१९६४ रामेश्वरम चक्रीवादळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(1964 रामेश्वरम चक्रीवादळ या पानावरून पुनर्निर्देशित)
१९६४ चे रामेश्वरम् चक्रीवादळ
Super cyclonic storm (IMD scale)
Category 5 tropical cyclone (SSHWS)
चक्रीवादळची उपग्रहातून घेतलेले छायाचित्र डिसेंबर  २१
Formed डिसेंबर १८, १९६४
Dissipated डिसेंबर २६, १९६४
Highest winds 3-minute sustained: 240 km/h (150 mph)
1-minute sustained: 260 km/h (160 mph)
Gusts: 280 km/h (175 mph)
Lowest pressure ≤ 970 hPa (mbar); 28.64 inHg
Fatalities कमीत कमी १८००
Damage $150 million (१९६४ USD)
Areas affected Ceylon, India
Part of the 1964 North Indian Ocean cyclone season

१९६४ चे रामेश्वरम् चक्रीवादळ ( धनुष्कोडी चक्रीवादळ म्हणूनही ओळखले जाते) हे भारतावर धडकलेल्या सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक मानले गेले. [१] प्रथम १५ डिसेंबर रोजी अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र म्हणून याची नोंदणी झाली. उष्णकटिबंधीय लहरी ची जोड मिळाल्यानंतर, १८ डिसेंबरपर्यंत याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. पुढे काही दिवसातच वाऱ्याची तीव्रता वाढून, ५ उ. अक्षांशा जवळ याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. २३ डिसेंबरला, हे वादळ त्रिंकोमालीजवळ सिलोनमध्ये धडकले. त्यावेळी वाऱ्याची तीव्रता २४० किमी/ता (१५० मैल/तास) असावी असा अंदाज आहे. आधुनिक काळात याची गणना 'सुपर सायक्लोनिक वादळ' म्हणून झाली असती. पुढे काहीसे कमकुवत होऊन हे वादळ लवकरच तामिळनाडूला धडकले. किनाऱ्याला धडकल्यानंतर चक्रीवादळ वेगाने कमकुवत झाले आणि २४ डिसेंबर पर्यंत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. पुढे २६ डिसेंबरपर्यंत ते अरबी समुद्रावर जाऊन ओसरले .

हवामानशास्त्रीय इतिहास[संपादन]

१५ डिसेंबर १९६४ रोजी, दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र नोंदविले गेले. दोन दिवस त्यात फारसा बदल झाला नाही. त्यानंतर लवकरच [२] उष्णकटिबंधीय लहरीशी संयोग होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले. [३] बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि अंदमान समुद्राचा बराचसा भाग गडगडाटी वादळांसह पावसाने व्यापला. १८ डिसेंबर रोजी एका जहाजाने (कॉलसाइन JMAG) ४५ किमी/ता (२८ मैल/तास) असा वाऱ्याचा वेग आणि 1005.5 मिली बार (hPa; २९.६९ inHg) असा बॅरोमेट्रिक दाब नोंदविला . या अहवालाच्या आधारे, भारतीय हवामान विभागाने (IMD) याचे वर्गीकरण तीव्र कमी दाबाचा पट्टा म्हणून केले. पुढील काही दिवसांत, ह्याची तीव्रता झपाट्याने वाढली व ही प्रणाली हळूहळू पश्चिमेकडे जाऊ लागली. १९ डिसेंबरपर्यंत , ५ उ. अक्षांशा जवळ याचे चक्रीवादळात रूपांतर झाले . [२] विषुववृत्ताजवळ एवढी तीव्रता प्राप्त करणाऱ्या मोजक्या चक्रीवादळांमध्ये ह्याची नोंदणी झाली . [३] पुढे हे चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत, दक्षिण भारताजवळ येताना याची तीव्रता वाढत गेली. [२] २१ डिसेंबर रोजी घेतलेल्या उपग्रह प्रतिमे नुसार या वादळाची व्याप्ती सुमारे ९६५ किमी (६०० मैल) होती. या वादळात वैशिष्ट्यपूर्ण असे पट्टे स्पष्ट दिसतात व यांचा विस्तार २४० किमी (१५० मैल) पेक्षा जास्त दिसून येतो. यातील एक पट्टा विषुववृत्त ओलांडूनसुद्धा त्याचा वक्रिय आकार राखलेला आढळून येतो. या चक्रीवादळाचा दक्षिण गोलार्धातील विस्तार ४८५ किमी (३०१ मैल) इतका दिसून येतो. [३]

