...

"भारतीयत्व ही केवळ एक भावना आहे, अजूनही त्या विषयीचे ज्ञान नाहीये. काही निश्चित अशी धारणा वा सखोल मर्मदृष्टी नाहीये. अजून आपण आपल्या स्वतःला जाणून घ्यावयाचे आहे, आपण कोण होतो, कोण आहोत आणि कोण असणार आहोत; आपण भूतकाळात काय केले आहे आणि आपण भविष्यामध्ये काय करण्याची क्षमता बाळगतो, आपला इतिहास काय, आपले कार्य काय याविषयी आपण अनभिज्ञ आहोत. 'कर्मयोगिन्'ने हे ज्ञान प्रचलित करण्याचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे.

वेदान्त असो वा सूफिवाद असो, मंदिर असो वा मशीद असो, नानक, कबीर, रामदास, चैतन्य किंवा गुरू गोविंद असोत, ब्राह्मण, कायस्थ आणि नामशूद्र असोत, कोणतीही राष्ट्रीय संपदा असो, मग ती अस्सल भारतीय असो किंवा आपण ती आपल्याप्रमाणे अनुकूल करून घेतलेली असो, ती ज्ञात करून घेणे आणि तिला तिचे योग्य स्थान देणे, तिची योग्यता ओळखणे हे 'कर्मयोगिन्'ने आपले कार्य मानले आहे.

राष्ट्रीय जीवन आणि त्याचे भविष्य घडविण्यासाठी या राष्ट्रीय संपदेचा कसा उपयोग करून घेता येईल हे पाहणे हे आमचे दुसरे कार्य होय. त्यांचे भूतकाळाच्या तुलनेत यथार्थ मूल्यमापन करणे सोपे आहे पण भविष्यात त्यांना त्यांचे योग्य स्थान देऊ करणे हे अधिक कठीण आहे.

बाहेरचे जग आणि त्याचे आपल्याबरोबर असलेले नाते आणि त्यांच्याबरोबर आपण कसा व्यवहार ठेवावा हे जाणणे ही तिसरी गोष्ट आहे. आत्ताच्या घडीला आम्हाला हाच प्रश्न अधिक अवघड आणि प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो परंतु त्यावरील उपाय हा इतर सर्वांच्या उपायांवर अवलंबून आहे.''

इतिहास[संपादन]

दि. ३१ जुलै रोजी त्यांनी "An Open Letter to My Countrymen" या नावाचा लेख 'कर्मयोगिन्'मध्ये प्रकाशित केला, त्यानंतर पुन्हा एकदा अरविंदांच्या मागे ब्रिटिशांचा ससेमिरा लागला. आपल्याला पुन्हा केव्हाही अटक होऊ शकते, याची जाणीव असल्यानेच त्यांनी हा लेख लिहिलेला होता. मी पुन्हा परतून येऊ शकलो नाही तर हे माझे राजकीय इच्छापत्र आहे असे समजावे,असे त्यांनी या लेखामध्ये म्हटले होते. या लेखाच्या शेवटी सारांशरूपाने त्यांनी राजकीय कृतिकार्यक्रम काय असावा याची रूपरेषा मांडली होती.

संपादक[संपादन]

श्री. अरविंद घोष १९१० मध्ये चंद्रनगर येथे अज्ञातवासात निघून गेले तेव्हा त्यांनी या साप्ताहिकाची जबाबदारी भगिनी निवेदिता यांच्यावर सोपविली होती. २६ मार्च १९१० रोजी ते बंद करण्यात आले तोपर्यंत श्री अरविंद घोष यांचे लेखन यामधून प्रकाशित होत असे.

सह-संपादक[संपादन]

श्री. नोलिनी कांत गुप्ता हे सन १९०९-१९१० या काळात या साप्ताहिकाचे सह-संपादक होते.[२]

संदर्भ[संपादन]

[३]

  1. ^ "'Karmayogin' English Journal - Sri Aurobindo (1906-1910)". Sri Aurobindo Institute of Culture (इंग्रजी भाषेत). 2023-08-02 रोजी पाहिले.
  2. ^ Nolini_Kanta_Gupta. "en.wikipedia.org".
  3. ^ A.B.Purani. Life of Sri Aurobindo.