अघाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अपांग, आंधीझाडा, ऊंगा, औंगा, चिचडी, चिचरा, चिरचिरा, लटजीरा, लत्‌जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, वगैरे. अपामार्ग हे नाव हिंदीत जास्त वापरात आहे.[ संदर्भ हवा ]

वर्णन[संपादन]

आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात उगवते आणि अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असून, त्याला थोड्या परंतु लहान फांद्या फुटतात. पाने एक ते दोन इंच लांब व एक ते पाऊण इंच रुंद असतात. त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुले येतात. फुलाचा दांडा सुरुवातीला आखूड असतो; परंतु तो वीस इंचांपर्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळे ते जनावरांच्या अंगाला चिकटतात व दूरवर पसरतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ह्या वनस्पतीचा प्रसार होतो.

आघाड्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत. या वनस्पतीच्या पानांचा मंगळागौरीच्या पूजेतील पत्रींमध्ये समावेश असतो. एकेकाळी पुण्यासारख्या शहरांत श्रावण महिन्यात रस्त्यावरून आघाडा, पत्री, फुले अशा आरोळ्या देत आदिवासी विक्रेत्या स्त्रिया हिंडत असत.[ संदर्भ हवा ]

उत्पत्तिस्थान[संपादन]

भारतात सर्वत्र

आघाड्याचे औषधी उपयोग[संपादन]

सर्वसाधारण - झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात. नरक चतुर्दशीच्य दिवशी आघाड्याचे पान मस्तकाभोवती फिरवून मग अभ्यंगस्नान करतात.

आयुर्वेदानुसार - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात.
पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात.. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खाणे श्रेयस्कर असते.
खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची केलेली थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात.. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण देतात. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात.
सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते.[ संदर्भ हवा ]

आघाड्यापासून बनणारी औषधे - अपामार्गक्षार : आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळतात. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्यात घालतात. त्यात त्या राखेच्या चौपट पाणी घालून चांगले कालवतात. ते पाणी न हलवता तसेच ठेवून देऊन, दहा ते बारा तासांनंतर त्यातले वरचे स्वच्छ पाणी काढतात. मग ते गाळून लोखंडाच्या कढईत तापवतात. पाणी आटल्यावर कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहतो तो आघाड्याचा क्षार. त्या क्षाराला ‘अपामार्गक्षार’ म्हणतात. हा अपामार्गक्षार कपडे स्वच्छ करण्यासाठी, आवाज येत असल्यास उपयोगी पडतो.

आघाड्याच्या तुऱ्यांपासून वा मुळ्यांपासून डोळे येणे आदींवर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात.[ संदर्भ हवा ]

  • फलत्रिकादी काढा

मूत्रविकार[संपादन]

मानवी शरीरातील मूत्रवाहिनी, मूत्रपिंड यामध्ये बारीक काटे असणारे मुतखडे- युरिनरी स्टोन निर्माण होतात, त्यामुळे संबंधित रुग्णास पाठीत व कंबरेच्या भागात विलक्षण वेदना होतात. अशा वेळेस आघाड्याच्या पानांचा रस प्राशन केल्यास एक-दोन दिवसांत मुतखड्याचे बारीक कण विनासायास बाहेर पडतात आणि रुग्णाला बरे वाटते.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]