अनेक जहाजांना या वादळाचा सामना करावा लागला, त्यापैकी एकाने २२ डिसेंबर रोजी वाऱ्याचा वेग ११० किमी/ता (६८ मैल/तास) नोंदवला. त्या दिवशी सिलोनच्या किनाऱ्यावरील वाऱ्यांचा वेग वाढला; तसाच वादळाचा वेगही वाढला. २३ डिसेंबरला हे चक्रीवादळ सिलोनच्या उत्तरेकडील टोकाला धडकले आणि पश्चिम-वायव्य दिशेकडे वळले. सिलोन आणि दक्षिण भारताच्या दरम्यान असलेल्या पंबन बेटावरील एका अधिकाऱ्याच्या मते, वादळाचा डोळा अंदाजे, १६ किमी (९.९ मैल) पेक्षा कमी रुंदीचा होता. [२] उपग्रह प्रतिमेच्या आधारे, वादळातील वाऱ्याचा वेग अंदाजे २४० किमी/ता (१५० मैल/तास) होता तर काही ठिकाणी वाऱ्याची तीव्रता २८० किमी/ता (१७० मैल/तास) पर्यंत होती. [३] यामुळे या प्रणालीला आधुनिक काळातील श्रेणी पद्धती नुसार 'सुपर सायक्लोनिक वादळ' म्हणून स्थान देण्यात आले. [४] याव्यतिरिक्त, IMD ने अंदाज केला आहे की त्याचा केंद्रीय दबाव जास्तीत जास्त 970 mbar (hPa; २८.६४ inHg होता ). [२] सर्वात कमी दाब, सिलोनच्या पश्चिम किनाऱ्यावर मन्नारमध्ये, ९७८ mbar (९७८ हेPa; २८.९ inHg) होता . [३] काहीसे कमकुवत होऊन, वादळ लवकरच टोंडीच्या दक्षिणेला तामिळनाडूला धडकले. एकदा किनाऱ्यावर, धडकल्यावर चक्रीवादळ वेगाने कमकुवत झाले, आणि २४ डिसेंबर रोजी अरबी समुद्रावर जाण्यापूर्वी त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. पुढे २६ डिसेंबर रोजी खुल्या पाण्यावर ते विरून गेले. [२]

प्रभाव[संपादन]

या चक्रीवादळामुळे किमान 1,800 लोकांना जीव गमवावा लागला. [५] [६]

२२ डिसेंबर रोजी, हे शक्तिशाली चक्रीवादळ सिलोनच्या उत्तर भागात धडकले आणि त्याने आपत्तीजनक नुकसान केले. वाचलेल्यांच्या मते, या संपूर्ण परिसरात, या वादळाची ४.५ मी (१५ फूट) उंचीची वादळाची लाट पसरली. प्राथमिक अहवालात म्हटले आहे की २५० लोकांनी आपले प्राण गमावले आणि हजारो बेपत्ता झाले. [७] सिलोनच्या जाफना जिल्ह्यात सुमारे ५००० घरे आणि ७०० मासेमारी नौका उद्ध्वस्त झाल्या. [८] जिल्ह्यातील धान (तांदूळ) पिकाचीही नासाडी झाली. [८] मन्नार आणि त्रिंकोमल्लीचा येथेही प्रचंड नुकसान झाले. [८] त्रिंकोमल्ली बंदराचे अतोनात नुकसान झाले आणि ते बंद झाले. [८] सिलोनमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीचा अंदाज सुमारे रु.२०० दशलक्ष इतका होता. सुमारे ३५० सिलोनचे मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाले. [८]

किमान १००० लोक बेटावर मारले गेले आणि त्यापेक्षाही अधिक लोक बेपत्ता झाले. [९] एका अनधिकृत अंदाजानुसार मृतांची संख्या २००० पेक्षा अधिक होती. [७] सरकारने याला "सिलोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी शोकांतिका" असे मानले. [९]

2007 मधील धनुषकोडी येथील चर्चचे अवशेष

चक्रीवादळाचे परिणाम प्रामुख्याने पंबन बेटावर जाणवले, हे बेट भारतीय मुख्य भूभाग आणि सिलोन यांच्या दरम्यान आहे. [८] ३०००-हून अधिक लोक बेटावर अडकले होते, त्यापैकी बरेच पर्यटक आणि यात्रेकरू होते . मालमत्तेचे एकूण नुकसान $150 दशलक्ष एवढे होते. [८]

