गोपालनाथ महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्री परब्रम्ह गोपालनाथ महाराज या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री परब्रम्ह गोपालनाथ महाराज यांचे समाधी मंदिर त्रिपुटी येथे आहे. हे ठिकाण सातारा शहरा पासुन १० किलोमिटर वर आहे. मंदीराशेजारी मोठा तलाव आहे.

गोपाळनाथांचे लौकिक चरित्र[संपादन]

गोपाळनाथ महाराजांचा जन्म सलाबतपूर या गावी झाला. हे गांव नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात येते. तेथील श्रीमंत सावकार गोविंदपंत घोलप यांचे ते द्वितीय पुत्र. घराणे श्रीमंत म्हणून त्यांना "नाईक" ही उपाधी होती. जन्म तिथी श्रावण वद्य अष्टमी, बुधवार, रोहिणी नक्षत्र म्हणजेच श्रीकृष्ण जन्माचीच तिथी व वेळ. संशोधनानंतर निश्चित केलेला जन्म शके १६१२ (इ.स. १६९०).

गोपाळनाथांच्या वडिलांनी नंतर सलाबतपूर सोडले व ते खानदेशात कोंढवळ गावी गेले. परंतु लवकरच त्यांनी देह ठेविला. आपल्या तीन पुत्रांना घेऊन आनंदीबाई विदर्भातील अमरावती नजीकच्या सुर्जीं-अंजनगाव येथे आल्या.

तपस्या व गुरू भेट[संपादन]

गोपाळनाथांचे मुळ नाव लक्ष्मण, त्यांचे मौजीबंधन मातेने केले. पण त्यांचे लक्ष घरात रमेना व अल्पावधीतच त्यांनी घर सोडले व ते पयोष्णि नदीच्या तीरावर असलेल्या "रामतीर्थ" या स्थानी तपस्येस गेले. कठीण तपस्या केली. तप फळाला आले. आकाशातून जलप्रसाद पडला. पाठोपाठ श्री दत्तात्रेय प्रगटले. त्यांनी लक्ष्मणाला क्षेमालींगन दिले. श्री दत्तात्रेयानी मनोरथ विचारले. "ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी, अन्य काही मागणे नाही" असे लक्ष्मणाने सांगितले. श्री दत्तात्रेयांनी ही इच्छा पूर्ण केली. लक्ष्मण गुडघ्यावर नतमस्तक बसले, बद्धांजुळी पसरून एकाग्रतेने श्रवण करु लागले. दत्तात्रेयांनी त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेविला व वेदशास्त्राचे बीज असे ब्रह्मज्ञान सांगितले. श्री दत्तात्रेयांनी विचारले "पूर्ण समाधान झाले काय?", उत्तर आले "होय हे दयार्णवा, मी संशयरहित झालो". या क्षणीच "लक्ष्मण" हे "गोपाळनाथ" झाले.

पण थोड्याच वेळात श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले आणि आकाशवाणी झाली - "हे नाथा, तुला सद् गुरू कृपा होताच तुझे ज्ञान सफल होईल. घार मस्तकावर घिरट्या घालीत आहे, त्याच वेळी जो पुरुष तुझ्या पाठीशी उभा राहून तुला दुग्धवाटी पाजेल असा पुरुष हाच तुझा गुरू समज व त्याला शरण जा."

गुरूच्या शोधात गोपाळनाथ भ्रमंती करीत असताना खानदेशात सिऊरबारापाड्याचे या गावी अगदी वर सांगितल्या सारखा प्रसंग घडला व नाथांना त्यांचे गुरू रंगनाथ हे भेटले. हे रंगनाथ सोनार समाजातील सत्पुरूष होते.

गुरू परंपरा[संपादन]

श्रीनाथांची गुरुपरंपरा ही आदिनारायनापासून आली. ही नाथ परम्परा आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जी दत्त-जनार्दन-एकनाथ ही परंपरा माहिती आहे, त्याच परंपरेत श्री गोपाळनाथ येतात. श्री गोपाळनाथ हे वरील परंपरेतील रंगनाथांचे शिष्य. गोपाळनाथांचा काळ इ. स. १६९० ते इ. स. १७६६ (शके १६१२ ते १६८८) हा होय. ही परंपरा गोपाळनाथांच्या नंतरही आज अखेर विद्यमान आहे.

रंगनाथांकडे गोपाळनाथांनी ब्रह्मविद्येचे ज्ञान प्राप्त केले. खुद्द दत्तात्रेयांनी वरदहस्त ठेवल्यावरही गोपाळनाथांना गुरूची आवश्यकता होती. रंगनाथांनी गोपाळनाथांना योगविद्देत परीपुर्ण पारंगत केले. रंगनाथांकडे गोपाळनाथांच्यावर जे संस्कार झाले, त्यामुळे गोपाळनाथ सर्वदृष्टीने ब्रह्मविद्या व योगशास्त्र जाणते झाले. गुरूंचे हे ऋण त्यांनी अखंड मिरविले. संप्रदायात जे भजन म्हटले जाते त्यात गुरुशिष्यांच्या या प्रेमाचे चित्र उमटले आहे. "रंगनाथ गोपाळ । जय जय रंगनाथ गोपाळ"

बाह्य दुवे[संपादन]