बुधू भगत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुधू भगत या क्रांतीकारकांचा जन्म झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातल्या सिलगाई या गावी इ. स. १८०० मध्ये झाला. रांची, छोटा नागपूर, मध्य प्रदेशछत्तीसगडच्या भागातील आदिवासी जनता बुधू भगत यांना ईश्वरी अवतार मानते.

कार्य[संपादन]

इंग्रजांनी आदिवासी जनतेचे जमिनीचे हक्क काढून जमीनदारांना देण्याचे षडयंत्र रचले होते. या अन्यायाविरोधात बुधू भगत यांनी इंग्रजांविरोधात १८२८ मध्ये सशस्त्र संग्राम उभारला. इतिहासात विख्यात असलेल्या लारका विद्रोह याचे नेतृत्व बुधू भगत यांनीच केले होते. बुधू भगत यांनी रांची जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन तेथील जनतेला इंग्रजांच्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात संघटीत केले होते.

अविस्मरणीय मृत्यु[संपादन]

फेब्रुवारी १८३२ रोजी बुधू भगत सिलगाई गावी येणार होते. त्यावेळी इंग्रजांनी सापळा रचला. १० फेब्रुवारी १८३२ रोजी कॅप्टन इंपेने इंग्रजांची मोठी सेना घेउन सिलगाई गावाला वेढा टाकला. ७ दिवसापर्यंत तुंबळ युद्ध सुरू होते. बुधू भगत यांच्याबरोबर त्यांचे दोन मुलं देखील या युद्धात सामील झाले होते. इंग्रजांचा वेढा फोडून बाहेर निघणे अशक्य झाले होते. शेवटी गावकऱ्यांनी निर्णय घेतला की बुधूजींना मध्यभागी ठेवून त्यांच्याभोवती मानवी वर्तुळाच्या कडी तयार करायच्या व इंग्रजावर एल्गार करायचा. त्याप्रमाणे जवळपास ४०० गावकऱ्यांनी मानवी शृंखला उभी करून बुधूजींना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सर्व गावकरी अपयशी ठरले आणि बुधू भगत, त्यांचे दोन मुलं आणि ४०० गावकरी या अद्भुत प्रयत्नात वीरगतीस प्राप्त झाले.