पंबन बेटाच्या आग्नेय टोकावर असलेल्या धनुष्कोडी शहराला, २३ डिसेंबर रोजी, अंदाजे ७.६ मी (२५ फूट) उंचीच्या वादळाच्या लाटेने धडक दिली, [१०] शहर पाण्याखाली गेले आणि पंबन-धनुष्कोडी पॅसेंजर ट्रेन उलटली व त्यातील सर्व २०० प्रवासी ठार झाले. [११] हे शहर, भारत आणि सिलोनमधील एक महत्त्वाचे संक्रमण ठाणे होते व ते पूर्णपणे नष्ट झाले आणि तेव्हापासून ते पुन्हा बांधले गेले नाही. [१२] चक्रीवादळाच्या आधी हे शहर एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र होते, या शहरात रेल्वे स्थानक, सीमाशुल्क कार्यालय, पोस्ट आणि तार कार्यालय, दोन वैद्यकीय संस्था, एक रेल्वे रुग्णालय, एक पंचायत संघ दवाखाना, उच्च प्राथमिक शाळा आणि बंदर कार्यालय होते. [१३] १ मार्च १९१४ पासून हे बंदर कार्यरत होते [१३] किमान ८०० लोक या एकट्या धनुष्कोडीमध्ये मारले गेले. [९]

धनुष्कोडी रेल्वे स्थानकाचे अवशेष

चार रेडिओ ऑपरेटर धनुष्कोडीमध्ये राहिले आणि वादळाच्या वेळी जीव धोक्यात घालून त्यांनी रेडिओ प्रसारण सुरू ठेवले. शेवटी ते वादळाच्या तडाख्यात अडकले पण पंबन पुलाला जवळ जवळ १२ तास घट्ट पकडून राहिल्याने ते वाचले. त्यांच्या समर्पणाबद्दल भारत सरकारने नंतर त्यांना सन्मानित केले आणि पुरस्कृत केले. [१४]

वादळा नंतर[संपादन]

या वादळामुळे येथील गावांचा संपर्क पूर्ण पणे तुटला आणि जवळ जवळ तीन दिवस त्यांना अन्न किंवा शुद्ध पाण्याशिवाय काढावे लागले. दळणवळणाच्या मार्गांचे मोठे नुकसान झाले आणि मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. २६ डिसेंबरपर्यंत सिलोनच्या हवाई दलाने येथील १४ गावांना मदत पोचविली. ब्रिटन, क्युबा, पश्चिम जर्मनी आणि युनायटेड स्टेट्स यांनी सिलोनला मदत देऊ केली. [७]

पंबन पुलाच्या पुनर्बांधणीला प्राधान्य दिले गेले आणि सुरुवातीच्या अंदाजा नुसार त्याला सहा महीने लागतील अशी अपेक्षा होती. तथापि, ई. श्रीधरन, या तेथे नेमलेल्या अभियंत्याने, ४५ दिवसात रेल्वे पूल कार्यरत केला. पुढील काही वर्षांमध्ये येथे जाण्यास एक पक्का पूल बांधण्यात आला. [१४]

मंडपममध्ये, चक्रीवादळाच्या लाटेने २ किमी (१.२ मैल) लांब किनारपट्टीजवळ वर पाच तळी तयार झाली. तीन तलावांमध्ये सरासरीपेक्षा क्षाराचे प्रमाण जास्त होते आणि त्यात सरासरीपेक्षा कमी सिलिकेट होते आणि येथे पेरिडिनियमची वसाहत आढळून आली. इतर दोन तलावांमध्ये क्षार व सिलिकेट बाबतीत याच्या विरुद्ध स्थिति होती व तेथे पायरोसिस्टिस फ्यूसिफॉर्मिसचे वास्तव्य होते. त्यामुळे या पाचही तलावात बायोल्युमिनेसेन्स आढळून आला. १९६५ मध्ये या तलावांच्या अभ्यासात पेनाईडे ( प्रॉन) च्या प्रजाती, अॅम्फिपोडाची एक प्रजाती, खेकड्याची एक प्रजाती आणि एसीट्स आढळून आले. संशोधकांना काही Sepioteuthis आणि tintinnid देखील सापडले. या शिवाय, किनारपट्टीवरील माशांच्या एकूण ४६ प्रजातींचे दस्तऐवजीकरण करण्यात आले. [१०] समुद्रकिनाऱ्यावर, प्रवाळ खडकांचे या आपत्तीमध्ये अतोनात नुकसान झाले, विशेषतः इचिनोपोरा लॅमेलोसा, मॉन्टीपोरा फोलिओसा आणि अल्सीओनेरियन्स मोठ्या संख्येने मारले गेले. मंडपमजवळील मनाकडू पॉइंट येथील, फॅविड्स आणि पोराइट्सची उन्नत कोरल कॉलनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. वादळानंतरच्या आठ वर्षांत, पाल्क सामुद्रधुनीमध्ये कोरल वसाहतींनी भरीव वाढ निदर्शनास आली, यात ऍक्रोपोरा कॉरिम्बोसा या खडकांचा समावेश आहे. तथापि, अल्सीओनेरियन्सच्या वसाहतींनी पुनरुज्जीवनाची फारशी चिन्हे दिसून आली नाही. किनारपट्टीवर, मोठ्या प्रमाणात वाळू ढवळली गेल्याने ते कोरलच्या वाढीसाठी अयोग्य क्षेत्र बनले आणि तेथे कदाचित कधीही पुन्हा कोरल वाढणार नाही. [१५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ A. D. Rao; S. K. Dube; P. Chittibabu (1994). "Finite Difference Techniques Applied to the Simulation of Surges and Currents Around Sri Lanka and Southern Indian Peninsula". International Journal of Computational Fluid Dynamics. 3 (1): 71–77. Bibcode:1994IJCFD...3...71R. doi:10.1080/10618569408904500.
  2. ^ a b c d e f India Meteorological Department (1964). "Annual Summary — Storms & Depressions: Severe cyclonic storm in the Bay of Bengal" (PDF). India Weather Review: 30–34. May 12, 2013 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "IMD" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ a b c d e Shashi M. Kulshrestha; Madan G. Gupta; Indian Meteorological Service (June 1966). "Satellite Study of the Rameswaram Cyclonic Storm of 20–23 December 1964". Journal of Applied Meteorology. 5 (3): 373–376. Bibcode:1966JApMe...5..373K. doi:10.1175/1520-0450(1966)005<0373:SSOTRC>2.0.CO;2. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "AMS" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  4. ^ "Cyclones, storm surges, floods, landslides" (PDF). Global Facility for Disaster Reduction and Recovery. September 2011. p. 9. Archived from the original (PDF) on April 26, 2012. May 12, 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "At least 1,800 dead in India-Ceylon storm". Chicago Tribune. December 28, 1964.
  6. ^ "1,800 Asians feared dead after cyclone and tidal wave". Reading Eagle. December 28, 1964.
  7. ^ a b c "Ceylon Cyclone: Thousands Homeless". Deseret News. New Delhi, India. Associated Press. December 26, 1964. p. 1. May 21, 2014 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "DN1" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  8. ^ a b c d e f g "Ships, planes search for survivors". The Age. Colombo. December 28, 1964. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "theage_19641228" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  9. ^ a b c "Cyclone, Tidal Wave Kill 1,800 Fishermen". The Lincoln Star. New Delhi, India. United Press International. December 28, 1964. p. 18. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "TLS1" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  10. ^ a b P. V. Ramachandran Nair; G. Luther; Clement Adolph (1965). "An ecological study of some pools near Mandapam (South India) formed as a result of the cyclone and tidal wave of 1964" (PDF). Journal of the Marine Biological Association of India. 7 (2): 420–439. May 21, 2014 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "Ecology" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  11. ^ Jaishankar, C. (24 December 2005). "Memory of the disaster still lingers". The Hindu. Archived from the original on 5 January 2007.
  12. ^ Srinivasan, Prasanna (3 June 2004). "Land's end". The Hindu. Archived from the original on 14 October 2004.
  13. ^ a b "Shattered in 1964, still remains so". The Hindu. June 15, 2002. Archived from the original on May 21, 2014.
  14. ^ a b R. Sujatha (January 24, 2012). "When nature took over..." The Hindu. May 21, 2014 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "TheHindu2012" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  15. ^ C. S. Hopinadha Pillai (1975). "An assessment of the effects of environment and human interference on the coral reefs of Palk Bay and Gulf of Mannar along the Indian Coast" (PDF). Seafood Export Journal. 7 (12): 9–21. May 21, 2014 रोजी पाहिले.